Friday, August 12, 2016

एक गंध....

एक गंध पहाटे पडलेल्या दवबिंदूच्या गारव्याचा ...
एक गंध लाल केसरी गोळ्यासमवेत उमलणाऱ्या फुलांचा ....
एक गंध देवघरातून मंद सुवास येणाऱ्या धुपाचा ....
एक गंध रटरटणाऱ्या  सकाळच्या पहिल्या चहाचा ....
एक गंध बाळाच्या दुधासोबत त्याच्या मखमली स्पर्शाचा ....
एक गंध आईच्या कुशीतील मायेचा ....
एक गंध  तव्यावरच्या गरम पोळीचा ....
एक गंध दुपारच्या झोपेचा ....
एक गंध दुपारी रंगलेल्या भातुकलीचा ...
एक गंध पहिल्या पावसाचा .....
एक गंध सायंकाळच्या किलीबिलाटाचा ...
एक गंध थकलेल्या बाबांच्या घामाचा ...
एक गंध आगळ्या वेगळ्या  तिन्हीसांजेचा ...
एक गंध पतिपत्नीच्या प्रेमाचा ...
एक गंध आपलेपणासोबत प्रेमाचा ...

Wednesday, August 10, 2016

थोडेसे मनातले

प्रथम पाहिले तुला अन मनात कुठेतरी नाजुकशी कळ उमटली ...
तेव्हाच खात्री पटली ईश्वराने तुज माझ्यासाठीच घडवली ...
तुझं न माझं प्रेम  कधी कधी   हव्याहव्याशा रिमझिम सरींसारखे तर
कधी  धो धो पावसात येणाऱ्या टपोऱ्या अळवावरच्या मोत्यासारखे ...
या चंचल फुलपाखराला सोबत घेऊन डुलणाऱ्या रंगबेरंगी फुलासारखी तू ..
सागरच्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट अन मला किनारा देणारी तू

Saturday, August 6, 2016

श्रावणसरी

रिमझिम सरीत श्रावणाची सुरुवात झाली , 
दिव्याच्या अवसमुळे तेजोमय प्रकाशात एक प्रसन्नतेची हलकीशी लकेर उमटून गेली.....
श्रावणातल्या कालच्या पहिल्या शुक्रवारी गौराई येऊन बसली... जिवतीच्या गोष्टीसंगे मुलाबाळांना उदंड आयुष्य देऊ केली  ....

  आज भावाचा उपवास  भाजणीचे थालीपीठ त्यासोबत वाटलेल्या डाळीची उसळ ,  नागोबाची पूजा दूध ,लाह्या आमच्या आईसाहेब अगदी यथासांग पूजा करून घेत आम्हा दोघी बहिणींकडुन , म्हणजे कोणतीही पूजा असो किंवा आणि काही प्रत्येक गोष्टीत perfection हवेच त्याचा आता खूप उपयोग होतोय म्हणा कुठे अडत नाहीय ,, पण खरेच हे करताना  खूप मज्जा असायची आणि यायची पण ,
   दुपारच्या वेळेला कुणी झोपाळा बांधला का हे बघायला जायचे ,हा माझा सगळ्यात आवडीचा छंद तासनतास झोपाळ्यावर डुलत तर कधी एखादे पुस्तक घेऊन  बसायचे ,  एका मोठ्या झाडाला बांधलेला झोपाळा , खूप मोठी जाड रस्सी त्याला खाली लाकडाची फळी लावून तयार केला असायचा ( त्याला काहीतरी नाव आहे मला आता नाही आठवत )  पण तो इतका उंच जायचा ना खुप भारी वाटायचे तेव्हा , आमच्या पेक्षा मोठ्या ताया ,काकू तर दोघी दोघी उभा राहून मोठे झोके घ्यायच्या , आम्ही आपले खाली उभे कधी आमचा नंबर येतो हे बघत  ...

