Wednesday, December 21, 2016

झोप

झोप हा  माझ्या अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे , त्यातली त्यात जर ती दुपारची झोप असेल तर मग काय विचारूच नका इतकी प्रिय ...
आमच्या आईच्या भाषेत आम्ही तीन माकडे (  त्यांचे वंशज ना म्हणून म्हणत असेल !!) म्हणजे मी आणि माझे बहीण भाऊ कुंभकर्ण आहोत , हत्ती जरी आमच्या अंगावरून गेला तरी आम्ही ढिम्म हलणार नाही..  सकाळी नऊ वाजले तरी आमचा सुर्य अजून उगवायचाच असतो .. 
आमची परीक्षा असली कि आमच्या आईची सत्वपरीक्षा असणार !! ... यात आमचे बाबा मात्र झोपु दे ग अजून थोडवेळ या कॅटेगरीतील !
त्यामुळे आईचा आणखी जरा तिळपापड व्हायचा !! आणि  त्यांच्या या नेहमीच्या गोड  संवादात आमची अजून एक डुलकी काढून व्हायची... 
दुपारचे रामायण तर वेगळेच असायचे म्हणजे कसे ना दुपारची वामकुक्षी किती वेळ अर्धा तिथे पाऊण तास असावी  , यालाच काय ते मॉड भाषेत पॉवर नॅप म्हणतात !!! पण आम्ही एकदा वामकुक्षी चालू केली कि आमची कुशी कमीत कमी २-३ तास त्या जागेवरून हालत नाही ...
आता हि इतकी प्रिय गोष्ट मी कॉलेजला आले तरी माझ्या जवळ अगदी माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी राहिली ,इतकी कि माझी मैत्रीण मला कॉलेजला जाताना सोडून जाईल पण हि माझी सखी माझे जेवण झाले कि पुढच्या लेक्चरला माझ्या सोबतच .. तरी बरे पुढचे तीन मागचे दोन बेंच सोडून मी मधल्या बाकड्यावर आपली गादी टाकणार ,, एकदा दोनदा सापडता सापडत वाचलीय !!!! नाहीतर निद्रादेवीचा कोपच झाला असता !!
पण कुठेही गाडीतून किंवा बसमधून प्रवास करताना मात्र मी बाहेरच्या निसर्गाला भरभरून दाद देत असते , त्यावेळी हि माझी सखी मला बिलकुल त्रास द्यायला येत नाही .
एक वेळ रात्रीची झोप मोड झाली तरी चालेल पण दुपारची अहं !!!
आता माझ्या झोपेला नजर लावायला माझ्या आईनंतर आहे तो म्हणजे नवरा ,, याचे आणि माझ्या सोन्यासारख्या सखीचे काय वाकडे आहे तेच समजत नाही !! दुपारची तर नाहीच पण रात्रीचीही झोप इवलीशी पुरते त्याला ?? कधीही झोपला तरी सकाळी सातला आहेच उठलेला कि त्याच्या आधी मला माहिती नाही बा कारण त्यावेळी आपली मध्यान्ह कम पहाट असते ...
सकाळी उठला कि मुद्दाम काहीतरी किचन मध्ये जाऊन आवाज करायचे आणि माझी झोप मोड करायची यातून कुठला असुरी आंनद मिळवतो ते तो असुरच जाणे !!
आता थंडीत तर बाहेर बर्फ पाऊस आणि   आवडती लहानपणीची शॉल गुंडाळून मस्त झोपलेले असताना मुद्दाम ऑफिस मधून फोन करून विचारायचे ,, " काय ग , काय करत आहेस ? "
पहिले पहिले  मीही अगदी सोज्वळपणे सांगायचे कि झोपले आहे रे !! आणि आता म्हणते  बसलीय विमाने मोजत !!! तिकडून छद्मी हसत फोन ठेवला जातो कारण त्यांचे काम फत्ते झालेले असते !!!
अशी हि दुपारच्या झोपेबाबत असलेली अरसिक माणसे !!
दुपारची झोप झाली कि गरम गरम वाफाळता चहा आणि काहीतरी गरमगरम खायला म्हणजे स्वर्गसुखच .. पण इथेही आमच्या मातोश्रीना असे वाटते कि नुसते खायचे प्यायचे आणि झोपायचे... खायला तर भस्म्याच झालेला असतो नुसते बकासुर आहात तिघे !!!
आता खरे सांगायचे तर आमच्या तिघांनाही हा प्रश्न पडलेला असतो कि आम्ही नेमके वंशज कुणाचे  कुलकर्ण्याचे कि कुंभकर्णाचे कि बकासुराचे ???
पण आई म्हणत आहे ना मग असेलच काहीतरी !!!
आज सकाळीच आमच्या नवरोबांसोबत थोडेसे हलके फुलकेसे संभाषण काम सं "वाद " झाला , सगळेच कसे तुमच्या घरचे दुपारचे पण झोपतात असे काही बाही  ......... आणि ऑफिसला जाता जाता मला प्रेमळ  शब्दात सांगून गेले कि आज दुपारी अजिबात झोपायचे नाही !!!
मग काय माझ्यातील एक वळवळणारा किडा जागृत झाला मग मीही काहीही संवाद न करता दिवसभर  मस्त ताणून दिली !!!
संध्याकाळी अहोनी बेल वाजवल्यावरच झोपेत दार उघडले !!
ते पाहून आमचे लंबोदर मला म्हणाले कि ," सकाळी जरा ऑफिसच्या कामाचे टेन्शन होते ,, आणि तुला तर माहिती आहेच कि ग आता मला किती लोड होता !!! त्यामुळे सकाळी जरा थोडे जास्तच बोललो नाहीतर तसा काही माझा उद्देश नाहीच किंबहुना कधीच नसतो फक्त ते जरा वोर्कलोड मुळे .....
आता यात पण माझी आई म्हणते कि अति तेथे माती आणि जर गोडी गुलाबीने होत असेल तर जास्त ताणू नये आणि मलाही पटले कि हे सगळे तो मनापासून बोलत आहे मग काय दिले सोडून !!!
अहा असे तसे नाही हं ... गरमगरम चहा आणि आता काहीतरी चमचमीत खायला द्यायच्या बोलीवरच ..... !!!


Thursday, December 15, 2016

वाड्यातील जत्रा

आज ना एक आगळ्या वेगळ्या गावाबद्दल सांगणार आहे , आमचे मूळगाव कवठे महांकाळ पासून अगदी जवळ फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरच आमचे हे गाव  " आगळगाव " . इथे एक खूप जुने शंकराचे म्हणजे आगळेश्वराचे मंदिर आहे त्यावरून हे नाव पडले असे म्हणतात , हा इतकाच याचा इतिहास मला माहिती आहे.

आमचा मोठा वाडा आहे इथे , लहान असताना आम्हा बच्चेकंपनीला या वाड्याचे आणि आमच्या मळ्याचे खूप आकर्षण .. अजूनही आहे !!! वाड्यात रमायला , मळ्यात हिंडायला फिरायला आंब्याच्या झाडाखाली बसून पत्ते खेळायला ,, पारावर भातुकलीचा डाव .....  सगळे डोळ्यासमोर आले फक्त गाव म्हणले  !!!!!
   आणि आज याची आठवण आली म्हणजे  खास कारण असे कि  आमच्या गावची जत्रा .... यात्रा !!
मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला असते , दोन दिवस यल्लमा देवीची यात्रा ....
 यात्रा म्हणले कि सगळे एकत्र येतात सख्खे  चुलत असे मिळून आम्ही घरचे ५० -७५ जण असतो कोणताही कार्यक्रम असू दे  , आणि हा आमचा वाडा सगळ्याना संभाळून घेत असतो !!!
लग्न झाल्यावर गावाकडे जायला जमलेच नाही  ,, पण यात्रा आली कि जाम आठवण येते ,, लहानपणी केलेल्या धमाल मस्तीची ...
लहानपणी गावी जात असताना  आगळगाव फाटा आला कि आम्ही गाडीतच दंगा करायचो "आगळ वेगळ गाव आले"  आणि असे म्हणतच आमची गाडी वाड्यापर्यंत पोहचायची  ..  सगळ्यांच्या दंग्याने त्या वाड्यालाही जाग  यायची ,, माजघरातील ती चूल त्यात झालेला धूर , आणि आमच्या आई , काकूंचे त्यामुळे पाण्याने भरलेले डोळे !!!  आम्ही आत गेलो कि काय असते रे तुमचे माजघरात जा सोप्यात खेळा इति आमची आजी ,,
पहिले पहिले  माजघर , सोपा हे शब्द ऐकून इतकी मजा वाटायची पण परत त्याची सवय झाली,, आता आम्हीपण वाड्यात गेलो हे  असेच म्हणतो !!
पहिल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक आणि तोही चुलीवर सगळ्या वाड्यात त्या पुरणावरणाचा वास दरवळत असे ,, पण मला खरी मजा यायची ती भल्या मोठ्या पातेल्यातील बटाटे पोहे खायला ,, काय तो वास त्याचा आहा !!! सगळे त्यादिवशी वेगळ्या चवीचे लागायचे , पोट भरत होते पण मन नाही ...
आमच्या वाडयापासून ३० -३५ पावले चालत गेले कि आमची जत्रा भरलेलीच ,, सुरुवात ती चिरमुरे , शेव , भजीच्या स्टॉलने !! जरा पुढे गेले कि मग चालू झाले फुगे , गाड्या , दुर्बीण , बांगड्या , गळ्यातली, कानातली .... आणि खूप काही !!! इतक्या जवळ असल्यामुळे आम्ही दर अर्ध्या तासाने बघून यायचो काय बदल झाला आहे का ?? .. आणि किती ते भांडण नाही पैसे कमी करण्यासाठी !!!
मला लहानपानपासून वेड आहे ते फुग्याचे , त्यात  भरलेली रेती आणि तो वाजवायचा जोरात  किती भारी वाटते ना !! आम्ही सगळे मिळून किती फुगे आणायचो याला काही मापच नाही फुटला फुगा कि आण !! दोन दिवस हेच फक्त ...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळ्याच्या आंघोळी आवराव्या लागत कारण पालखी येणार असायची घरी ,, पालखीची मानाची काही घरे असतात त्या घरात पालखी त्या क्रमाने जात असते , आमच्या वाड्यात ती दुसऱ्या कि तिसऱ्या नंबरला येते ..
कुणीतरी वाडयाच्या दारातच उभे असणार लांबून पालखीचा आवाज म्हणजे वाजत गाजत येते पालखी .. आवाज आला कि सगळे सोप्यात येऊन उभे ,, पालखी ठेवली कि तिथे ओटी , पूजा , नमस्कार सगळे होते ..
जे पालखी घेऊन आलेले असतात ते देवीची गाणी म्हणतात जोगती असतात ते नाच करतात   थोडावेळ कार्यक्रम असतो शेवटी आरती होते आणि पालखी जाते ... मग तिथून आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी देवळात जातो ,, त्याच्या समोरच ओढा आहे त्यात पाय धुवून मगच पुढे मंदिरात , खूप जुने मंदिर आहे जास्तीत जास्त एकावेळी आत ४-५ लोक थांबू शकतात ,, आणि आत जाण्यासाठी तर वाकूनच जावे लागते इतके छोटे दार आहे , खूप मस्त आहे परिसर तो !! एकदम शांत पण यात्रेवेळी गडबड गोंधळ असतोच ...
तसे इथे  पाळणे ते असतात पण जास्त मोठे नाही छोटे छोटे , आमचा मोर्चा देवळातूनच स्टॉल कडे जातो ..
दिवसभर काही ना काही चालूच असते !! यात्रा जवळ असलेला फायदा हा !!
अरे हो तमाशा देखील असतो !! पण तो आमचा प्रांत नाही !!
संध्याकाळी पालखी किचात जाते त्यावेळी यात्रा संपते ,, किचात म्हणजे  निखारा असतो  ,, जे लोक पालखी घेऊन फिरत असतात ते आणि देवळातील पुजारी त्यावरून पालखी घेऊन चालतात तेव्हा यात्रा संपली असे म्हणतात ... आमच्यकडे शक्यतो पालखी किचात गेल्याशिवाय कुणी गावाबाहेर जात नाही !!
मजा असते यात्रा म्हणजे , मुळात आमचे सगळे घर एकत्र आलेले असते तो आनंद वेगळाच !!!
वाडा असो कि पूर्वीच्या काही रिती ,परंपरा यांच्या आठवणीनेही एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते नाही का !!!











