Thursday, May 26, 2016

तुझी न माझी प्रीत

पहिल्यापासूनच तिला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा इथे आल्यापासून तर फक्त ते दोघेच !!!
तो रोज तिच्या आधी उठून स्वतःचे सगळे आवरून तिला ८ वाजता उठवत असे , ८. ३० ला तो घरातुन  ऑफिस साठी बाहेर पडे त्याआधी त्याचा डबा तिला तयार करावा लागे , रोज सकाळी तिला उठवणे म्हणजे एक दिव्य !! सकाळी त्याच्या पहिल्या हाकेत ती उठली आहे असे आजवर कधीच झाले नाही . 
सकाळी उठली कि ती चहा घेत नाही आणि तिला सकाळचा पहिला चहा करायचा कंटाळा आहे , बाकी मी दिवसभर तुला कितीही वेळा चहा करून देईन पण पहिला तेव्हढा कधी करायला सांगू नको हे तिने त्याला लग्नाआधीच सांगून ठेवले होते  . 
 आज सकाळीही त्याने नेहमीप्रमाणे उठून आवरले ,  तिला उठवले , " ८ वाजले उठा आता " . 
 आज संकष्टी त्यामुळे फक्त खिचडी साठी किती दहा मिनिटे लागतील अशा विचारात अजून पाच मिनिटे करत ८. १५ झाले तरी उठलीच नाही , त्याला आज बरोबर ९ ला मिटिंग  होती त्यासाठी वेळेत पोहचायचे होते , त्यामुळे त्याचा पारा चढला . त्याच्या आवाजाने ती उठली आणि किचन मध्ये जाऊन कामाला लागली , तिचीही  जरा धुसफूस चालूच होती ,  
तो , "काय ग कधीतरी उठते का लवकर ? नेहमी आळशीपणा , कधी वाटत नाही लवकर  उठून आवरावे , किती जीवावर येते ना उठायचे ? "
 जरी उशिरा उठले तरी वेळेत जातोस ना  कधी तरी लेट झाला का माझ्यामुळे ? आणि कितीही गडबडीत तुला पोळी भाजी करून  दिली तरी चव आहे तीच असते ना ? का बदलते ? 
 तिनेही जर घुश्यातच डबा आणून दिला , त्यानेही तिच्याकडे न बघता  तो घेतला आणि तो पायात बूट घालू लागला , ती त्यावेळी त्याला बाय करण्यासाठी नेहमी तिथेच थांबायची पण आज मूड वेगळाच असल्यामुळे आत निघून गेली , तोही काही न बोलता ऑफिसला गेला . 
आता ती  घरी एकटीच संध्याकाळी ६ पर्यंत इकडे दूरदेशी कुणी ओळखीचे नाही बोलयला कि कुठे बाहेर जायला .
हेच रोज रोज करून तिला कंटाळा आला होता , तसे त्याचेही रुटीन तसेच असे . पण त्याला कधी का कंटाळा येत नसेल ? याचा विचार करून ती कधी कधी थकून जायची पण तिला उत्तर कधीच मिळत नसे . 

त्यालाही माहिती होते कि दिवसभर घरी एकटी बसून कंटाळते , तिला एकटीला बाहेर कुठे  जायला आवडत नाही कुणाची सोबत असेल  तर लगेच खुश होऊन जाईल , इथे आल्यापासून तिचे सगळे रुटीनच बदलेले आहे अगदी खाण्यापिण्या मध्ये सुद्धा  , वातावरण सगळेच पण तरीही तिने माझ्यासाठी सांभळून घेतले आहे . 
तशी ती रोज तक्रार करण्यातली नाही पण महिन्या दोन महिन्यातून बाईसाहेब एक दोन दिवसासाठी अशा वेगळ्याच अस्मानी मूड मध्ये जातात , आता त्यालाही याची सवय झाली होतीच आणि  तिला कसे मूळपदावर आणायचे हे त्याला माहिती होते . 
   इतका कसला राग ? आज अजून ऑफिसला पोहचला नसेल हा ? रोज तर २५व्या मिनिटाला फोन येतो आणि आज अजून नाही ? चिडला आहे  ना  मग मीही नाही करत अजून जरा चीड . तरीही त्याच्या फोनची वाट बघत तिनेच  मेसेज  केला . खिचडी कशी झाली आहे  ? खारट ना ? त्याला शालजोडीतला मारायचा प्रयत्न …. पण त्याचे उत्तर हि तसेच नाही खारट नाही पण झणझणीत झालीय !!!
     तीही परत गप्प बसली आता संकष्टी आज मोदक करायला हवेत नाहीतर त्याला परत टोमणे मारायला निम्मितच मिळेल . तसेही मोदक खायला त्याने गणपती बाप्पाच्या हातावर हात मारला आहे आणि आता तसे व्हायलाही लागले आहे लंबोदर !!!  स्वतःच्या विचाराने खुदकन हसली . 