             संध्याकाळी अंबाबाईच्या मंदिरात सगळेजण जमायचे फुगड्या ,झिम्मा यांच्या गर्दीत मंदिराचा आवार गजबजून जायचा ,  माहेरी आलेल्या ताया दीदीच्या  भेटीही मंदिरातच रंगायच्या , एखादी पावसाची सर यायची पण त्यातहि सगळे खेळातच गुंग असायचे पाऊसही अगदी हलकेच यायचा सोबत करायला , कदाचित सासुरवाशिणीचे अश्रू पुसायला ,,
     पण सगळ्यालाच एक वेगळा रंग होता कदचित तोच या श्रावणाचा संग असावा

Tuesday, August 2, 2016

ओळख

आमच्या घराशेजारी एक काका राहायला होते , स्वभावाने खूप छान आणि मनमोकळे काकूही तशाच अगदी ... त्यांना दोन मुले जवळपास दोन अडीच वर्षाचा फरक असेल दोघांच्यात दोघेही खूप हुशार . दोन्ही मुले शिकायला परदेशात एकूणच काय सगळे उत्तम चालू होते . 
नुकतेच काका त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले होते , त्यामुळे घरी बसून गाणी ऐकणे , फिरणे , मित्र यात त्यांचा खुपसा वेळ जात असे , आणि घरी काकूंना मदत करत  त्यामुळे काकूही  खुश . काकांचा मित्रपरिवार खूप मोठा त्यामुळे नाटक , कुठेतरी छोटीशी ट्रिप हे सारखे काही न काही चालूच असे . 
नोकरीच्या काळात फिरायला  वेळ मिळत नसे आणि आता पैसाही आहे आणि तब्येतपण साथ देत आहे तोवर फिरून घ्यायचे हा एकच बाणा काकांनी रिटायरमेंट नंतर अवलंबला होता . 
काकांची कंपनी मिळणे म्हणजे त्यांच्या मित्रांना मेजवानीच काकांकडे त्यांच्या नोकरीतले किस्से , बाकी बारीकसारीक अनुभव यांचा खजिनाच होता ,कधी कधी हे सगळे आपल्या बायकांना सोबत घेऊन जात तेव्हा काकूही जात असत . 
यावेळी काकांनी पावसाळी ट्रिप काढायची असे ठरवले पण फक्त मित्र मित्र त्यामुळे काकू घरीच , तसाही काकूंना त्यांच्या व्यापातून दिवस कमीच पडत असे .  
यावेळी त्यांच्या ग्रुपने गड  किल्ले असा कार्यक्रम आखला होता . सगळी तयारी झाल्यावर एक दिवशी भल्यापहाटे सगळी मित्रमंडळी किल्लेचढाई साठी रवाना झाली . एकेक किल्ले पाहून त्यांची माहिती घेऊन तिथल्या शौर्यगाथा मनात साठवत त्यांची मोहीम चालू होती . 
आज शेवटचा दिवस रात्री घरासाठी प्रयाण.... 
जेवण झाल्यावर परतीची तयारी चालू केली , सगळ्यांचे सामान गाडीत स्थिरावल्यावर मोठ्याने हर हर  महादेवचा जयघोष करत गाडी चालू झाली , पावसाळ्याचे दिवस होते तसाही ड्राईव्हर  गाडी हळू हळू चालवत होता , घाटात गाडी आली तशी ड्राईव्हरने   गाडीचा वेग आणखी कमी केला , सगळेच थकल्यामुळे झोपेत होते , हळू हळू गाडी पुढे जात होती , अचानक एका वळणावर पुढून एक ट्रक जोरात आला ड्राइव्हरने गाडी सांभाळायचा प्रयत्न करत होता अचानक गाडीचा वेग वाढलेला पाहून सगळेच जागे झाले ,काही कळण्याआधीच गाडी एका मोठ्या दगडावर जाऊन आदळली . कुणाला काहीच कळत नव्हते कुणी माझा पाय तर कुणी हात , गुढगा म्हणत कह्णत होते ,पण काकाचा तर काहीच आवाज नाही डोक्याला मार  लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते . 
मागून येणाऱ्या गाड्यानी हे पाहून पोलिसांना फोन केला आणि सगळ्यांना घेऊन जवळच्याच हॉस्पिटल मध्ये गेले , ड्राइव्हरच्या हुशारीमुळे जीव जाताजाता वाचला होता जर का  गाडी दरीत कोसळली असती तर ??? 
पण नशीबवान सगळेच होते . 