Wednesday, December 14, 2016

प्रारब्ध

अंकिताचे लग्न होऊन ती सासरी आली ,, सासर आणि माहेर तसे काही जास्त दूर नाही काही तासाच्या अंतरावरच .. तिच्या माहेरी सगळे शिकलेले थोडयाशा नवीन विचारसरणीचे पण रिती परंपरा धरून असणारे .. सासरी एक नणंद , दीर , सासू  सासरे ... नणंदेचे लग्न झाले होते पण ती जवळच राहत होती त्यामुळे माहेरीच जास्त ...  सासरे घरीच आणि दीर काहीतरी कामे करत असायचा .. तिचा नवरा अजय हाच काय तो घरातील एकमेव कमावता ....
अंकितासाठी  अजयचे नाव तिच्या बाबांच्या मित्रांपैकी कुणीतरी सुचवले होते .  तिच्या बाबांनी सगळी माहिती घेतली त्यावेळी तरी त्यांना त्यात वावगे असे काहीच दिसले नाही .. एकत्र कुटुंब , राहायला घर आणि मुख्य म्हणजे मुलगा  अजय चांगला होता ,,, पण दिसते तसे नसते !!!!
लग्नावेळी अंकिताच्या  सासरच्यांनी खूप कोडकौतुक केले .. पण नव्याचे दिवस संपले तसे ..... !!!

अंकिता नोकरी करत होती लग्नानंतर ती कामावर जाऊ लागली ,, पहिले थोडे दिवस सगळे फक्त बघत होते पण नंतर नंतर तिच्या सासूने अजयला सांगायला सुरुवात केली ," तुझी बायको बघ कसले कसले ड्रेस घालते ,, साडी नेस म्हणले तरी ऐकत नाही,,  कारणे देत असते नुसती प्रवासात हेच बरे आहे ... घरातील कामे नको असतात ,सकाळी लवकर निघायचे आणि उशिरा यायचे  !!! "
अजयची आई रोजच त्याच्यासमोर असा पाढा वाचू लागली ... 
अंकिता खरे तर रोज सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून मग जात असे .... संध्याकाळी जेव्हा ती घरी येईल त्यावेळीच चहा होणार तोही तिनेच करायचा बाकी कुणी कशाला हात लावत नसे ...  सासरे तर दिवस रात्र पिऊन बसत कधी कधी त्यांना सोबत द्यायला नणंदेचा नवरा , आणि दीर सुद्धा असे ... 
अंकिताला त्यावेळी इतके अवघडल्यासारखे वाटायचे ,,, त्यांना चढली कि अगदी शिव्या सुद्धा द्यायला कमी करायचे नाहीत ... तिची सासू आणि नणंद फक्त हसत आणि टि व्ही लावून त्यावरच्या मालिका बघत त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नसे .... 
अंकिताने अजयला सांगून पहिले ... त्याला तर सगळेच माहित होते पण तो काहीच बोलायचा नाही ... महिना झाला कि सगळा पगार आईच्या हातात आणून देणे कि आपली जबाबदारी संपली असे त्याच वागणे ... 
अंकिता खूप मागे लागली होती कि त्यांना सांग, समजावं काहीतरी .... ,,, 
 त्यावेळी अजयने तिला सांगितले कि , "हे आहे असेच राहणार !! तुला याची सवय करून घ्यावी लागेल मी कुणाला काही बोलणार नाही .... आणि तुझा पगार आईच्या हातात द्यायचा स्वतःच्या चैनीसाठी जरा कमी वापर !! तुझ्या  ऑफिस मध्ये तू काय करते , कुठे असते सगळे माहीत आहे मला ... !!!!!" 
हे ऐकून अंकिता त्याच्याकडे पाहतच राहिली !!! सगळेच नवीन होते तिच्यासाठी !!!! 
अंकिता स्वतःला कसेतरी सावरत  म्हणाली कि " हे पैसे माझे आहेत ते कसे कुठे वापरायचे ते माझे मी पाहीन !!"
पण अजय काही न ऐकता बाहेर निघून गेला आणि त्याच्या बाबांच्या सोबतीला जाऊन बसला ... 
अंकिता आतमध्ये एकटीच बसून होती ... ती आहे कि नाही याची पर्वा कुणालाच नाही !!!!
दुसऱ्या दिवशी अंकिताने नेहमीप्रमाणे आपली कामे आवरली आणि ऑफिसला न जाता  आईकडे गेली ... खूप दिवसांनी तिने आपले मन मोकळे केले .. आईने तिचे ऐकून तिला रडून दिले ती थोडी शांत झाल्यावर आईने  तिलाच विचारले " आता तुला काय करायचे आहे ? राहणार आहे का तिथे तू ? "
 " आता मला काय करायचे आहे ते मलाही नक्की माहित नाही , पण काहीतरी मार्ग काढायला हवा ,, एकदा अजयसोबत बोलून बघते , पण कुठेही बाहेर जायचे म्हणले कि त्याच्या आईची परवानगी लागते तिने हो म्हणले तरच आमचे घोड पुढे जाते नाहीतर तिथेच अडकते ... "  अंकिता .
तसे आई तिला म्हणाली बघ एखादे देव दर्शन असे निम्मित करून बाहेर पड , त्याच्या मनातले तुला कळाले कि पुढचे निर्णय खूप सोपे होतील ...
आईचे बोलणे अंकिताला पटले ,, काहीतरी विचार करून घरी पोहचली .. तर घरी आधीच समजले होते कि अंकिता ऑफिसला न  जात तिच्या माहेरी गेली होती .
तिच्या सासूला आधीच निम्मित हवे असते  बोलायला आता आयतेच सापडले होते  ,, माहेरी जाऊन आमच्याविषयी त्यांचे  कान भरून आली का ? कि नेहमीच जाते असे आम्हाला न सांगता .. ? तरीच माझ्या हातात पगार दे म्हणले कि द्यायचा नसतो आणि तिकडे जाऊन माहेरचे घर भरायचे असते असे एक ना अनेक बोलणे चालू होते .. तुला नोकरी होती म्हणून या घरात आणली नाही तर तुला विचारले सुद्धा नसते आम्ही .... " हे ऐकून मात्र अंकिताला धक्का बसला म्हणजे फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केले ...!!!!
आता अजयला विचारायलाच हवे , त्याचेही मत असे असले कि मग संपलेच ना !!
अजय घरी आला पण त्याआधीच त्याला घरी काय झाले आहे ते माहित होते ,, त्यामुळे तो येताना बाहेरूनच पिऊन आला होता .
अंकिता त्याला काही बोलणार तोच त्याने तिला शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली .. तो काही ऐकून घेण्याच्या शुद्धीत नाही . अंकिता त्याला समजावत होती , पण तो फक्त वेड्यासारखे करत होता  एकदा तर त्याचा स्वतःचा तोल ढळला त्याने अंकिताला मारण्यासाठी तिच्यावर हात टाकला अंकिता बाजूला झाली आणि अजयचे डोके बेडच्या कठड्याला बडवले त्याला जोरात मार बसला .
त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले अंकिता सासू सासऱ्यांना बोलावू लागली पण सासऱ्यांना उठता येईना इतकी जास्त झाली होती .सासूला काय करावे ते समजेना !! अंकिताने तिच्या भावला फोन करून गाडी घेऊन यायला सांगितले .
तिचा भाऊ आला , अजयला घेऊन ते डॉक्टरकडे गेले ,, अजयकडे पाहून त्यांनी सांगितले कि आता लगेच याच्यासाठी रक्ताची व्यवस्था करावी लागेल , अजयचा आणि त्याच्या बाबांचा ब्लडग्रुप एकच होता पण आता यावेळी त्यांचा काही उपयोग नव्हता ... अंकिताच्या भावाने त्याच्या मित्रांना बोलावून सगळी तयारी केली ..
पण अजयने खूप दारू घेतली होती त्यामुळे डॉक्टर जास्त काही बोलत नव्हते ..
अंकिताचे आई बाबा तिथे आले ..
दुसऱ्यादिवशी डॉक्टरांनी सांगितले कि याची जखम खूप खोल आहे ती भरून येण्यासाठी वेळ लागेल ..
४-५ दिवसानी अजय घरी आला पण डोक्यावर पट्टी होतीच ,, डॉक्टरांनी त्याला सांगितले होते तुझे ड्रिंक्स घेणे असेच चालू राहिले तर तू यातुन नाही बाहेर पडू शकणार वेळीच सावर स्वतःला ...
अंकिताने अजयसाठी  म्हणून २ महिन्याची सुट्टी घेतली होती .  तो पूर्ण बरा होईपर्यँत ती त्याच्या सोबत होती , पण ती सगळे करताना कर्तव्य म्हणून करत होती त्यात आपलेपणा असा कुठेच नव्हता ....
अजयला हे सगळे कळत होते त्याने एक दिवस अंकिताला विचारले , " रागावली आहेस का  ग ?
जास्त काही बोलत नाही , फक्त काम करत राहते .... "
अंकिताने त्याच्याकडे पाहिले आता तो पूर्णपणे बरा होत आला होता ,, ती काही न बोलता त्याच्याकडे पाहून हसली फक्त आणि म्हणाली आपण बोलू लवकरच तू आता आराम कर ,, उद्यापासून माझी सुट्टी संपणार आहे ..
अंकिता आता नेहमीप्रमाणे सगळे आवरून ऑफिसला जात होती , घरचे वातावरण सगळे पूर्वीसारखेच होते .. पण अंकिता आता तिकडे लक्ष देत नव्हती ..
पंधरा दिवसांनी ती घरी जरा लवकरच आली खुशीत होती ,,, त्यावेळी घरी अजय एकटाच सोफ्यावर पडला होता .. अंकिताला असे खुशीत पाहून तोही जरा गोंधळला ... अंकिताला त्याने विचारले आज काही खास आहे का ?