तिची तयारी चालूच होती तितक्यात तो आला , आज लवकर ? तिचा प्रश्न 
हो आलो ! सांगितले बॉस ला आज लवकर नाही गेलो तर खाण्याचे वांदे  होतील माझे !!  त्यालाही बायको आहेच समजले असतील माझे हाल ! 
 अग बाई हो का ? मग रोज रोज बरा तो तुझा बॉस त्याला बायको आहे ते विसरतो  ? 
आता आलो आहे ना लवकर चहा मिळेल का ? जरा कडकच !! तिने त्याच्याकडे पहिले त्याचा मूड वेगळाच दिसत होता .
ती ,"  नाही आज कैरीचे सरबत आहे चालेल का ? थोडे आंबट थोडे गोड ?  "
त्याला समजले कि हळू हळू नूर पालटतोय 
 हम्म ठीक आहे दे आता तुला हवे ते ! आम्ही काय तुमच्या शब्द बाहेर थोडीच ? 
" हो का ? मग सकाळी सकळी जे काही झाले ते रामायण फुकटचच  का ? "  
अग बाई  कधी कधी तुला चार्ज करावे लागते असे नाहीतर जाशील न माझ्या हातातून !! आणि तू थोडी चार्ज झाली कि जरा जास्तच गोड दिसते नाही का ? अगदी सकाळच्या खिचडी सारखी !!!
 अरे देवा  म्हणजे खिचडी गोड झाली होती का ? sorry हा परत उठेन हो लवकर तुम्ही म्हणता तसे . 
अग नाही ग छान झाली होती ! अशीच थोडी मजा !! 
 असुदे तरीही माझा तुझ्यावर नाहीय विश्वास , मी कसेही दिले तरी तुला ते गोडच लागेल माहितीय मला ! 
पुढच्या वेळेपासून पक्का लवकर उठेन !  आणि स्वतःच्या मनातच…….  आज कितव्यांदा बोलत असेन मी ? पण तरीही तो काहीच म्हणत नाही . मीच आपली उगीचच चिडत असते त्याच्यावर !!! 
" बर चल मग आज काय ? करायचे ते सांग ? " तो 
आज काय मोदक ! गणपती बाप्पासाठी आणि माझ्या लंबोदर साठी सुद्धा !!!  असे म्हणत तिने जीभ चावली . 
तू  मला , मला लंबोदर  म्हणतीय ?  थांब बघतोच आता तुला मी ! ! 
काय बघणार आहेस ? रोजच तर बघतो ? चल आता मदत करायला मी उकडीची तयारी करते तोपर्यंत तू सारण कर . मग बघ  मला ! 
 चला बाईसाहेब , आजच्या मोदकासाठी साक्षात या गणपती बाप्पाची उर्फ लंबोदराची मदत होणार तर !! 
 मनातल्या मनात तो चला आता मूड ठीक झाला आहे कधी कधी असतेच न एखादी वेळ वेडी आणि लहरी अगदी हिच्यासारखी  !!!!  
    