फक्त काकांच्या डोक्याला जोरात मार  लागला होता बाकीचे  हातपाय फ्रॅक्चरवर निभावले होते . 
पण काका अजूनही शुद्धीत आले नव्हते , काकूही तिथे येऊन पोहचल्या  काकांची अवस्था पाहून त्याही कोसळणारच होत्या पण काकांना आधार देण्यासाठी आता फक्त त्याच तर तिथे होत्या . 
चोवीस तासानंतर काका शुद्धीवर आले , तेव्हा काकू त्यांच्या समोरच होत्या , काकूंनी डॉक्टरांना बोलावले काकांना चेक करून , डॉक्टर त्यांना काही प्रश्न विचारू लागले पण काकांना त्यांचे नावही आठवेना  आणि काकूही ..... 
आता काकू फक्त पाहत होत्या त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता . 
तसे काकांना लागलेला मार पाहून डॉक्टरांनी हि शक्यता वर्तवली होतीच पण त्यावेळी ती फक्त शक्यता होती आणि  आता ती वास्तविकता होती . 
त्यांच्या मुलांना बोलावून घेतले , काकांच्या ऑपरेशनसाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हलवण्यात आले , तसेही ऑपरेशन रीस्कीचं होते कारण यात काका कोमात जाण्याचीही शक्यता होती . 
काकूंना तर वेड लागायचे बाकी होते . सगळे देव पाण्यात आले होते . 
मुलांनाही आईला आधार द्यावा कि स्वतःला सांभाळावे समजत नव्हते 
 काकांचे ऑपरेशन झाले , त्यांच्या शुद्धीत येण्याची सगळेजण वाट पाहू लागले , काका शुद्धीत आले आणि त्यांनी काकूंचे नाव घेतले तेव्हा काकूंना झालेला आंनद अवर्णनीयच होता तो तर त्यांच्या डोळ्यात देखील दिसू लागला . पण  खूप थोडा वेळ टिकला . 
काकांना परत आठवेना आपण कोण , आपली मुले ? सगळे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर !!!!!
थोडे दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली राहून , काका घरी आले पण त्या घराची ओळख त्यांना पटेना ... पण त्या तिथे त्यांना एक वेगळीच आंतरिक ओढ नक्कीच जाणवत होती ... 
शेवटी काका काकूंनी काडी काडी गोळा करून आपले ते घरटे बनवले होते , त्याची ओळख थोड्यावेळासाठी हरवली असेल पण काकांना त्याचे विस्मरण नक्कीच होणार नव्हते . 
कधी कधी त्यांच्याकडून काकूंना त्यांच्या नावाने हाक येई त्यावेळी त्यांच्या आशा खूप पल्लवीत होत पण खूप थोड्यावेळासाठी .... 
काकाचे हे विस्मरण काकूंच्या खूप जिव्हारी लागले होते पण काकांसाठी त्या स्वतःला सावरत होत्या , पण त्याही खूप खचून गेल्या होत्या . 
काकांचे मित्र घरी येत पण त्यांच्या डोळ्यातील अनोखळी पण पाहून गलबलून येत असे त्यांना .
थोडावेळ जरी स्वतःची ओळख नाही पटली , छोट्या छोट्या गोष्टी नाही आठवल्या तर किती अस्वस्थ व्हायला होते .... 
काकांची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिड चिड होऊ लागली ,  सगळ्याच्या डोळ्यात त्यांना फक्त सहानभूती दिसत होती आणि त्याचा त्यांना त्रास होत होता , काकूही त्यांना समजावून थकल्या पण एकतर आजारपण आणि हट्टी स्वभाव त्यामुळे यात काहीच फरक पडत नव्हता , त्यांच्या अशा वागण्यामुळे काकू खूपच खचत गेल्या . 
काकांना आधार देता देता स्वतःचा आधार हरवत होता हेच त्यांना नाही कळाले  काकांना सोडून गेल्या त्या कायमच्याच ....... 
यानंतर काकांनी आपल्या घराला ओळखले पण आता त्या घराला मात्र काकांची ओळख पटत नव्हती.....  