अंकिताने दोघांसाठी चहा करून आणला , ती म्हणाली अजय तू मला विचारले होते मी रागावले आहे का ? तर त्यावेळी मी स्वतःला शोधात होते .. २ महिन्यात घरी बसून खूप विचार केला कि पुढे आपल्याला काय करायचे आहे ? कसे जगायचे आहे ? त्यावेळी  बरेच पर्याय समोर आले , बरीच उत्तरे माझी मला सापडली ,, हरवलेली मी मला गवसले ....
अजय मी इथून आता बाहेर पडायचे ठरवले आहे काहीतरी नवीन करायचे आहे ,, माझी स्वतःची मला नवीन ओळख निर्माण करायची आहे , खरे हेच माझे स्वप्न होते लग्नाआधी ,, तुझ्यासाथीने ते पूर्ण करेन असे वाटले होते पण ते काही शक्य नाही ..... त्यामुळे आता माझी वाट मीच शोधेन ... !!!
अजय फक्त पाहत होता तो तिला म्हणाला मग इतके दिवस माझी सेवा करण्याचे फक्त नाटक का ?
तसे अंकिता म्हणाली नाही नाटक नाही ,,, माझे कर्तव्य करत होते .. तू आता धडधाकट आहेस तुझ्या पायावर उभा ,, त्यावेळी तुझ्या आईला वाटले होते कि तुला माझ्यामुळे लागले,,,  हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे झाला  ..   पण खरे काय आहे ते तुला माहित आहेच ना !!!!
आणि खरे तर मी आपल्या विषयी बोलणार होते तुझ्यासोबत त्यादिवशी ,,, पण तू काही बोलायच्या पलीकडे होतास  ... मी काही सांगत होते पण तू ऐकून घेण्याआधीच हात उचलला माझ्यावर !!!
 अंकिता बोलतच होती आणि अजय फक्त ऐकत होता ....
अजय तिला म्हणाला जर असेच करायचे होते तर मग इतके दिवस नाटक कशासाठी केले ... त्यावेळीच गेली असतीस तर ....
अजय , हा प्रश्न मी तुला विचारते , जर त्यावेळी तू मला मारल्यामुळे जर मला काही झाले असते तर तू काय केले असते का ?
अंकिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती ... पण अजयला  तिच्या डोळ्यात पाहायची हिम्मत होत नव्हती ...

दारात अंकिताचा भाऊ तिला घेण्यासाठी आला होता ,, ती आपली बॅग घेऊन आली आणि अजयकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली ...
अजय एकटक तिच्या पाठमोऱ्या लुप्त होणाऱ्या आकृतीकडे पाहत होता ....
अंकिता उद्यापासून एका नवीन जगात नवी प्रारब्धाची वाट शोधणार होती ...