Wednesday, May 18, 2016

मेस काकू

" काय ओ काकू ,मी तुम्हाला नेहमी आठवण करून देते माझा गुरुवार आहे म्हणून  एखाद्यावेळी मी विसरले तर इतके काय ओरडता मला ? "
माझ्या डोक्यात नाही राहत बाई ! कितीजणी तुम्ही मेसला प्रत्येकीचे वेग वेगळे नखरे मी कुणाचे म्हणून आणि काय काय लक्षात ठेवायचे ?  असा संवाद मी आणि आमच्या मेसच्या काकू आमच्यात महिन्यातून एखाद्यातरी गुरुवारी रंगायचाच . 
 मी  आदल्या दिवशी उद्या खिचडी म्हणून आठवण करून द्यायला विसरले कि ,  समजायचे उद्या रामायण…
आमच्या रुमच्या मागे  दोन खोल्यांचे एक छोटे कौलारू घर होते तिथे काकू त्यांच्या छोट्या मुला सोबत राहत . गळ्यात एक छोटी चेन , हातात  २-३ काचेच्या बांगड्या , कपाळावर एक नाजूक अशी उभी टिकली आणि थोडासा फुगवटा करून घातलेली केसांची वेणी  , जर घरातून बाहेर  जाणार असेल तर दोन्ही खांद्यावर पदर असे रूप काकुंचे , त्यांचा मुलगा ८-९ वर्षाचा असेल अल्लड , थोडासा हट्टी आणि  नेहमी आमच्यासोबत वाद घालयला तयार  अशा आवेशात  त्याच्या वयाला शोभेल असाच होता तो  !!!
आम्ही तिथे रहायला गेलो आणि त्याच वर्षी काकुनी नवीन मेस चालू केली ,  आम्ही सगळ्याच दहा -पंधरा जणी त्यांच्याकडेच जेवायला , प्रत्येक सेमला नवी मेस हे आमचे ब्रीदवाक्य असल्यासारखेच आम्ही मेस बदलत असू  अपवाद फक्त या काकूंच्या मेसचा तिथे जास्त दिवस आम्ही टिकलो कदाचित नवीन मेस , थोडीफार घरगुती जेवणासारखी चव , आणि त्या नवीन असल्यामुळे आमचे नखरेही चालवून घायच्या पहिले पहिले … कधी कधी सकाळी , संध्याकाळी  पोहे , उप्पीट , चहा  असे कधी ऐनवेळी सांगितले कि आधी त्यांचा दंगा  मग  अगदी मी आहे म्हणूनच तुम्ही खाताय असा चेहरा करून आम्हाला खायला  करून द्यायच्या .