Tuesday, June 28, 2016

एक आजी इकडची आणि तिकडची




                          भारतातून अमेरिकेत येऊन आजीला ३-४ महिने झाले होते , आजीच्या स्वभावामुळे शेजारच्या जेनी आजीशी लगेच तिची गट्टी जमली . जेनी आजीला पण बोलायला खूप आवडायचे , आम्ही तिच्या घराशेजारी राहायला जायच्या आधीही तिथे एक भारतातीलच कुटुंब होते त्यांच्यामुळे आजीला थोडे थोडे हिंदी यायचे  . माझी आजी शुद्ध मराठी बोलणारी पण इतक्या लांब येऊन मैत्रीण मिळत आहे बघून तीही जेनी आजीशी  तोडके मोडके मराठी मिश्रित हिंदी बोलायची . दोघींचे बोलणे ऐकून बाकींच्याची छान करमणूक व्हायची .

जेनी आजी रोज सकाळी लवकर उठून  ताजा ब्रेड आणि भाजी आणायला बस मधून जात असे ,  तसे म्हणले तरी तिचे वय सत्तरीच्या पुढे असेल पण तिच्याकडे बघून अजिबात तसे वाटत नव्हते .  रोज ताजा मल्टिग्रेन ब्रेड , भाज्या , दूध यामुळे मी इतकी फ्रेश असते असे तीच म्हणत असे . तिच्या गोऱ्या लालसर गालावरच्या  सुरकुत्या ती हसल्यावर आणखीच गोड दिसत . कधी कधी ती माझ्या आजीलाही सोबत घेऊन जात असे आणि माझी आजी म्हणजे सगळे गूगल तिच्या सगळ्या घरादाराची माहिती हिला एका आठवड्यात कळाली . 
                        इतके दिवस आम्हाला माहीतही नव्हते की जेनी  आजीला दोन मुले आणि एक मुलगी आहे सगळे इथेच रहातात पण जरा दूर आहेत , कधी कधी ते येत असतात कधी आजी  तिकडे जात असते . 
तसे मुले असून एकटेच राहणे इकडे काही फार मोठी गोष्ट नाही. पण तरीही लहानपणापासून तसे संस्कार असलेल्या मनाला थोडे खटकतेच . 
उन्हाळा सुरू झाल्यावर तर या दोन मैत्रिणीचे संध्याकाळी फिरायला जाण्याचे प्लॅन बनू लागले , दोघी निवांत भटकून येत असत आणि जेनी आजीला सगळी माहिती होती त्यामुळे काळजीचे काही कारण नव्हते . 
ती आजीला इकडच्या रितीभाती सांगत असे तर आजी तिच्या ... 
माझ्या आजीने जेव्हा जेनी आजीला सांगितले की तिचे लग्न ती फक्त १५ वर्षाची असताना झाले होते तेव्हा तिला खूपच धक्का बसला होता . मग काय आजीने कॅसेट सुरू केली कशी तिची सासू होती , एकत्र कुटुंब , सगळ्याची खाणीपिणी आवड निवड .....  ती आज ती कशी आहे यावर येऊन संपली . 
जेनी आजीही काही कमीची नाही तिनेही तिचे बॉयफ्रेंड कसे होते परत तिचे लग्न कसे झाले हे सांगितले  अशाच त्यांच्या गप्पा नेहमी रंगलेल्या असत . दोघीनांही एकमेकींची खुप सवय झाली होती पण आता आजीला भारतात परत जावे लागणार होते त्यामुळे होता होईल तेव्हढा वेळ त्या दोघी एकत्रच  घालवत . 
जेनी आजीला माझ्या आजीचे खूप कौतुक वाटत असे  , ती तिच्या मुलांबरोबर राहते , सगळे गुण्यागोविंदाने राहतात . मुले आपल्या आईचा ,नातवंडे आजीचा मान ठेवतात . हे सगळे तिने आजीला एकदा बोलूनही दाखवले .
                त्यावेळी माझी आजी म्हणाली अग बाई दिसते तसे नसते , आता माझ्या पूर्वपुण्याईने म्हण किंवा आणी काही म्हण निघाली माझी मुल चांगली , ती आपल्या आई वडिलांचा मान  ठेवतात पण सगळीकडे असे आहेच असे नाही  . आमच्या इथेही  कमी वृद्धाश्रम  नाहीत , मुलांचे सुनेचे पटत नाही म्हणून वेगळे राहावे लागणारेही आहेतच  पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही ना ग !!!!
 जेनी आजी म्हणाली , असेलही असे पण आमच्या इथे मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र आयुष्य जगायची मुभा दिली जाते त्याची स्पेस जपली जाते , पण इथे आम्हीच कुठेतरी कमी पडतोय ग असे वाटते पुढे जाऊन ....... संपूर्ण आयुष्य स्वतःच्या विचारानुसार घालवलेले असते पण कधी तरी यावेळी एकटी असे बसले असताना कुणाची तरी सोबत असावी असे मनापासून वाटते . 
 