Monday, November 28, 2016

प्राजक्ताची फुले

आजही मुग्धा नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती , सकाळची वेळ त्यामुळे बस साठी गर्दी , कामाला जाणारे , शाळेला जाणारी मुले यांची धावपळ हे सगळे बघताना मुग्धाचा वेळ खूप पटकन जात असे .शाळेला जाणाऱ्या मुलांच्या गप्पा तिच्या कानावर पडल्या कि आपणही शाळेत जात आहोत असाच भास तिला होत असे . पण चार पाच दिवसापासून एक माणूस रोज त्या बस स्टॉप वर दिसत असे , आणि मुग्धाकडे एकटक पाहत असे . मुग्धाची आणि त्याची नजरानजर झाली कि तो दुसरीकडे पाहत असे , असा खेळ गेल्या काही दिवसापासून चालू होता , का कुणास ठाऊक पण मुग्धाला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओळख दिसत असे आधी कुठेतरी पहिल्यासारखा चेहरा तिला आठवत असे .
मुग्धा आधी शिक्षणासाठी म्हणून शहरात आली त्यावेळी ती तिची मैत्रीण दीप्तीसोबत  तिच्याच फ्लॅट मध्ये रहात होती कधी कधी काही कामासाठी म्हणून  दिप्तीचा  भाऊ अनिकेत येत असे त्यावेळी एक दोन दिवस तो तिथे राही  ,सुरुवातीचे थोडे दिवस मुग्धाला अवघडल्यासारखे होत असे पण नंतर तिची आणि अनिकेतची मैत्री झाली . त्या तिघांचे त्रिकुट खूप छान जमले होते .
अनिकेत खूप बोलका ,पटकन सगळ्यांना आपलेसे करून घेणारा दिसायला स्मार्ट नसला तरी नाकी डोळस ठीकठाक होता . मुळातच हुशार असल्याने त्याच्या ज्ञानाचे वलय  चेहऱ्यावर दिसत असे . त्याची यावर्षीची परीक्षा झाली कि तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाणार होता . त्याच्यासाठी त्याचा अभ्यास त्याचे करिअर खूप महत्त्वाचे होते यासगळ्यांपुढे बाकी सगळ्या गोष्टींची किंमत त्याच्या लेखी शून्य होती .
मुग्धा तिला तिचे शिक्षण स्वबळावर पूर्ण करायचे होते त्यासाठी तिचे पार्टटाइम नोकरी शोधणे चालू होते , दीप्ती नोकरी करत होती तिच्या येण्या जाण्याच्या वेळा काही नक्की नसत . तिच्या ओळखीवरूनच मुग्धा दोन तीन ठिकाणी जाऊन आली होती , थोडे दिवसात तुम्हाला कळवतो असेच तिला सगळीकडे सांगितले होते . दुपारी कॉलेज मधून आली कि ती फ्रीच असे . दिवस जात होते ....
मुग्धाला एके ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावणे आले , तिथे गेली तर तिला उद्यापासून जॉईन व्हा असे सांगण्यात आले .
कधी एकदा घरी जाऊन सगळे दिप्तीला सांगते असे मुग्धाला झाले होते . आनंदाच्या भरात ती घरी पोहचली तर दार आतून बंद होते  ...
अरे वा ! आज दीप्ती घरी लवकर आलेली दिसत आहे , माझ्या नोकरीचे ऐकून किती खूष होईल ती या विचारात तिचे बेल वाजवणे चालूच होते , दार उघडले तसे मुग्धा दीप्तीच्या गळ्यात पडत दीप्ती ! दीप्ती ! मला नोकरी मिळाली उद्यापासूनच या असे सांगितले ... ... ती बोलतच होती ....
इतक्यात अरे वा  ! हो का अभिनंदन  असे म्हणत अनिकेतचा आवाज ....
मुग्धाने वर पहिले तर ती तिच्या आनंदात दीप्ती समजून अनिकेतच्या गळयात पडली होती .
त्याला पाहून दोन मिनिटे तिला समजेना काय करावे ते ? ती तशीच उभी ...
अनिकेतने तिला हलवले तेव्हा कुठे भानावर आली पटकन तिने हात मागे घेतले ..
अनिकेतने अभिनंदन म्हणत हात पुढे केला तर कसाबसा त्याच्याशी हात मिळवत ती आता निघून गेली .
अनिकतेच्या डोळ्यात पाहणे तिला शक्य होत नव्हते .
अनिकेत मात्र नुसतंच हसत होता .
 थोड्यावेळाने दीप्ती घरी आली , अनिकेतने तिला मुग्धाच्या नोकरीचे सांगितले , तितक्यात मुग्धा बाहेर आली  दिप्तीने अभिनंदन करून आज आपण बाहेर जेवायला जाऊ असे सांगितले मुग्धाचाही तोच विचार होता .
सगळे मस्त तयार होऊन जेवणासाठी बाहेर पडले .जेवणानंतर आईस्क्रीम खाऊन घरी आले .
उद्या मुग्धाचा पहिला दिवस होता आणि दिप्तीला लवकर जायचे होते त्यामुळे त्या लवकर झोपल्या .
अनिकेत त्याचा अभ्यास करत बसला ..
सकाळी मुग्धाला बेस्ट लक करून दीप्ती लवकरच बाहेर  पडली .
मुग्धा तयार होऊन बाहेर जात होती इतक्यात अनिकेतने तिच्या हातात  प्राजक्ताची फुले ठेवली . शुभेच्छा म्हणून तो निघून गेला .
मुग्धा त्या फुलांकडे पाहत होती , त्यांचा सुगंध तिच्या सगळ्या शरीरात फुलला होता ... स्वतःशीच हसून ती ऑफिसला निघाली .
ऑफिसचा पहिलाच दिवस असल्यामुळे काम कमी होते  , पण राहून राहून ती फुलेच तिच्या नजरेसमोर येत होती .
अनिकेत मितभाषी त्यामुळे तो स्वतःहून त्याच्या मनात काही असेल तर बोलणार नाही हे तिला माहित होते .
आणि झालेही तसेच दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून यायच्या आधीच तो निघून गेला होता . तिला खूप राग आला होता पण सांगणार कोणाला ? दीप्तीशी ती यावर काही बोलू शकत नव्हती .
थोडे दिवस  झाले पण अनिकेत आला नाही , आणि दिप्तीला काही दिवसासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार होते नक्की किती दिवसासाठी हे तिला माहीत  नव्हते .
मुग्धाला काहीच कळत नव्हते इथेच राहावे कि दुसरीकडे जावे पण तिच्या ओळखी खूप कमी होत्या त्यामुळे दुसरीकडे लगेच सोय होणे शक्य नव्हते . दिप्तीला जरी ती तिथेच राहिली तरी काहीच हरकत नव्हती प्रश्न होता तो फक्त अनिकेतचा ... !!!
हो नाही करत मुग्धा तिथे राहायला तयार झाली , कारण तिला ऑफिस , कॉलेज सगळेच जवळ पडत होते आणि मुख्य म्हणजे हि जागा तिच्या सवयीची झाली होती . आणि इथे राहिली तर परत कधीतरी अनिकेत भेटेल हि आस मनामध्ये होतीच ...
आता मुग्धा एकटीच राहत होती दिप्तीला जाऊन २ महिने होत आले होते . अनिकेतची काही खबरबात नव्हती .
एक दिवस मुग्धा घरी आली तर दार आतून बंद , दीप्ती तर आली नसेल ? कि अनिकेत ? अनिकेतची नाव मनात येताच तिच्या मनाची धडधड वाढली . कंप पावणाऱ्या हाताने कशीतरी तिने बेल वाजवली तर पुढ्यात अनिकेतच उभा !!!!
त्याला पाहून मुग्धाला काय बोलावे ते समजेना ?
त्याला हाय करून ती आत निघून गेली , अनिकेत नेहमीप्रमाणेच वागत होता त्याच्या वागण्यात काहीच वेगळेपण नाही !! मग मलाच का असे होत आहे ? याच विचाराने मुग्धाला काही सुचेनासे झले ..
ती स्वयंपाकासाठी गेली तर अनिकेतने सगळे करून ठेवले होते फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या .
" अरे ! तू कशाला केले इतके सगळे मी केले असते ना ? " मुग्धा
 " अग हो तू दमून येशील मग कधी करणार म्हणून म्हणले आज आपण करावे  ." अनिकेत
मुग्धाला मात्र खूप छान वाटत होते आपण दमून भागून आल्यावर आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी असेच स्वयंपाक केला असेल ती तिच्या विचारात हरवली
मुग्धा ! मुग्धा  ! जरी बाकी सगळे मला येत असले तरी पोळ्या मात्र तुला कराव्या लागतील मला त्या अजून जमत नाहीत  कि करू नकाशे ? असे अनिकेत म्हणताच मुग्धा हसत हसत कामाला लागली .
जेवण झाल्यावर सगळे आटपून मुग्धा तिच्या रूममध्ये गेली आणि अनिकेत अभ्यास करत बसला होता .
अचानक वादळी पाऊस सुरु झाला , वीज , ढगांचा कडकडाट होऊ लागला . मुग्धा पुस्तक वाचत बसली होती .
आणि अचानक लाइट गेली , सगळीकडे अंधार  मुग्धा बॅटरी घेऊन बाहेर आली तर अनिकेत तिच्याकडेच येत होता  .
दोघेही एकमेकासमोर मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात बसले होते . मुग्धाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गुलाबी छटा होती , आता काय ? हा एकच प्रश्न दोघांच्या मनात होता .
विजांचा कडकडाट जसा वाढू लागला तशी मुग्धाची चलबिचलताही वाढू लागली .
काहीतरी बोलायचे म्हणून मुग्धा त्याला विचारू लागली , " अनिकेत त्या दिवशी तू मला प्राजक्ताची फुले का दिली ? "
तुला आवडतात म्हणून , इतकेच अनिकेत बोलला आणि गप्प बसला ..
पण तुला कसे कळाले कि मला प्राजक्त आवडतो ते ? तिने मिश्कीलपणे त्याला विचारले .
कसे म्हणजे काय रोज सकाळी बघतो ना तुला त्या प्राजक्ता जवळ रुंजी घालताना त्याची काळजी घेताना तू इथे  राहायला आल्यापासून तसा तो खूपच बहरला  आहे.  हे ऐकताच मुग्धाची कळी खुलली ...
अनिकेत त्याच्या नकळत आज काही वेगळेच बोलत होता , मुग्धा त्याला आवडत होतीच पण त्याने कधीच तिला बोलून दाखवले नाही ...
रात्र उलटत होती , त्यांच्या गप्पाना वेगळाच रंग चढत होता मध्ये कॉफी झाली , समोरासमोर बसलेले ते दोघे आता शेजारी येऊन बसले होते , अनिकेतने मुग्धाचा हात प्रेमाने हातात घेतला , तशी मुग्धा शहारली , तिचा हात थंड पडला .
मुग्धा , मागच्या वेळी दीप्ती समजून अजाणतेपणाने मला मिठी घातली त्यावेळीच वाटत होते कि तुला खरे काय ते सांगून टाकावे , पण मी असा अबोल , आणि त्यावेळेची माझी परिस्थिती मी काहीच करत नव्हतो , तुलाही नुकतीच नोकरी लागली होती . पण तुझी ती मिठी मी तुझ्यापासून दूर असतानाहि मला तुझी आठवण करून देत होती ...  मला आता परदेशी जावे लागेल कधी ते सांगता येणार नाही किती दिवसासाठी तेही माहित नाही माझे प्रोजेक्ट संपले कि मी येईन परत . मला तू खूप आवडतेस ग .... अनिकेत बोलतच होता ....
बाहेर कसलातरी आवज झाला आणि मुग्धाने अनिकेतला घट्ट पकडले , आणि त्या बेसावध क्षणी मुग्धा आणि अनिकेत एक झाले बाहेर पाऊस पडत होता आणि आतमध्ये या दोघांची मने चिंब भिजत होती .
 सकाळी मुग्धाने चहा केला अनिकेतला उठवले हे करताना मुग्धाला आज खूप वेगळेच वाटत होते , काहीतरी वेगळे फीलिंग ...
सगळे आवरून ती ऑफिसला निघून गेली ,अचानक अनिकेतला एक कॉल आला आणि तो निघून गेला . मुग्धासाठी एक मेसेज ठेवून ," मला एका महत्वाच्या कामासाठी जावे लागणार आहे मला वेळ मिळाला कि तुला कॉल करतोच "
संध्यकाळी मुग्धा घरी आली हा मेसेज वाचून ती उभ्या उभ्या खाली कोसळली ..
पण तिला अनिकेतवर विश्वास होता तो नक्की तिला परत भेटेल .
सहा महिने झाले पण अनिकेतचा काहीच पत्ता नाही , तिने दिप्तीला कॉल केला तर तिचा नंबर लागत नाही , काय करावे ते तिला समजेना  !!! अशातच तिला एका दुसऱ्या जॉबची ऑफर आली , मुग्धासाठी ती नोकरी खूप काही देणारी होती त्यामुळे हि संधी वाया न जाऊ देता त्याचा उपयोग करायचा असे तिने ठरवले  . जे होईल ते होईल या विचाराने तिने घराची किल्ली आणि तिचा फोन नंबर शेजारच्या काकूंकडे देऊन ठेवला आणि सांगितले कि दीप्ती ,अनिकेत आले तर त्यांना इतके द्या , काकूंचा निरोप घेऊन ती निघाली .
आता जवळ जवळ वर्ष होत आले , मुग्धा अनिकेतला विसरली नव्हती , पण काळ हा सगळ्या गोष्टीवर औषध असतो असे म्हणतात तसे होत होते ...
आज मुग्धा जेव्हा बस स्टॉपवर उभी होती त्यावेळी तिला निरखून पाहणारी व्यक्ती म्हणजे तिला अनिकेतच वाटत होता पण खात्री होत नव्हती . ...
समोर बस येऊन थांबली आणि तिला कुणाचा तरी धक्का लागला तशी ती वास्तवात आली , आणि बस मध्ये चढली तर तो माणूस तिच्या मागोमाग त्याच बस मध्ये आला .
मुग्धा तिच्या ऑफिसच्या स्टॉपला उतरली तिच्या मागोमाग हाही उतरला ... आता मात्र मुग्धा जाम  वैतागली होती , ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला बोलू लागली ," रोज पाहत आहे मी काय मागे मागे असता माझ्या सारखे ? मी कधी चढते उतरते काय खाते पिते याकडे अगदी बारीक लक्ष असते तुमचे .... "
त्याने शांतपणे गॉगल काढला आणि मुग्धाकडे पाहत हसला तो काही बोलणार इतक्यात त्याच्या नजरेत तिला आपली ओळख पटली .
अ.... अनिकेत !! तू हो अनिकेतच ..... !!!!
आज इथे कसा तू ? माझा पत्ता कसा मिळाला ? आणि आज सवड मिळाली तुला मला भेटायला ? आज का आला आहेस परत सोडून जाण्यासाठीच ना ? नुसती स्वप्ने दाखवायची .... मुग्धा इतक्या दिवसाचा राग त्याच्यावर काढू पाहत होती आणि तो मात्र हसत होता ....
मुग्धा ऐकून घे ना माझे बोलू आपण निवांत ....
अनिकेतला नाही म्हणणे मुग्धासाठी अशक्यच होते ...
शेवटी एकाठिकाणी दोघे बसले अनिकेत बोलत होता , " मुग्धा , माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे मला माहित आहे  पण काय करू वेळच अशी होती कि मी काहीच करू शकलो नाही , त्यावेळी मला माझ्या प्रोजेक्ट हेड कडून बोलावणे आले होते माझा  पार्टनर मी केलेल्या कामाचे सगळे क्रेडिट घेत परदेशी जात होता , तो घोळ मार्गी लावत होतो तोच , दिप्तीचा अपघात झाला ती दोन महिने कोमात होती , आता बरी आहे पण बोलताना , चालताना अजूनही तिला त्रास होतो ,
त्याच्या नंतर मला ५ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर परदेशी जावे लागले मी नाही म्हणू शकत नव्हतो कारण पैशाची अडचण होती . तुला हे सगळे सांगावे म्हणून आलो होतो ते तू निघून गेली होतीस .... तुझा फोन नंबर मिळाला खूप लावून पहिला पण तो कधी लागलाच नाही , मागच्या आठवड्यात  आलो मी इकडे परत , तिकडे असतानाहि तुझी माहिती मिळवण्यासाठी माझ्या मित्रांच्या मागे लागलो होतो , तुझ्याच प्रोजेक्टमध्ये माझा एक अभि नावाचा मित्र काम करतो त्याच्यामुळे तुला भेटू शकलो .... आता बोल  तू ....
" अनिकेत , काय बोलू मी ? त्यादिवशी आपल्यात  जे काही झाले आणि परत तू लगेच निघून गेला मला खरेच समजत नव्हते कि मी काय करावे ? "
 " घरी तरी कोणत्या तोंडानी सांगणार होते ? घरचे मागे लागले आहेत लग्न कर लग्न कर पण कसे करू ? " त्यांना सांगितलेही असते तुझ्याबद्दल पण मलाच काही माहित नाही तर त्यांना काय सांगणार ? आणि नंतर तू मला असेच सोडून गेला तर ? काय करू मी ?
मुग्धा वेडी आहे का ? तुझ्या इतकेच मीहि वेडा होत होतो मलाही खूप इच्छा होती तुला भेटायची बोलायची पण ती वेळ आपली नव्हती ग ... कसे समजावू तुला .... ?? तू दीप्तीशी बोल मी तिला आपल्यातले सगळे सांगितले आहे  मग तर विश्वास बसेल तुझा ?
दीप्तीचे नाव घेताच मुग्धा शांत झाली