एक दिवस मला बरे वाटत नव्हते म्हणून मी रुममध्येच थांबले होते  त्यावेळी कधी नाही ते त्यांच्या घरातून मोठ्याने बोलण्याचा आवज येत होता , खरे तर त्यांचा इतिहास आम्हाला तसा काहीच माहित नव्हता आणि आम्ह्लाही कधी तो जाणून घ्यायची गरज पडली नाही . मलाही कळेना जेवायला जाऊ कि नको थोड्यावेळाने आवाजही कमी झाला  मग काकुनीच बोलावले जेवायला .  मीही एकटीच होते त्यांचा मुलगा शाळेत गेला होता  त्यामुळे रात्रीच्या जेवणाची तयारी करत त्याही माझ्यासमोरच बसल्या .
मी असे कधी एकटी त्यांच्याकडे जेवण्याची वेळच आली नव्हती त्यामुळे मलाही थोडे अवघडल्या सारखेच झाले होते . पण त्यांनीच बोलायला सुरुवात केली .
श्वेता , अठराव्या वर्षी लग्न झाले माझे माझा नवरा एका गाडीवर ड्रायव्हर होता , शेती होती  घर भरलेले म्हणून  आई वडिलांनी लग्न करून दिले त्यानंतर  दोन वर्षांनी हा एक पोरगा झाला , अवघा  ८-९ महिन्याचा असताना याचा बाप एका अपघातात गेला , तो गेल्यावर सासरच्यांनी घरात राहून दिले नाही बाहेर काढले , माहेर गेले पण तिथे तरी किती दिवस राहणार ?  भावांच्या बायकांना मी जड झाले ,  आपला बोजा त्यांच्यावर नको म्हणून एका दुकानात नोकरी करू लागले , तर पोरग एकटे घरी  ,माझ्यामुळे माझ्या आई बापाला  म्हातारपणात त्रास देऊ लागल्या . तिथले काम सोडून इथे येउन राहिले पहिला पहिला एकटी बाई म्हणून घर मिळेना कसेतरी एक खोली मिळवली , एका कपड्याच्या दुकानात नोकरी मिळाली पहिला पोराला घेऊन जात होते ,परत त्या मालकाने सांगितल्यावर त्याला तिथल्याच एका अंगणवाडीत बसवू लागले . त्या बाईने ऐकले म्हणून झाल हे नाहीतर सगळी परिस्थिती अवघडच होती ,  पण या कामामुळे पोराकडे लक्ष द्यायला वेळ मिळेना , हातातून जावू नये यासाठी घरीच राहून काही करता येईल का बघत होते . पण आता होते तिथे काही करणे शक्य नाही म्हणून ओळखीने इकडची जागा मिळवली आणि आता या नव्या जागेत मेस सुरु केली , आता कुठे याचा जम बसायला लागला तोच , माझ्या सासरच्या लोकांचा मान  वर उफाळून आला  , हे असले उद्योग आमच्यात कुणी करत नाही म्हणून लागले सुनवायला , आमची अब्रू वेशीवर टांगायला निघाली वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतात , तशी मी आहे ग खमकी पण कधी कधी नाही सहन होत , काय माहिती कधी पर्यंत जगते ते ? पोराला शिकून मोठे करायचे  इतकेच डोळ्यासमोर आहे तोपर्यंत टिकले तरी बास !!! असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे पाण्याने डबडबले .
 मलाही काय बोलावे समजेना तसाच हात घेऊन बसले होते , परत काकूच म्हणाल्या तुला काय वाटते ग काय असेल माझे वय ?  त्यांच्याकडे पाहून तरी आम्हाला सगळ्यांनाच त्या ४०-४५च्या वाटायच्या , पण त्या फक्त तिशीत होत्या हे ऐकून मला धक्काच बसला कारण खरेच काकूंकडे पाहून असे बिलकुल वाटत नव्हते कि त्या इतक्या लहान असतील आमच्या सगळ्यांपेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या !!!
परिस्थितीमुळे आलेले अकाली प्रौढत्व , त्या चेहऱ्या वरच्या सुरकुत्या , आणि डोळ्यातील करुणा  माणसाचे रुपडेच बदलून टाकते  याचे मूर्तिमंत उदाहरण होते .
त्या कधी खूप चिडायच्या , ओरडायच्या आम्हाला याचा खूप राग यायचा पण त्यामागे अशी कहाणी असेल असे कधी वाटले नव्हते ते कळाले तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटले .
 आम्ही त्या ठिकाणाहून परत दुसरीकडे राहायला गेलो त्यामुळे त्या काकूंची मेस बंद केली ,
परत कधी संपर्कच नाही माहित नाही त्या कशा असतील ?
पण काही माणसे खरेच मनात राहतात  ……