मला वाटत होते की तुझे आयुष्य माझ्यापेक्षा किती सुरेख आहे कसली चिंता नाही फक्त आपण आणि आपले आयुष्य जगायचे , कुणी अडवणूक करायला नाही की विचारायला नाही  की ,  तुम्ही असे का करता ? इतका पैसा या वयात कशाला लागतो तुम्हाला ? आधी  सासरचे परत मुलांना शिंगे फुटली की ती !! सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जगायचे यात आपल्यासाठी म्हणून असा वेळच नाही कधी मिळाला ..... आजी बोलत असताना जेनी आजी मध्येच म्हणाली ,  हो खूप घेतला वेळ स्वतः साठी पण जेव्हा कधी अशी तुमच्या लोकांची एकत्र आई बाबा मुले आजी आजोबा अशी फॅमिली पहिली की वाटते आपण कधी का नाही बसू शकलो या फ्रेम मध्ये ?  लहानपणापासून आम्ही जे पाहिले तेच केले .. कधी आम्ही मुलांना वेळ दिला नाही की मुलांनी आम्हाला ... 

जेनी , आमच्यातही असेच आहे ग लहानपणापासूनचे संस्कार जे आमच्या आई बापाने केले तेच आम्ही करत आहोत तेच चूल मुलं , रांधा वाढा ... सणवार ... मुली सुनांचे बाळंतपण .... सगळ्यांचे केले पण ....... !!!!
पण हा  असतोच ग शेवटी कुठे ना कुठे  ... नाहीतरी म्हणलेलेच आहे  , " जगी सर्वसुखी असा कोण आहे , विचारे मना शोधूनि पाहे ! "
जेनी आजीला काही कळाले की नाही ते माहीत नाही पण तिने मान डोलावली आणि हलकेच डोळे टिपले आणि आजीनेही ... !!!

 


 
 

Wednesday, June 22, 2016

भातुकली

" ए नाही ग ! आज माझा बाहुला आणि तुझी बाहुली .. नेहमी का म्हणून माझ्या बाहुलीने सासरी जावे कधीतरी येउदे ना तुझी बाहुली पण माझ्या घरी !"
नेहमी चित्रा माझ्या बाहुलीला घरी घेऊन जात असे म्हणून आज मी  तिचे काही एक ऐकायला तयार नव्हते . आज माझा बाहुला आणि तिची बाहुली असा हट्टच होता  माझा ...
मी आणि चित्रा नेहमी आमच्या गच्चीवर हा आमचा भातुकलीचा डाव मांडायचो . तिची थोडी खेळणी आणि माझी अशी मिळून आमची दुपार मस्त जायची कधी कधी घरचे ओरडायचे बास करा आता, खऱ्याखुऱ्या संसारावेळी नाकी नऊ येतील आता खेळताय लुटुपुटुचा खेळ !!!
तेव्हा हे कळण्याइतके ना ती मोठी होती ना मी आमचे आपले विश्वच होते त्यात रमलेल्या आम्ही दोघी ..

मला भातुकलीची खूप आवड कुठेही गेले तरी मी  घरी येताना घेऊन येत असे ,, अजूनही माझ्याकडे लाकडी , स्टील , चिनीमाती ,प्लास्टिक सगळ्या भातुकली आहेत .
 दुपारच्या वेळी माझा अन तिचा डाव रंगलेला असायचा कधी बाहुला बाहुलीचे लग्न , कधी बारसे , तर कधी एकमेकींचे वाढदिवस ...  वाढदिवसावेळी आम्ही मारीच्या बिस्किटाचा केक करायचो ..
दुपारी आई झोपली असताना हळूच एखादा बटाटा , कांदा , चिरमुरे , कच्ची मोहरी जिरे , तिखट सगळे गोळा करणार आणि आईने केलेल्या पोळ्यांचे छोटे छोटे घासाचे तुकडे करून ठेवायचे ...
जेव्हा आमची जेवायची वेळ असेल तेव्हा या कच्च्या भाज्या त्या पोळी सोबत खायच्या  आणि परत जसे मोठी माणसे जेवणानंतर गोळी घेतात म्हणून आम्हीही चिरमुऱ्याची गोळी घेत असू ....  किती निरागस विश्व असते बालपणाचे ...
जेवण झाल्यावर झोप मग परत खोट्या कपात खरे पाणी आणि  साखर  घालून तोच चहा म्हणून पिणार , संध्याकाळी  फिरायला बाहुला बाहुलीला घेऊन बागेत जायचे.
आमचा खेळ पूर्ण सुट्टीत रंगलेला असायचा आम्हाला दोघीनांही कधीही कंटाळा यायचा नाही . मला जितके आठवते त्याप्रमाणे आम्ही आठवी नववी पर्यंत आमचे हे उद्योग करत होतो .
नंतर भातुकली संपली आणि आम्ही शाळा सोडून कॉलेजला जायला लागलो , तिने जेमतेम बारावीची परीक्षा दिली असेल आणि तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले  ... तेव्हा फक्त मला इतकेच कळत होते की ही आता माझ्या पासून दुरावणार ,माझ्या  लहानपणी आई सारखे एक गाणे म्हणायची