अनिकेत तुझ्यावर विश्वास होता म्हणूनच तर इतके दिवस मी तुझी वाट पहिली ना ? आणि तू आता असे म्हणत आहे का ?
अग वेडाबाई मजा केली तुझी , बरे डोळे झाक तुझे आता ....
का रे ?
अग झाक तर खरे ....
तिने डोळे झाकल्यावर अनिकेतने तिच्या हातात प्राजक्ताची फुले ठेवली ...
हातात गारवा जाणवला म्हणून मुग्धाने डोळे उघडले तर समोर परत एकदा प्राजक्त फुलला होता .... आणि रिमझिम पावसाची सुरुवात होत  होती  ....






Friday, October 14, 2016

योगायोग

" मुग्धा , तू आज यायलाच हवे पार्टीला नाहीतरी आपली हि एकत्र अशी शेवटची पार्टी आहे "  तिच्या हॉस्टेलच्या मैत्रिणी मुग्धाला समजावत होत्या ..
कॉलेजचे हे त्यांचे शेवटचे वर्ष होते आणि दोन महिन्यांनी परीक्षा झाली कि सगळे आपापल्या घरी असणार होते, मुग्धाला पार्टीमध्ये जायला काही अडचण नव्हती पण पूर्ण रात्र बाहेर थांबावे लागणार होते .. यावेळी सगळ्यांनी मिळून नाईट आऊट पार्टी ठरवली होती आणि पार्टी फक्त  मुलींची होती त्यामुळे तिला जावे असे वाटत होते पण फक्त घरी कळाले तर खूप ऐकून घ्यावे लागणार होते त्यामुळे तिची व्दिधा मनस्थिती झाली होती . तसे तिच्या घरचे तिला नक्कीच नाही म्हणाले नसते पण पूर्ण रात्र बाहेर राहणे ,, हे पटण्यासारखे नव्हते फक्त मुलींची पार्टी असली तरीही ...
आधीच त्यांचे नातेवाईक तिच्या आई बाबांना बोल लावत असत कि शहरात राहून तुमची मुलगी बिघडली .. परंतु
सगळ्या मैत्रिणीचा आग्रह तिलाही  मोडवेना आणि शेवटी ती  पार्टीसाठी तयार झाली ...
तसेही हॉस्टेलवरून त्यांचा ७-८ जणींचा ग्रुप होता ,, एका मैत्रिणीच्या फ्लॅटवरच पार्टी होणार होती , आणि हॉस्टेलच्या दोघी ,तिघींकडे गाडी असल्यामुळे येण्याजाण्याचा काही प्रश्नच नव्हता , सगळ्याजणी तयार होऊन ७ वाजताच हॉस्टेलमधून बाहेर पडल्या .. आणि मैत्रिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या फ्लॅटवर जमल्या .
गाणी , डान्स , खाणे पिणे , सगळे अगदी मस्त मजेत चालू होते . मुग्धा , अर्पिता आणि बाकी दोघी तिघी गप्पा मारत  बसल्या होत्या , तितक्यात अर्पिताचा मोबाईल वाजला नंबर पाहून अर्पिता बाजूला जाऊन बोलू लागली, त्यावरून सगळ्यानांच अंदाज आला कि हा नक्कीच अर्पिताच्या बॉयफ्रेंडचा कॉल आहे ..
मुग्धाचे सगळे लक्ष अर्पितावरच होते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते कि ती कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे ..थोडावेळ अर्पिता फोनवर बोलून सगळ्यांच्यात येऊन बसली पण तिचे तिथे लक्ष लागेना कुठल्या तरी विचारात ती गुंगली होती ..
" अग अर्पिता, काय झाले ते तरी सांग , कोणत्या विचारात इतकी गुंग आहे ?" मुग्धा तिला विचारत होती ..
तरीही अर्पिता काहीच बोलेना .. मुग्धा उठून तिच्या जवळ जाऊन बसली ,, आणि तिला विचारू लागली " अप्पू , आपण तर एकमेकींपासून काहीच लपवत नाही , मग काय झाले ते सांग ना .. काही अडचण आहे का ?"
आजूबाजूला कुणी नाही हे पाहून अर्पिता बोलू लागली , "  मुग्धा आज हि आपली पार्टी फक्त मुलींची आहे म्हणून मी अनिकेतला सांगितले होते .....
हो अर्पिता माहित आहे मला आणि म्हणूनच तर मी पार्टीला आले ना !!! मुग्धा तिला मध्येच तोडत म्हणाली ..
अरे हो ग पण पूर्ण ऐकून तरी घे ना माझे म्हणणे ... असे म्हणून अर्पिता बोलू लागली , अनिकेत मला म्हणत होता कि , तू मला पार्टीला नाही बोलावले मग बाकीच्या मुलांना कुणी बोलावले ते का येत आहेत ? मी तुला म्हणत होतो कि आपण पार्टी आपण एकत्र करू पण तू ऐकले नाही माझे ......