Saturday, May 14, 2016

अबोल प्रीती

" मुग्धा , आहेस का ग घरी ?"  असे म्हणत शेजारच्या आजी त्यांच्या घराच्या पायरीवर येउन बसल्या .
 मुग्धा बाहेर आली ,  तिलाही रोजची सवय होती आजींची , संध्याकाळी तिची काकू बाहेर फिरायला जाई त्यावेळी आजी खास मुग्धाला भेटायला यायच्या हे तिला माहित होते . आजी आल्या कि तिलाही कुणीतरी आपले भेटल्या सारखे वाटे.
आजींनी  तिच्यासाठी कुंद्याची फुले आणली होती  तुला आवडतात ना  म्हणून खास तुझ्यासाठी काढून ठेवली होती , मुग्धाकडे फुले देत आजी बोलल्या .
कुंद्याचा वास घेताना मुग्धाला आईची आठवण आली आपण लहान होतो त्यावेळी आई नेहमी गजरा करून देत असे . मुग्धाचे डोळे आईच्या आठवणीने भरून आले . किती दिवस झाले तिला भेटून ?
तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून  आजीनी विचारले , का ग ? काय झाले ?
 तसे मुग्धा स्वतःला सावरत म्हणाली काही नाही सहजच असे म्हणत आत गेली , आजींसाठी तिने चहा ठेवला, स्वतःच्या विचारात  गुंगली .
  लहानपणापासून आई बाबांची लाडकी मुग्धा, शेजारीही खूप लाडकी होती . शाळेतही तिचा नेहमी पहिला नंबर असे  त्यामुळेच तिला पुढे खूप शिकवायची तिच्या  आई बाबांची इच्छा  होती , पण जिथे ती राहत होती तिथे चौथी पर्यंत शाळा होती , त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी तिला बाहेर जावे लागणार होते .  तिच्या घरी  पुढे शिक्षण कुठे सुरु ठेवावे याची चर्चा चालू असे , त्यावेळीच तिची काकू सुट्टीसाठी म्हणून गावी आली होती , काकूने हे ऐकताच ती मुग्धाच्या आईला म्हणाली , राहील मुग्धा आमच्या कडे , एकट्या मुलीला बाहेर ठेवण्यापेक्षा हे बरे नाही का ?
खरे तर त्यावेळी सगळ्यांचीच मनस्थिती  द्विधा होती  पण काकू स्वतः हून म्हणत आहे म्हणल्यावर आई बाबा तयार झाले मुग्धाला त्यांच्याकडे ठेवायला .
 काकुसोबतच मुग्धा शहरात आली , काकूला दोन मुले होती पण ती मुग्धापेक्षा लहान होती . मुग्धाची शाळा सुरु झाली  त्यासोबत तिची जबाबदारही वाढली , काकू हळू हळू तिला कामे सांगू लागली , आधी फक्त काकुच्या मुलांचे खायला प्यायला बघणे , त्यांचा अभ्यास असे होते . मुग्धाही आनंदाने करत असे , पण एकदा काकुच्या मोठ्या मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले तेव्हा काकूने केलेला रुद्र अवतार पाहून मुग्धा खूप घाबरली होती .
सगळी चूक तिचीच आहे , तिने अभ्यास करून घेतला नाही असे मत होते काकूचे !!! तिने सांगूनही काकू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती त्याचे सगळे खापर मुग्धावारच फुटले .
 सुट्टीमध्ये मुग्धाला आपल्या आईला भेटायला मिळत नसे , कधीतरी काकुसोबतच गेली तर आणि तिच्यासोबतच परत , काकूने असा धाक घातला होता कि मनात असूनही ती आपल्या आईशी बोलू शकत नव्हती .
मुग्धा जशी मोठी होऊ लागली सगळी घरातली कामेही तिच्यावरच पडू लागली , तिची काकूही इतकी हुशार कि घराबाहेरची सगळी कामे ती स्वतः करेल पण  आत मध्ये मात्र मुग्धा !! पण त्यातूनही मुग्धाने तिचा अभ्यास सुरु ठेवला आणि नुकतीच बारावीची तिने  परीक्षा दिली होती .
  मुग्धा हे कुणालाच बोलत नसली तरी आजींना हे सगळे माहित होते , म्हणूनच मुग्धाबद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता .
आतून काहीतरी करपल्याचा वास येऊ लागला म्हणून आजींनी  मुग्धाला हाक दिली , " मुग्धा ,अग काय करत आहेस ? कसला वास येतोय ? "