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी
 ज्यावेळी तिचे लग्न ठरले तेव्हा मला असे वाटले की हे गाणे आमच्या दोघींसाठीच आहे पण या गाण्याचा खरा अर्थ मला पुढे जाऊन समजणार होता हे तेव्हा कुठे माहीत होते ?
 ती तिच्या सासरी जाताना मी माझी बाहुली तिला दिली माझी आठवण म्हणून आम्ही दोघोही खूप रडलो शेवटी तिची पाठवणी झाली .
मीही माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडले . मी सुट्टीच्या दिवशी घरी जात असे तेव्हा कधीतरी ती आली असेल तर तिची माझी भेट होई लग्नानंतर फारच अबोल झाली होती ती .  मी तिला फोन करूनही बोलू शकत नव्हते , ती नवी नवरी तिकडे काय म्हणतील तिला म्हणून ... शेवटी सगळा काय तो समाज !!!!!

तसेही ती खूप सुखी असल्याचे मला सांगत होती पण एकदा तिची आई  बोलताना ऐकले होते की तिचा नवरा दारू पितो म्हणे !!!! आधी सगळ्यांना सांगितले होते नोकरी आहे पण तिच्या नवऱ्याने लग्न झाले आणि एक महिन्यात नोकरी सोडून दिली .. जणू काही फक्त लग्नासाठीच नोकरी करत होता , आता कसे होईल पॊरीचे या
विचाराने ती माउली अस्वस्थ होत होती ...
मला मात्र खूप राग येत होता याआधी सगळे नीट पाहता येत नव्हते का ? किती लवकर केले तिचे लग्न ? मी आईला म्हणत असताना आईने मलाच गप्प केले .... ??
 आता दिवाळी होती म्हणू मी घरीच होते तीही  येणार होतीच पहिला दिवाळी सण ...
ती आल्यावर मी तिला पाहून थक्कच झाले चक्क ती ५ महिन्याची गरोदर होती !! आणि मला कुणी काहीच सांगितले नाही अगदी आईनेही .....
आईचे मत पडले अशा गोष्टी लवकर उघड करत नाहीत ....  आता काय ती लवकर जाणार नाही हे माहितीच होते मला ... दिवाळी झाली मी कॉलेज साठी गेले तरी ती तिथेच होती आता म्हणे सगळे आवरून जाणार महाराणी !!! मला नेमका कुणाचा राग येत होता हेच कळत नव्हते ? एकतर हिचा नवरा स्थिर नाही त्यात हिची अवस्था!!!! या साध्या गोष्टी तिला कळू नयेत का ?
 एक दिवस दुपारीच आईचा फोन आला की चित्राला मुलगा झाला ,,, तरी बरे तिला मुलगा झाला म्हणून .... मुलगी असती तर परत तिच्या सासरचे काय म्हणाले  असते देव जाणे !!!!!

मुलाचे बारसे अगदी थाटामाटात केले त्यावेळीही मला आमच्या  भातुकलीचा डाव आठवत होता ... काल परवा पर्यंत खोटे  डाव मांडता मांडता आज ही खरी भातुकली उभीही झाली होती ....
 ती परत तिच्या सासरी राहायला गेली , आता तिचे येणे जाणे वाढले होते मुलामुळे ... ???
या सगळ्यात तिच्या चेहऱ्याचे हास्यच गायब झाले  होते  खूप चिडचिडी झाली होती !!!
पण दिवस नाही राहत कुणासाठी बघता बघता तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस झाला .. आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच तिच्या नवरा आजारी पडला अति दारूमुळे तिथून पुढचे पंधरा दिवसच सगळे आलबेल होते पण त्यानंतर सगळा खेळ संपला होता ......
त्यादिवशी प्रथमच ती लग्नानंतर  माझ्याजवळ खूप मनमोकळेपणाने रडली ... नियतीने तिची खूप परीक्षा घेतली होती अजूनही घेत आहे  कदाचित पुढे काहीतरी चांगले होईल तिच्यासोबत ....  पण त्यावेळी  मात्र  मला गाणे आठवत होते ....

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी ....