हे ऐकून मला काहीच समजेना म्हणून त्याला मी विचारले अरे असे कसे होईल जर मी तुलाच नाही बोलावले तर बाकीच्या मित्रांना कसे बोलवेन ? पण तो काही ऐकूनच घेईना ग !!! तो म्हणाला तुमच्या बाकीच्या मैत्रिणीनी बोलावले असेल त्यांना .. आणि बघ ते येत आहेत पण त्यांचा विचार मला काही चांगला दिसत नाही "
असे म्हणून अनिकेतने फोन ठेवला .... परत अर्पिता त्याला फोन लावत होती पण त्याचा फोन बंद होता ...
हे ऐकून मुग्धाही विचारात पडली .. तिलाही समजेना काय करावे ते ?
दोघीनी ठरवले कि सगळ्यांना विचारून बघायचे कि कुणी या मुलांना पार्टीमध्ये बोलावले ? त्याप्रमाणे त्या एक एकीला जाऊन विचारू लागल्या पण सगळ्याच नाही नाही म्हणत होत्या ....
मुग्धा अर्पिताजवळ आली तिच्या कानात तिने काहीतरी सांगितले आणि ती पटकन तिथून निघून गेली , मुग्धा जाऊन फक्त १० -१५ मिनिटेच झाली तेवढ्यात दारावरची बेल वाजली अर्पिताला वाटले आली असेल मुग्धा तर ... पुढे त्यांच्याच कॉलेजमधील चार पाच मित्र होते ,, अर्पितां आणि बाकीच्या दोघीजणी येऊन दारातच त्यांना थांबवले आणि विचारू लागल्या तुम्ही इथे काय करत आहात ?
तर त्यातील एक जण म्हणाला , हे बरे आहे अर्पिता एक तर   स्वतः मेसेज करते पार्टीला या आणि आता आलो तर दारातच आमची उलट तपासणी ??
काही काय मी कधी केला तुम्हाला मेसेज ? अर्पिता विचारत होती ...
त्यातील एकाने त्याचा मोबाइल दाखवला आणि त्यावरचा मेसेजपण .... be ready for party at ८:३० ...
आता उडायची वेळ अर्पिताची होती ... तिला काहीच माहिती नव्हते .. सगळ्याजणी अर्पितालाच बोलू लागल्या तू आम्हाला विचारत होती आता हे काय म्हणून ? अर्पिताला तर काहीच सुधरत नव्हते आणि मुग्धाही नाही ....
सगळेच आत आले  अर्पिता डोक्याला हात लावून विचार करत होती मी कधी पाठवला असेल हा मेसेज ??
पण तिला फक्त प्रश्नच दिसत होते त्याची उत्तरे नाहीच ...
अर्पिताने मुग्धला मेसेज केला ,, कुठे आहे ? लवकर ये !! पण मुग्धाचा काहीच रिप्लाय नाही .. तिने तिला फोन केला तर पलीकडून फोन कट केला त्यावरून अर्पिताला मुग्धाची आणखीच काळजी वाटू लागली..
मुग्धा गाडीवरून जात होती तर तिच्यापासून पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून तिने गाडी थांबवून पहिले तर कुणाचा तरी ऍक्सीडेन्ट झाला होता तिने उतरून जवळ जाऊन पहिले तर ती गाडी अनिकेतची होती  !!! त्याला बराच मार लागला होता अनिकेत त्याचा पाय धरून जोरजोरात ओरडत होता ...
मुग्धाने पटदिशी तिथल्या लोकांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले ... आणि अर्पिताला फोन केला आणि सगळे सांगितले ..
थोड्याचवेळात अर्पिता आणि बाकीचे सगळेच तिथे आले ,, अर्पिता  रडत रडतच मुग्धाच्या गळ्यात पडली .. सगळे बाहेर थांबले होते ..
त्याच हॉस्पिटलमध्ये दुसरी केस होती म्हणून इन्सपेक्टर अवि  आले होते .. या सगळ्याची गर्दी पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले काय झाले कसली गडबड आहे .. डॉक्टरांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगतली ..
असे होय म्हणत ते कसल्यातरी विचारात बाहेर गेले आणि रडणाऱ्या अर्पिताला पाहून जवळ बोलावले ,आणि तिला विचारू लागले खरा खरा हा प्रकार काय आहे ते सांगा ... अर्पिता खूप घाबरली होती आणि परत पोलीस पाहून तर जास्तच रडू लागली ...
मुग्धाने अर्पिताला शांत केले आणि सगळा प्रकार सांगितला ..
हे सर्व  ऐकून ते  अर्पिता आणि मुग्धाला घेऊन ज्या रूममध्ये अनिकेत होता तिथे  गेले .. अनिकेतचे सगळे मित्र तिथेच होते ,, अचानक मुग्धा आणि अर्पिता पोलिसांसोबत पाहून सगळ्याचे चेहरे पांढरे पडले ... सगळेच तिथून निघून जात होते पण दाराजवळ आणखी दोघे उभे होते त्यामुळे ते गपचूप आत येऊन उभे राहिले ..
अनिकेत तर तिथून उठूच शकत नव्हता .. त्यामुळे अवीनी त्याला काही विचारायच्या आधीच तो बोलू लागला....
सॉरी अर्पिता !!! मला हे असे करायचे नव्हते पण मला तुझा खूप राग आला म्हणून मग मी ......
अर्पिता त्याच्याकडे पाहतच होती तो हे सगळे काय बोलत आहे ?
" अनिकेत नीट सांग मला काहीच समजत नाहीय तुला काय म्हणायचे आहे ते ?" अर्पिता त्याला म्हणत होती ..
अर्पिता तुझ्या मोबाइलवरून मीच सगळयांना मेसेज केले होते ... पार्टीला या म्हणून ,, आणि सगळयांना सांगितले होते कि तिथे जाऊन दंगा घालून मगच परतायचे .. ..आणि हे सगळे माझ्यावर येऊ नये म्हणून मी तुला फोन केला सांगायला ,,  त्यानंतर अचानक मी मुग्धाला बाहेर पडताना पहिले मला सगळ्यात जास्त राग मुग्धाचाच आला होता , कारण तिच्यामुळेच तू मला पार्टीसाठी नाही म्हणाली होतीस ...  म्हणून मी मुग्धाच्या मागे मागे जाऊ लागलो .....
 "मुग्धा तू तर मला सांगूनच गेली होतीस ना कि मी १० मिनिटात जाऊन येते .. पण कुठे ते काहीच नाही सांगितले !!!" अर्पिता तिला विचारत होती ..
अग आपली गडबड चालुच होती आणि तितक्यात मला या अविकाकांचा फोन आला कि ते इकडे आले आहेत आणि आपलाही प्रॉब्लेम सुटेल म्हणून मी त्यांच्याकडे येत होते तर .. मी येत असताना मला असे जाणवले कि माझा पाठलाग कुणीतरी करत आहे !!! मी पुढे जाऊन थांबणार होते  तर मागे याची गाडी खड्डयात कोसळली मग इथे त्याला  घेऊन आले...
आणि अविकाकांना सगळे सांगितले ,, त्यांना असे वाटले कि यात काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी मला सांगितले होते कि मी त्यांना ओळखते असे नाही दाखवायचे ...
आणि पुढचे सगळे तर तुला माहित आहेच .... इतक्या कमी वेळात इतके सगळे घडले अर्पिता कोसळतच होती तितक्यात मुग्धाने तिला सावरले .. आणि बाहेर घेऊन गेली
इकडे अनिकेत अवीची माफी मागत होता ,, असे कधीच परत करणार नाही म्हणून .... पण अविने त्याला सांगितले कि अर्पिताचे जे काही म्हणणे असेल त्यावर ठरेल तुझे काय करायचे ते .... !!!!
मुग्धा आणि अर्पिता बाहेर येऊन शांत बसल्या होत्या काहीच न  बोलत योगायोगाने एक अपघात घडता घडता टळला होता !!!







Thursday, October 13, 2016

शेजारी शेजारी

आमच्या घराशेजारी एक काका काकू राहतात , म्हणजे  ज्यावेळी आम्ही आमचे मूळगाव सोडून कवठेमहांकाळला राहायला आलो त्यावेळी आम्ही त्यांच्या तिथे राहायला आलो  . मी  ३ वर्षाची असेन . 
त्यावेळी पासून हे काका काकू आमच्या ओळखीचे , शेजारचे आणि हळूहळू जशी  रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळ होत जातात तसेच त्यांचे आणि आमचे सूर जुळत गेले .. 
आम्ही राहायला जाण्याआधी नुकतेच त्यांचे लग्न झाले होते , काकूही नवीन होत्या त्यांच्यासाठी ते सासर होते त्यामुळे कधी काही वाटले कि आईशी येऊन बोलत , त्यांचेही मन हलके व्हायचे तेवढाच त्यांना मोकळेपणा मिळत असे . 
 ते आणि आम्ही जास्त काही नाही पण ३-४ वर्ष त्याच गल्लीत एकत्र होतो परत आमचे स्वतःचे घर झाले आणि आम्ही थोडे दूर आलो त्या गल्लीपासून फार नाही पण ५-१० मिनिटाच्या अंतरावर ... 
फक्त घर दूर झाली मने नाही ... त्यामुळे येणे जाणे चालूच होते . 
पुढे काका काकू वेगळे राहायला लागले त्यांनाही दोन मुले झाली ,,, एका मोठ्या घरातून फक्त एका खोलीच्या घरात त्यांना संसार करावा लागत होता .. पण त्यातही ते इतके सुखी आणि आनंदाने राहत होते ,, कधीच त्यांनी कोणत्याही गोष्टीची  तक्रार नाही केली .. जे आहे त्यात समाधान मानले .. 
त्यात त्या दोघांचे शिक्षण फार नाही त्यामुळे कायमस्वरूपी अशी नोकरी नाहीच ,,काका  सारखे काही ना काही नवीन उदयॊग करत पण त्यातही यश असे नाहीच .. काकूही  जमेल तसे शेतात , कधी कुठे मिळतील ती कामे करत त्यांच्या संसाराला हातभार लावत .. विशेष म्हणजे त्यांची परिस्थिती नसून सुद्धा ते सगळ्याना इतकी मदत करतात आणि त्याचा कधीही कांगावा करत नाहीत ,, कधीही जा त्यांच्याकडे नेहमी हसतमुख मिळतील , 
आपल्या दुःखाचे कधीच भांडवल करणार नाहीत ... 
काकू अळूवड्या खूप छान करतात , आणि आमच्या घरी तर खूप फेमस आहेत त्यामुळे आमच्या तिघांपैकी कुणीजरी घरी गेले तरी वड्या घेऊन त्या स्वतः येतात अगदी न सांगता .. आईला जरा जरी बरे नसले कि नेहमी मदतीला असतात .. त्यांना कधीच काही बोलावे नाही लागत ... एखादी गोष्ट आपण कुणालातरी अधिकारवाणीने सांगू शकतो त्यातले हे कुटुंब आहे ... 
चांगले शेजारी मिळायलाही नशीब लागते ,, फक्त एक हाक मारली तर धावून येईल इतकी जवळची माणसे ,, मी आईला खूप वेळा विचारले कि हे दोघे आपल्यासाठी इतके का करतात ?  त्यांच्यासाठी आपण  खास असे काहीच केले नाही  तरीही  ?? फक्त वेळोवेळी त्यांच्या साथीला उभे राहतो इतकेच !!!!! 
"आपले बोलणे गोड़ , मन शुद्ध ,चांगले असले कि सगळे आपोआप होते आपण काहीच करावे लागत नाही " आमच्या आईचे उत्तर !!! 
खरेच ना काही नाती मनाने किती घट्ट जोडली जातात कळतच नाही ... कधी केव्हा कशी ???
आजही नियती त्यांची परीक्षा घेतच आहे पण तरीही ते ठामपणाने तिच्यासमोर उभे आहेत आणि नेहमीच राहतील ... 