त्यांच्या आवजाने मुग्धा एकदम भानावर आली तर समोर चहा उकळून बाहेर पडू पाहत होता , आजीसाठी चहा  घेऊन ती बाहेर आली , त्यांनी आणलेल्या फुलांचा गजरा करत त्यांच्याजवळ बसली .
 मग मुग्धा बारावी होशील यावर्षी तू , पुढे काय करायचा विचार आहे तुझा ? आजी तिला विचारत होत्या .
 आजी , मला पुढे खूप शिकायचे आहे  आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे . पण  …….   ,,,
 असे म्हणत ती अडखळली .
काकूला जेव्हा ती असे म्हणाली होती त्यावेळी  काकूने खूप दंगा केला होता , पैसे कोण तुझे आई बाप देणार का ? म्हणे पुढे शिकायचे … जेव्हापासून पोरगीला शिकायला ठेवली तेव्हापासून जणू काही त्यांचा तुझ्याशी काही संबध नाही असेच वागत आहे कि , तू त्यांना नकोच होती म्हणूनच आमच्या गळ्यात मारली तुला …. असे एक न अनेक तिला ऐकून घ्यावे लागले होते .
पण खरे पाहता तसे काही नव्हते  काका काकू घरातले मोठे होते त्यामुळे घराचा सगळा कारभार या दोघांकडे असे , आणि म्हणूनच तिला व तिच्या आई बाबांना  त्यांचे ऐकावे लागे . हे कळण्या इतके मुग्धा आता नक्कीच मोठी होती ……
पण  ……  पुढे काय मुग्धा ? आजींनी तिला परत स्वप्नातून जागे केले .
 पण आजी आता निकाल लागला कि मगच ठरवेन पुढे शिकायचे कि नाही ते ? मुग्धा . 
 " का ग ? अचानक विचार बदलला तो ? " आजी .
नाही आजी आई बाबा आले होते ना परवा तेव्हा तेच म्हणत होते , कि माझे लग्नाचे वय झाले आता ……
 मुग्धा  आई बाबा म्हणतात ते सगळे ठीक आहे पण तुझे काय ते सांग ? आजी तर तिच्या मागेच लागल्या होत्या  त्यांना समजावे पर्यंत तिच्या नाकी नऊ आले . पण मुग्धाने काकूचे नावही तिच्या तोंडून घेतले नाही .
 खरे तर आजींना कौतुक वाटत होते  इतके सगळे होऊन हि मुग्धा आपल्याला काहीच सांगत नाही …
ती रडवेली झाली आजीनं समजावताना ….
 तेव्हा आजीनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या , मुग्धे तुझे आई बाबा आले होते ना  ते मला भेटायला आले होते , मीच त्यांना बोलावून घेतले होते .
मुग्धा अविश्वासाने आजींकडे पाहत होती…
 अग आमचा श्रीधर माहित आहे न तुला ?  , श्रीधर म्हणजे आजींच्या मुलीचा मुलगा  तो नेहमी सुट्टीत आजींकडे यायचा .  मुग्धाची आणि त्याची तशी थोडीफार ओळख होती .
 श्रीधरचे नाव ऐकताच मुग्धा गोड हसली . आजींनी ते ओळखले पण त्या पुढे म्हणाल्या
यावर्षी आमचा श्रीचे शिक्षण पूर्ण झाले , एक दोन वर्षात त्याचे सगळे बस्तानही बसेल  . मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला होता आणि त्याने मला तुझ्याबद्दल सांगितले ,  मी तर खूप आधी पासून ओळखत होते हे पण तो काही बोलत नाही म्हणून शांत होते . त्यानेच मला सांगितले तुझ्याशी बोलायला  म्हणून आधी तुझ्या आई बाबांशी बोलले , त्यांना काही अडचण नाहीय  … आणि मी मघाशी श्रीचे नाव घेताच तू जे गोड हसलीस त्यावरून तुझे विचारही कळले मला असे म्हणत आजी मिश्किल हसू लागल्या .
मुग्धा हसत हसतच एकदम गंभीर झाली .
आजी , आई बाबा अन मी ठीक आहे पण काका काकुना कोण समजावणार ?
 मुग्धा ,  अग मी आहे ना  , तुझ्या काकुपेक्षा नक्कीच चार पावसाळे जास्त पाहिलेत मी !  तिचे बघू आपण परत… !! असे म्हणत आजींनी शेवटची दोन फुले  गाठीच्या गजऱ्यात बांधली  , आणि तो गजरा मुग्धाच्या केसात माळला . आणि तिला विचारले
" जायचे मग श्री ला फोन करायला ?" आजी असे म्हणताच मुग्धा लाजून आत मध्ये पळून गेली .