हुरहूर

आज ती ऑफिसमधून नेहमीपेक्षा जरा लवकरच आली , नुकताच पाऊस पडून गेला होता आकाश सगळे मोकळे होऊन मावळतीला जाणारा सूर्य त्याचे लाल ,केशरी रंग उधळत होता . हवेत थोडासा गारवा होताच हातात चहाचा काप घेऊन ती बाल्कनीत आली आणि त्या अस्ताला जाणाऱ्या लाल गोळ्याकडे पाहून तिच्या मनातील हुरहूर वाढू लागली ....
" का दिसला आज अचानक तो मला ? किती विसरायचा प्रयत्न करत होते मी त्याला ? आता कुठे त्याच्या शिवाय जगायची सवय होत होती आणि आज अचानक परत तो दिसावा ? "
त्याची आठवण नकोच म्हणून ती अशा या कातरवेळी कधीच एकटी राहत नसे , ती एकटी असली की  त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या सायंकाळ , त्यांची ती स्वप्ने , सगळ्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरून अगदी सिनेमा सारख्या भरभर पळत .... 

 कॉलेजच्या शेवटच्या वर्षी हिच्या बाबांची अचानक बदली होऊन ते सगळे पुण्यात रहायला आले , अचानक तिचे सगळे विश्वच बदलले .. तिला एकटीला ठेवायची तिच्या बाबांची तयारी नव्हती त्यामुळे नाईलाजाने तिलाही सगळे सोडून यावे लागले होते , पण या नवीन कॉलेजमध्येही तिला खूप नवनवीन मित्र मैत्रणी मिळाले मुळातच ती खूप बोलकी तिचे सूर कुणाशीही पटकन जुळायचे . 
    यावेळी कॉलेज गॅदरिंग मध्ये तिने नाटकात भाग घेतला होता त्यांचे रोमँटिक नाटक  यात तो रोमिओ आणि ती ज्युलिएट इथूनच त्यांची खरी कहाणी सुरू झाली . नाटक करता करता कधी खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे रोमिओ ज्युलिएट बनले हे त्यांच्याही लक्षात नाही आले . नाटक प्रॅक्टिस करताना कधी कधी खूप उशीर होई त्यावेळी तो  तिला घरी सोडायला जाई , तिच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही त्याच्या पटकन लक्षात येई त्याने त्यावर काही दाद दिली की हिने गोड स्माईल द्यावी .... 
असे हे चंदेरी दिवस पटकन सरतात तसेच झाले कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले , दोघेही नोकरीच्या मागे लागली एकाच कंपनीत नसली तरी दोघानांही लवकरच चांगली नोकरी मिळाली .. रोज संध्याकाळी एकत्र भेटायचे टेकडीवर फिरायला जायचे मावळत्याला स्मरून खूप स्वप्ने रचायची आणि त्या स्वप्नांच्या इमल्यातूनच घरी परतायचे हेच त्यांचे रोजचे रुटीन .... 
तिच्या घरी याच्याबद्दल सगळे माहीत होते आणि तिच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती .. पण त्याच्या घरी अजून काहीच सांगितले नाही ... तसे म्हणायला त्याच्या आईला थोडी कुणकुण लागली होतीच पण तिने काही त्याला विचारले नव्हते .... त्याच्या बाबांना बिझनेस मधून सवड मिळेल तेव्हा खरे !! पण त्याच्या घरचे वातावरण जरा कडकच म्हणूनच तो सांगायला बिचकत होता ...... 
एक दिवस अचानक काय झाले माहीत नाही पण तो परदेशी उडून गेला हिला एकटीलाच मागे ठेवून काही न सांगता , काही न बोलता .... हिच्या मनाचा जराही विचार त्याने केला नाही ... मागे ही एकटीच सैरभैर झालेली....  कधी कधी टेकडीवर जाऊन बसे त्याच्या आठवणी काढत ,, 
किती दिवस ? किती रात्री ? शेवटी एके दिवशी तिने ठरवले आता जगायचे ते फक्त स्वतःसाठी आपल्या आई बाबांसाठी !!!!  आता कुठेतरी सगळे नीट होत होते आणि तो असा समोर अचानक !!!!
फोनचा आवाज ऐकून ती  तंद्रीतून बाहेर आली  रात्रीचे आठ वाजले होते हातातल्या कपात चहा तसाच होता  
त्याचाच फोन होता ... घेऊ का नको या विचारात असताना कधी कॉल रिसिव्ह झाला तिला समजेलच नाही 
 तो ........ 
ती .... 
अग बोल ना !
कॉल तू  केला आहेस तू बोल !!!
ऑफिस झाल्यावर भेटशील का मग बोलू ? 
तिच्या मनात नसतानाही तिच्या ओठांनी हो उत्तर दिले .... 
 आता वाट पाहायची ती उद्या संध्याकाळची ..... 
ऑफिसचा  तिचा दिवस लवकर संपेना तो काय सांगेल ? का माफी मागेल ? अजूनही त्याचे माझ्यावर तितकेच प्रेम असेल ? एक ना अनेक विचारांनी तिचे डोके भरून गेले होते . 
 शेवटी ते दोघे जिथे भेटायचे तिथे येऊन भेटले आणि आधीच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसले ... आजही वातावरण तसेच होते मंद वारा , समोर तो लालबुंद गोळा , आजू बाजूला फिरायला येणारी माणसे ..... फक्त फरक होता तो त्यांच्या शांततेत .... नेहमी त्यांना हवी असणारी शांतात असायची त्यांच्यात पण आज असणारी ती वेगळीच होती .... 
त्यानेच विचारलॆ कशी आहेस ? 
बरी !!! एका शब्दात उत्तर .....  
मला माहीत आहे की तू माझ्यावर नाराज आहेस ते !! पण त्यावेळी माझा नाईलाज होता मला तसे वागावे लागले ... 
ह्म्म्म!!!! तिची नजर शून्यात होती ...
अग काहीतरी बोल ना ! तुला रागवायचे असेल तर रागाव ओरड माझ्यावर पण अशी शांत नको राहू ... 
ज्यावेळी मला खूप बोलायचे होते त्यावेळी  तू सोबत नव्हातास ,, ज्यावेळी खूप खूप ओरडायचे होते  रागावयाचे होते त्यावेळी मला आधार द्यायला तुझे खांदे नव्हते ... का ओरडू आता मी तुझ्यावर ? कशासाठी ?
तो .....  मला मान्य आहे ग !!! पण त्यावेळी बाबांनी मला अचानक परदेशी पाठवले , तुझ्याशी कोणताही संबंध नाही ठेवायचा असे सांगितले ... मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पण ते काहीच ऐकत नाहीत हे पाहून मी हो म्हणालो आणि गेलो निघून मला वाटले थोड्या दिवसाने मी त्यांना समजावले तर ऐकतील माझे तिकडे असतानाही मी त्यांना खूप समजावत होतो पण काहीच फरक पडत नव्हता ... इतके दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहून त्याचे मन जिंकायचा प्रयत्न केला पण ते काही होईना म्हणून इकडे निघून आलो .... 