Tuesday, October 11, 2016

सीमोल्लंघन

रोज विचार करत असते कि काहीतरी नवीन करायचे  ,, नवीन म्हणजे अगदी काही एव्हरेस्ट सर करायचा असले कि नाही ,, अगदी छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या .. नवीन काही ना काही वाचायचे , काहीतरी लिहायचे किंवा घरातून बाहेर पडून अगदी थोडा वेळ का भटकून यायचे ... पण  कितीतरी दिवस झाले यातले काहीच होत नाहीय .. माझा आळशीपणा कि आणखी काही ?
किती दिवस झाले एक मस्त पुस्तक घरी आणून ठेवले आहे रोज उद्या उद्या म्हणत वाचायचे होतच नाहीय....  सकाळी उठले लॅपटॉप चालू केला कि तिथेच संपले सगळे !!!! थोडा थोडा वेळ म्हणत फेसबुक , ब्लॉग , काही ना काही करत कसा दिवस या नेटवर जातो कळत नाही ... आणि सोबतीला असतेच माझी वामकुक्षी !!! एकदा झोपले कि नवरोबाचा कॉल आला कि मग उठायचे !!! हे रोजचेच आणि आज परत काही नवीन केले नाही म्हणून चिडचिड .... 
कळते आहे सगळे पण वळत काहीच नाही आहे त्याचा सगळं गोंधळ आहे !!! खरेच ना इतके कशी या सगळ्यात वाहून जाते  लक्षातच येत नाही .... सेल्फ कंट्रोलचा  अगदी बोऱ्या वाजलेला आहे . टेक्नॉलॉजी आडिक्ट म्हणतात त्यातला प्रकार आहे ... आता हेहि मला गूगल बाबानी सांगितले इथेही आली तीच परत  
 टेक्नॉलॉजी ... 
या काही तक्रारी नाहीत काळासोबत पुढे जायला तर हवेच पण सगळ्या गोष्टी प्रमाणात हव्यात नाही का ?  नाहीतर म्हणलेच आहे अति तेथे माती !! 
आज दसरा नवीन सुरुवात ,,, स्वतःला घालून दिलेल्या या सिमा , चौकटीतून बाहेर पडून नवीन सुरुवात करण्याचा दिवस ... किती जमेल माहिती नाही  , इतके दिवसाची झालेली सवय , स्वतःच आखलेली एक चौकट ,कंफर्ट झोन सोडणे जरा कठीणच असते ..  
पण तरीही प्रयत्न करायचा .. वर्तमानात जगण्याचा .... 
 असो ... 
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
सोने घ्या सोन्यासारखे राहा .... नेहमीच चमकत !!! 

Thursday, October 6, 2016

अबोली

अबोलीने इंजिनीरिंगची परीक्षा  नुकतीच पास केली आणि ती स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून पुण्यात आली .. पुण्यात एका हॉस्टेलमध्ये राहून ती कुठे एखादा पार्टटाइम जॉब मिळतो का हेही शोधत होती ..
मध्यमवर्गीय घरातील मुलगी ,तिच्यामागे अजून एक बहीण आणि भाऊ होता . आणखी घरच्यावर भार न होता तिला आपले करियर घडवायचे होते . 
अबोलीचे आई बाबा तिच्यापाठी नेहमीच होते , पण वयात आलेल्या मुलीची जशी सगळ्या पालकांना काळजी असते तशी त्यांनाही होती . अबोलीचा मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आला होता . मुलाचे शिक्षण अबोलीपेक्षा कमी होते पण घरची परिस्थिती उत्तम होती .. मामाच्या आग्रहामुळे अबोलीच्या घरच्यांनी बघण्याचा कार्यक्रम ठरवला आणि रीतसर तो पारही पडला .  तिच्या लग्नामुळे नाही म्हणले तरी आई वडिलांवरचा भार थोडासा का होईना पण कमी तर नक्कीच होणार होता त्यामुळे अबोलीच्या मनाची चलबिचलता होत होती ... ते आई बाबानी ओळखले आणि तिला सांगितले , 
" हे बघ बेटा , हे तुझे पहिलेच स्थळ आहे,  त्यामुळे आपण अजून मुले पाहू तुला याच मुलाशी लग्न करायला हवे असे काही  नाही " तिलाही ते पटले आणि ती परत पुण्याला निघून गेली . 
एक दिवस सकाळी क्लासला  जाताना एक मुलगा तिला तिथे बाहेर दिसला , ती जशी जवळ जाऊ लागली तशी तिची खात्री पटली अरे हा तर तोच , त्या दिवशी मला पाहायला आलेला राहुल !!!!"  हा इथे कसा ? "
स्वतःच्या मनातच विचार करत ती पुढे जात होती तर , राहुलने तिला थांबवले आणि तिला विचारू लागला 
," तू मला नाही का म्हणाली ? मी तुझ्यापेक्षा कमी शिकलो होतो म्हणून का ? " यावर तिला काय उत्तर द्यावे ते  समजेना तो तिला खूपच दमदाटी करू लागला , रस्त्यात तमाशा नको म्हणून तिने त्याला काहीतरी सांगितले आणि तो तिथून निघून गेला .. कशीतरी अबोली क्लासमध्ये पोहचली . 
होस्टेलला परत जाताना हा तिथेच होस्टेलच्या बाहेर उभा !!! तिला परत तेच प्रश्न .. आणि यावेळी तर त्याने तिला स्पष्ट सांगितले , " तू मला खूप आवडली आहेस त्यामुळे तू लग्नाला तयार होईपर्यंत मी तुझा असाच पाठलाग करणार .. "
हे ऐकून तर अबोली रडायलाच लागली तिच्या मैत्रिणी तिला तिथून घेऊन गेल्या .. पण राहुल रोजच तिच्या क्लास बाहेर , होस्टेलबाहेर थांबून तिला त्रास देऊ लागला .. 
एक दिवस तर त्याने कहरच केला ती सुट्टीसाठी घरी गेली होती त्यावेळी तो तिच्या घरी गेला आणि  तिच्या आईबाबांना म्हणू लागला कि आज मी एक फ्लॅट घेतला आहे आणि त्याची पूजा अबोलीनेच केली पाहिजे आणि तिने तसे नाही केले तर पुढे जे काही होईल ते तुम्हाला खूप त्रासदायक ठरेल .. आणि त्यांच्या घरासमोरच बसून राहिला बराच वेळ झाला तरी तो तिथून जाईना , सगळे शेजारी पाजारी गोळा होऊ लागले .. सगळ्यांसमोर दंगा नको म्हणून अबोलीचे बाबा तिला त्याच्या नवीन फ्लॅटमध्ये घेऊन गेले तिने पूजा केली .. आणि ते परत घरी आले . 
यांनतर अबोली मात्र थोडी बदलली तिला असे वाटू लागले कि आपल्यावर इतके वेड्यासारखे प्रेम  कोण करू शकते ? या विचाराने एकीकडे ती सुखावत होती ,पण मनात तिला त्याची भीती वाटत होती .. 
यानंतर त्यांचे रोजच फोनवर बोलणे सुरु झाले , तीही त्याला भेटायला जाऊ लागली .. कुणाशी तरी लग्न करायचे हा आपल्यावर  इतके प्रेम करतो मग यांच्यासोबतच का नको ? हा विचार तिने घरी सांगितला . 
तिचे बाबा तिला परोपरीने समजावत होते कि नीट विचार कर मग निर्णय घे , कोणतीही घाई नको करू .. पण अबोली काही ऐकूनच घेत नाही म्हणल्यावर तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले . 
अबोलीला पुढे शिकायचे होते म्हणून राहुलने तिला पुण्यात राहा म्हणून सांगितले तोही तिला भेटायला येत असे.... 
थोडे दिवस गेले आणि राहुलचे खरे रूप तिला समजायला लागले ..... 
ती क्लासमध्ये गेली कि हा तिच्या मागे जाणार , ती मुलीसोबत बसते का ते बघणार ? मुले मुली सोबत बसत असतील तर त्या क्लासमध्येच दंगा घालणार ... अबोली तर शरमेनेच मरून जायची पण त्याच्यासमोर बोलण्याची तिची हिम्मत नव्हती . 
रस्त्यावरून जाताना मैत्रिणीसोबत बोलायचे नाही हसायचे नाही ... तिने स्वतः हुन कुणालाही फोन करायचा नाही , त्याचा फोन आला कि तो पहिल्या रिंग मध्येच उचलायला हवा नाहीतर तिची काही खैर नाही .. वेगवेगळ्या प्रकारे तिला धाकात ठेवायचे त्याने सुरु केले होते ... त्याच्या आई वडिलांचा त्याला पाठिंबा होता !!
एक दिवस अबोलीच्या बाबांनी त्याला समजवायचा प्रयत्न केला तर , त्याने त्यांना स्पष्ट सांगितले कि आज पासून तुम्ही अबोलीशी बोलायचे नाही .. आणि अबोलीलाही बजावले ...
याघटनेनंतर अबोलीचे आई बाबा तिला घटस्फोट घे म्हणून मागे लागले तर त्याने  अबोलीला सांगितले कि जर तू असा विचार जरी केलास तरी तुझ्या बहिणीचे आयुष्य उध्वस्त करेन .. 
अबोलीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती आपल्याच हाताने आपले मरण ओढवून घेतले असे तिला राहून राहून वाटे .. 
राहुलचे कुणीही मित्र मैत्रीण आले कि हिने तो सांगेल तितकेच त्यांच्याशी बोलायचे ,, एक चालत बोलता कठपुतळी बनली होती तिची .. .. 
राहुलसोबतच ती त्याच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती त्यावेळी तिचा कुणीतरी एक मित्र तिथे आला होता तो अबोलीला पाहून तिच्याशी बोलायला आला ,, त्याला पाहून अबोली तिथून जात होती पण तो तिला हाक मारत आला हे पाहून राहुलला खूप राग आला त्याने तिथेच अबोलीच्या कानफटात मारली आणि त्या मित्राची कॉलर धरून त्याला मारू लागला ... तिथल्या लोकांनी राहुलला आवरले नाहीतर तो बिचारा तिथेच मेला असता ... 
एका वर्षात अबोलीला त्याने तिचे जगणे नकोसे केले होते .. जिथे ती जाईल तिथे बंधने ... !!! सगळे सोडून परतही जाऊ शकत नव्हती ... 
आणि शेवटी तिने निर्णय घेतला बस आता सगळे संपवायचेच ... 
पण त्यावेळीच तिला जाणीव झाली कि आता जगायला हवे सगळे संपवून नाही चालणार ... या छोट्या जीवासाठी तरी जगायला हवे ... 
इतकी गोड़ बातमी मिळूनही राहुलच्या वागण्यात तसूभरही फरक पडला नाही त्याला आणखीन एक नवीन विषयच मिळाला बोलायला .. त्याला तिच्या पोटातले बाळ कधीच त्याचे वाटले नाही .. 
यानंतर मात्र अबोलीचा संयम सुटला ... आणि ती राहुलाला बोलू लागली .,, इतके दिवसाचा राग , त्रास मनातील कोंडमारा सगळा बाहेर पडत होता ... पण याचा त्रास झाला तो त्या बाळाला आणि कळी जन्माला येण्याआधीच कोमेजून गेली .. 
हा आघात अबोलीसाठी खूप मोठा होता यात ती स्वतःला हरवत गेली ती कायमचीच ..... 





