Monday, April 4, 2016

तेवणारी वात

         "शुभमंगल सावधान " असे शब्द ऐकले आणि रमा काकुंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणखी एका जबाबदारीतून त्यांना मोकळीक मिळाली . अंजूचे लग्न थाटामाटात पार पडले तिचा जोडीदार तिने शोधला म्हणून काकू थोड्या नाराज होत्या पण होणाऱ्या जावयाला आणि त्याच्या घरच्यांना भेटल्यावर त्यांचा विरोध मावळला . अमित आणि अंजली रमा काकूंची दोन मुले अमितचे लग्न ४ वर्षापूर्वी झाले अपर्णा त्याची बायको आणि आकांक्षा काकूंची  लाडकी नात असा सुखी परिवार .
    आज रमा काकू सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाल्या होत्या , वयाच्या अठराव्या वर्षी देशमुखांच्या घराचा उंबरठा ओलांडला होता त्यावेळी दिसायला बारीक सावळी ,नाक अगदी धारदार ,घारे डोळे आणि मंजुळ आवाजाच्या रमेने सगळ्यांना आपलेसे केले होते अपवाद होता तो फक्त विनायकरावांचा म्हणजे रमा काकूंच्या नवऱ्याचा !!

विनायक रावांना घरात जास्त अडकून राहायला आवडायचे नाही . चंचल स्वभावामुळे त्यांचा पाय घरात ठरत नसे लग्न झाल्यावरहि तसेच वागणे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना समज दिली पण त्यांचे वागणे तात्पुरते बदलायचे परत जैसे थे परिस्थिती असायची . रमा काकुना हळू हळू या सगळ्याची सवय झाली पण त्यांच्या डोळ्यतील वेदना मात्र त्यांना ओळखणाऱ्याला कळे.
 अशातच एक दिवस गोड बातमी रमा काकुना दिवस गेल्याची त्यामुळे रमा काकुना एक नवीन उमेद मिळाली जगण्याची अर्थात झालेल्या जखमा पूर्ण भरून येणाऱ्या नक्कीच नाहीत पण कुठेतरी वाळवंटात पाउस ….!  पहिला मुलगा झाल्यावर विनायकरावहि जरा आनंदले लाडाने त्याचे नाव अमित ठेवले . रमा काकुना आता दिवसही  कमी पडू लागला . अमितच्या बाललीला बघण्यात त्या रमून जात . विनायकरावांच्या वागण्यातील बदल खूप कमी काळ टिकला . अमितला दोन वर्ष पूर्ण झाली बघता बघता आणि आणि अंजली घरी आली
आपल्या दोन मुलांमधून काकुना आता वेळ मिळेना झाला .काकुना वाट्त होते कि आता संसार परत मार्गी लागेल पण एके दिवशी कामानिम्मित परगावी गेलेले विनायकराव परतलेच नाहीत .
 अमित अवघा चार वर्षाचा आणि अंजू दोन वर्षाची काकू तर खूपच खचून गेल्या सासू  सासर्यांनी त्यांना धीर दिला . बाहेरच्या जगाला तोंड द्यायची हिम्मत काकुना त्यांच्याकडूनच मिळाली .काकुना स्वतः च्या पायावर उभे केले सासर्यांच्या ओळखीने कुठल्या तरी पतसंस्थेत नोकरी मिळाली . पण ते दोघे तरी किती दिवस पुरणार होते ?  काकुनी स्वतःला सावरल  त्यांच्या मुलांसाठी आता फक्त त्याच होत्या . हळू हळू मुले मोठी होत होती अमित खूप समंजस आणि हुशार होता ,त्याच्या मानाने अंजू थोडी चंचल पण तिचा  आईवर खूप जीव  होता .

काकुनी दोन्ही मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले . अमित साठी मुली बघायला चालू केल्यावर तर त्यांचे चित्त थाऱ्यावर नसे . त्यांना कसलीतरी खूप भीती वाटत असे पण काही बोलायच्या नाहीत म्हणून एकदा त्यांच्या नणंदेने विचारलेही , वाहिनी " आजकाल खूप काळजीत असता ? मुली बघताना सुद्धा इतका का ओ विचार ? " तेव्हा त्या म्हणल्या ," वन्स , दुध पोळले कि ताकही फुंकून प्यावे हो " यापुढे कुणीच काही बोलले नाही फक्त निरव शांतता …… त्यांच्या डोळ्यातील भावना फक्त त्यांचीच दोन मुले वाचू शकली

पण त्यांच्या सुदैवाने अमितचा संसार सुखात चालू होता आकांक्षा सारखी एक गोंडस मुलगी होती. आता अंजुही मार्गी लागेल तिची पाठवणी केली कि मी मोकळी असे म्हणत त्या एकदम भानावर आल्या . आजूबाजूला गोंधळ चालू होता अंजूच्या लग्नाचा , कितीवेळ मी अशीच बसले होते कुणास ठाऊक म्हणत त्या तिथून उठू लागल्या तितक्यात अमितही त्यांना शोधत तिथे आला .

काकुना घेऊन तो एका टेबलजवळ आला तिथे केक त्यांच्या आवडीचे पदार्थ सगळे होते ते पाहून त्यांना काहीच कळेना . अमितने सांगितले कि परवा आत्या बोलता बोलता म्हणाली कि ,तुझ्या आईला आता या घरत येउन ४२-४३ वर्ष होतील आली,तेव्हा फक्त १८-१९ वर्षाची होती . मग त्या अंदाजानी तुला एकसष्ठ वर्ष पूर्ण झाली म्हणून आज तुझी एकसष्ठी … यावर काय बोलवे काकुना कळेना लग्नापासूनचा सगळा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोरून तरळू लागला .

अंजू आणि अपर्णा एकसष्ठ दिवे घेऊन आल्या ,अमितने आईला बसवले अंजू आणि अपर्णा त्यांचे औक्षण करताना   ते पाहून काकुना लहानपणी मुलांना दिवाळी,शुक्रवार, त्यांच्या वाढदिवसादिवशी केलेली औक्षण आठवू लागली , समोरच्या तेवणाऱ्या वातीमध्ये जणू त्या स्वतःलाच पाहत होत्या सगळेच धुसर झाले होते .
 आज त्यांना या एका क्षणात कधीच काही न मिळून खूप काही मिळाल्यासारखे झाले होते .  

No comments:

Post a Comment