तुझे सगळे म्हणणे ठीक रे पण यात माझा विचार केलास का तू ? तुला वाटले गेलास सोडून तुला वाटले आलास परत ? यात मी आहे  का कुठे ? कधी एखादा फोन मेसेज मेल तरी करायचा ना मला ?
खूपवेळा वाटले ग  तुला फोन करावा पण काय करू धीरच होत नव्हता मला कसे बोलू तुझ्याशी नि काय बोलू ? आजही खूप हिम्मत करून आलो मान्य मला मी चुकलोय पण तू घेशील का मला समजावून ? 
ती ...... 
अग बोल ना काहीतरी ....  
मला खूप वाटतंय रे घ्यावे तुला समजावून , तुझ्या सगळ्या चुका माफ कराव्यात आणि एक नवीन आयुष्य सुरू करावे ... पण ...... 
तो पण  ...... ?? काय ... ? 
पण ते सारे इतके सोपे असते का ? या आठवणी पुसणे खरेच सोपे असते का ? आज हो उद्या नाही ? म्हणाले असते  तुला हो पण मी तिथून खूप पुढे आलीय .... खरेच तू सोडून गेलास याचे दुःख झाले मला , खूप रडले ,,, स्वतः बरोबर झगडलेही कधी कधी वाटलेही स्वतःला संपवून टाकावे ... पण परत खूप धीराने उभे केले आहे रे स्वतःला आता तिथून मला परत नाही जायचे मागे ...  परत कोसळले तर उभी राहीन याची खात्रीच नाही मला !! आज तू माफ कर मला ..... 
समोर सूर्य पूर्ण बुडाला होता तिची कातरवेळही संपत आली होती आणि आणि आता तिला याची कधी  हुरहूरही राहणार नव्हती आता कसे सगळे स्वच्छ झाले होते निरभ्र .....