Thursday, May 5, 2016

आता वाटली ना काळजी

आज  ऑफिसला जाण्यासाठी दोघांना गडबड होती म्हणून तो तिला म्हणाला कि आज डबा राहू दे बाहेरच खाऊ काहीतरी ! तसेही ती पण त्याच्या सोबत बाहेर पडत असल्यामुळे त्याला तिला त्रास द्यायला आवडायचे नाही पण त्याच्या साठी डबा बनवायला तिला खूप  आवडायचे , पण आज गडबडीमुळे दोघेही लवकर बाहेर पडले ,  त्याचे ऑफिस एकीकडे आणि तिचे एकीकडे त्यामुळे सोबत हि फक्त स्टेशन पर्यंत असे तिथून वेगळे रस्ते ..

 ती ऑफिसला पोहचली आणि त्याचा मेसेज आला, "reached n u ? " ती त्याला उत्तर देत होती तोच तिला client call आला त्यात ती बिझी झाली ,   मेसेज करायला विसरली . call झाल्यावर कोन्फारंस रूम मध्ये मीटिंग होती  त्यात ती तिचा मोबाईल डेस्क वरच विसरून गेली . आज अजून हि पोहचली कशी नाही म्हणून याने call  केला तर घेतलाच नाही म्हणून मेसेज केला r u der ? तरीही तिचा काही मेसेज नाही , आज त्या मीटिंग मध्ये तिला कळाले कि तिला ४ वाजता मीटिंग साठी client office   ला जावे लागेल  ,  तिला वाटले कि आता जेवण करून मगच डेस्कवर जावे तिने पटदिशी एक डोसा घेतला तो खात असतानाच  त्याला call करून सांगावे त्यावेळी तिच्या लक्षात आले कि आपण मोबाईल तर डेस्क वरच विसरून आलो ते  खाऊन  तिला डेस्कवर यायला २.३० वाजले आता आवरून निघाले तर वेळेत पोहचेन म्हणून तिने घाई घाईने डेस्क आवरायला घेतला ऑफिसच्या समोरच स्टेशन होते धावत पळत तिने ट्रेन पकडली आता पोहचेन वेळेत म्हणून  मोबाईल हातात घेतला  पण सगळ्या ट्रेन जमिनीखालून जात असल्याने नेटवर्क नाही आता पण call करू शकत नाही आता मात्र ट्रेन मधून बाहेर आले कि लगेच फोन करायला हवा सकाळपासून एकदाही बोलणे झाली नाही हे तिचे विचार ,,, तोपर्यंत त्याने हिला परत फोन केला तर आता तिचा फोन नेटवर्क मध्ये नाही असे सांगत होते त्यामुळे तर त्याला जास्तच काळजी  वाटू लागली तिला मेसेज करून ठेवले , तिच्या मैत्रिणीला फोन केला तर ती नेमकी आज सुट्टीवर , कुठे गेली असेल हि ? असे कधीच करत नाही ! काही अडचणीत असेल का ? असे एक न अनेक प्रश्न?  याचे कामात लक्ष लागेना झाले कदाचित घरी गेली असेल का ? असा विचार येउन त्याने आज घरी लवकर जायचे ठरवले  ….
 आजचा दिवस बहुदा तिचा नसावाच कारण ट्रेन लेट झाली त्यामुळे तिला client कडे पोहचायला लेट झाला गडबडीत तिने मीटिंग पूर्ण केली , तेव्हा घड्याळात ६. ३० झाले होते , तिने मोबाईल पहिला तर याचे २०-२५ misscall  आणि मेसेजस  ते पाहून हिने लगेच त्याला फोन केला तिचे नाव बघताच त्याने  झडप घालून फोन घेतला अग ए आहेस कुठे ? किती फोन किती मेसेज करायचे ? फोन वापरता येत नाही तर घ्यायचा कशाला ? तो तापलेलाच होता .
हिने शांतपणे सागितले कि पोहचते घरी मग बोलूच , हिच शांतपणा पाहून याला आणखीन राग आला पण हो म्हणून त्याने फोन ठेवला .
  एकतर आज खूप दमल्यामुळे हिची चिडचिड होत होती आणि घरी आल्यापासून त्याची धुसफूस ! ! तो काहीतरी बोलला ती आणखी चिडली आणि म्हणाली ,"मी काय लहान कुक्कुल बाळ आहे का ? कळत नाही का मला ? " याचा त्यालाही राग आला त्याने आत जाऊन जोरात बेडरूमचा दरवाजा आपटला आणि झोपला ,हिने पण जेमतेम आवराआवरी करून जाऊन झोपली . दोघेही जागे होते पण कुणीच बोलत नव्हते .
 सकाळी ती उठली तरी तो झोपलाच होता , तिला वाटत होते कि काल नाहीतर आपली चूक होतीच त्याला sorry म्हणायला हवे ! तो उठला कि पहिले काम तेच  असे म्हणून ती तिच्या कामाला लागली . तर हा पूर्ण तयार होऊनच बाहेर आला आज मला डबा  नको खातो बाहेरच , bye  म्हणून तो दाराकडे गेला ती काही बोलायच्या आधीच दार बंद झाल्याचा आवाज आला . मग तिनेही एक कॉफी करून घेतली आणि आवरून बाहेर पडली आज तिला कसेतरीच वाटत होते , ऑफिसमध्ये पोहचल्यावर तिने पहिला कि त्याचा मेसेज नाही आला म्हणून तिने पोहचले असा केला तर त्याला काहीच उत्तर नाही ,  बिझी असेल करेल परत या विचाराने ती कामाला लागली पण मेसेज टोन ऐकल्यावर लगेच बघत असे पण त्याचा नसला कि निराशा सगळी सकाळ यातच गेली तिने फोन केला तरी त्याने घेतला नाही .
आता १ वाजत आला त्याचा लंच टैम  म्हणून जेवण ? असा मेसेज केला तरी त्याने काहीच उत्तर पाठवले नाही , तिने फोन केला तर कट केला आणि मेसेज केला कि "बिझी" म्हणून , माझ्या प्रत्येक फोन ला मेसेज ला उत्तर देणारा हा आज असा का करतोय ? कदाचित त्याचा फोन हरवला असेल आणि दुसरेच कुणीतरी मेसेज करत असेल ? किंवा  त्याला काही झाले असेल का ? अरे देवा कसले कसले विचार येत आहेत माझ्या मनात ? कामात तिचे लक्ष लागेना  , मला बरे वाटत नाहीय , असे सांगून ती ऑफिस मधून बाहेर पडली ते थेट त्याच्या ऑफिस कडे जाण्यासाठीच .
त्याचे ऑफिस हे तिच्या ऑफिसच्या अगदी दुसऱ्या टोकाला ती तिकडे कधी जास्त गेलीही नाही तिला फक्त एरिया माहित होता . अर्धा पाऊण तास ट्रेन मध्ये काढल्यावर ती बाहेर आली पण तिला काहीच ओळखीचे वाटेना तिने याला फोन लावला पण त्याने तो घेतला नाही , आता शेवटचा उपाय म्हणत तिने मेसेज केला कि ,  तुझ्या ऑफिसच्या खाली मी थांबले आहे , हे वाचून मात्र दुसर्या मिनिटाला त्याचा call  आला , अग हि काय पद्धत आहे का ? कुठे आहेस? मी आलो खाली तू  दिसत नाहीय !
 ती , अरे तो एक स्मित स्ट्रीट  आहे न तिथे आहे मी !
कप्पाळ  म्हणत त्याने डोक्याला हात लावला , अहो madam तुम्ही एक stop आधीच उतरला आहात  , आता आहे तिथेच थांब मी पोहचतो १५-२० मिनिटात …. तोच पाऊस  सुरु झाला  , तसे हि पुटपुटली " इथला पाऊस पण कधी येईल नेम नाही ! "
यावर लगेच तो ," तो ही तुझ्यासारखाच लहरी वेडा "
 ती छत्री घेऊन उभी होती , तिची नजर त्यालाच शोधत होती आणि तितक्यात तो रोडच्या पलीकडच्या स्टेशन मधून बाहेर आला , पुढे ट्राफिकमुळे तिला पलीकडे जाता येईना , तसा तोच आला हिच्याकडे पळत तसे  दोघे किती  वर्षांनी एकमेकांना भेटत आहेत असे भेटले . !!!
 दोघे एकाच छत्रीतून चालत असताना त्याने फक्त तिला इतकेच विचारले , "आता  वाटली ना  काळजी ?"