Sunday, October 2, 2016

आनंदी

" तुला आधीच सांगून ठेवतोय यावेळी पोरग झालं तर तू घरी येशील  नाहीतर कायमच तोंड काळ करशील समजल का ? " सविताचा नवरा तिला सांगत होता .
लग्न झाले तेव्हा सगळे गोड गोड असणारे वातावरण आंनदीच्या जन्मानंतर  बदलेले होते . आनंदी सविताची पहिली मुलगी .... 
लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आणि आणि तिला आपल्या आई होण्याची चाहूल लागली , सविताने नवऱ्याला सांगताच तो तर आनंदाने वेडा होऊन गेला  सासूपण अगदी आनंदाने कौतूकाने तिचे डोहाळे पुरवीत होती  .. 
आपले होणारे कौतुक पाहून सविताला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता . 
भराभर दिवस जात होते , तशी सविताच्या माहेरची परिस्थिती बेताचीच पण लेकीचे पहिले बाळंतपण माहेरीच झाले पाहिजे म्हणून सविताची आई सातवा महिना लागल्यावर तिला घेऊन आली होती , सविताचे दिवस आनंदात जात होते म्हणता म्हणता नऊ महिने पूर्ण झाले आणि सविताने एक गोंडस मुलीला जन्म दिला .. मुलगी अगदी तिच्यावरच गेली होती ...
सविताच्या आईने तिच्या सासरी निरोप पाठवला एक दिवस गेला , दुसराही गेला पण कुणीच येईना तिला भेटायला .. बाळाच्या जन्मासाठी आतुर झालेली माणसे  कुणीच का येत नाही भेटायला ? सविताला कळत नव्हते कि बाळाच्या जन्माचा आनंद मानू का दुःख ? हि जन्माला आली आणि  माझी माणसे माझ्यापासून दूर गेली .. 
त्यावेळेपासूनच तिला तिची मुलगी नजरेसमोर नकोशी झाली .. 
यात त्या जन्माला आलेल्या लहानशा जिवाचा काय दोष होता ? हे तिला कळत होते पण ... 
एक दीड महिना माहेरी राहून छोट्या आनंदीला घेऊन सविता सासरी परत गेली पण ती आली काय किंवा गेली काय ? कुणालाच त्याचे काही नव्हते ... 
सविताला कळून चुकले कि आपल्याला पहिली मुलगी झाली म्हणूनच हे असे होत आहे .... 
सारखे सासूचे तिरकस बोलणे , नवऱ्याचे तिच्याशी नीट न वागणे याचा राग सर्वतोपरी त्या छोट्या आनंदीवर निघू लागला  तिलाही कळायचे नाही कि आपले काय चुकायचे !!!! 
परंतु वेळ सारखीच नसते  आणि परत एकदा सविताला आपल्या आई होण्याची चाहूल लागली ... पण यावेळी तिच्या सासूने आई नवऱ्याने तिला सांगितलेच होते मुलगा झाला तर घरी यायचे.. 
आनंदी तशी लहानच होती , आपल्यासोबत काय होते ? आजी, बाबा आपल्यासोबत नीट का नाही बोलत ? सारखे  का रागवतात ? हे तिला कळत नसे ... आणि सविताही कधी कधी तिच्यावर राग काढत असे त्यामुळे आनंदी शांतच होत होती . तिला आता फक्त इतकेच माहिती होते आपल्या आईला एक छोटे बाळ होणार आहे त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही . मुळातच शांत असणारी आनंदी यामुळे आणखी शांत होत गेली . 
नवऱ्याने आधीच सांगितल्यामुळे तिच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती , कितीतरी देवांना नवस बोलून तिने पाण्यात ठेवले होते आणि अखेर ते तिच्या कामाला आले आणि सविताला मुलगा झाला ... 
यावेळी तिच्या नवऱ्याने,  सासूने मोठ्या थाटामाटात बाळाचे बारसे केले , सविताचे थोडेसे कौतुक होऊ लागले यात सवितालाहि आनंद होत होता पण या सगळ्यात आनंदी कुठेतरी मागे पडत होती , तिच्या बालमनावर  आतापासूनच एक मुलगी असण्याचे ओरखडे उमटत होते .. 
अभि आनंदीचा लहान भाऊ सगळ्याचा खूप लाडका ,, आनंदीचासुद्धा   ,... 
अभि आणि आनंदी मोठे होत होते .. सगळे अभिचे लाड करत त्याला काय हवे ते नको बघत पण अभिला मात्र त्याची ताई खूप प्रिय होती त्याचे सगळ्यात जास्त प्रेम आपल्या ताईवर होते .. त्यालाही समजत होते आई सोडले तर जास्त कुणी ताईशी बोलत नाही , तिचे लाड कुणी करत नाही .
त्याने एकदा ताईला विचारले होते ताई हे सगळे असे का वागतात , त्यावेळी नेमकी तिथे आजी आली आणि तो विषय तिथेच थांबला . 
आनंदी शाळेत खूप हुशार होती , अभिला अवघड वाटणारे विषयही ती अगदी सोपे करून सांगायची त्यामुळे अभिला आपल्या ताईचा आणखीच अभिमान होता .. 
सविताला असे आपल्या दोन्ही मुलांना एकत्र पहिले कि समाधान वाटत असे जे ती तिच्या मुलीसोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही याचे तिचे दुःख थोडेतरी कमी होई .. 
अभिला आता कळू लागले होते कि एक मुलगी आहे म्हणून आपल्या ताईला इतकी बंधने आहेत , ती मुलगी आहे म्हणून आजीला , बाबांना ती आवडत नाही .. त्यानंतर तर तो आपल्या ताईची जास्त काळजी घेऊ लागला...
आनंदीचे यावेळी बारावीचे वर्ष होते , त्यानंतर तिला शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार होते ... प्रश्न होता तो तिच्या घरच्यांचा ते तिला शिकण्यासाठी पुढे पाठवतील का ? तिच्या आजीने तर आतापासूनच तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती .. या सगळ्याची कुणकुण अभिला लागली तसाच तो आजीकडे गेला आणि तिला सांगितले कि जर ताईला तुम्ही पुढे नाही शिकवले तर मीहि उद्यापासून शाळा सोडेन घरीच राहीन ...
आजीने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण अभि काही ऐकून घेईना शेवटी त्याच्या ताईने समजावले तरी तो ऐकेना म्हणल्यावर आजीचा नाईलाज झाला , पुढच्या शिक्षणासाठी आंनदीला बाहेर पाठवले .
 आनंदी मुळातच हुशार आणि लाघवी त्यामुळे कॉलेजच्या वातावरणात लगेच मिसळून गेली .  आनंदी नव नवीन यशाची शिखरे गाठत होती ..  त्यातूनच तिला जॉबचा कॉल आला ...
तिने हि बातमी सगळ्यात आधी अभिला फोन करून सांगितली , तसा अभि खुश होऊन तिला भेटण्यासाठी म्हणून येऊ लागला आणि येताना त्याच्या बाइकचा अपघात झाला ..
त्याला तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी दवाखान्यात ऍडमिट केले , आणि घरी फोन करून सांगितले तसे सविताला काही सुचेना  ... सगळा दोष परत आनंदीच्या माथ्यावर आला होता  सविता , तिचा नवरा , आणि सासू दवाखान्यात पोहचले पण त्याच्या आधीच आनंदी तिथे होती ...
इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपले कसे होणार याच्या विचारानेच सविता आणि तिचा नवरा कावरा बावरा झाला होता पण आनंदी सगळे अगदी मोठ्या हिमतीने करत होती , अभिला लागणारे रक्त यासाठी  तिने तिच्या मित्र मैत्रीणीना बॊलवून घेतले होते , औषधे , सगळ्या टेस्ट यासाठी तिला सगळेच खूप मदत करत होते.
हे सगळे पाहून तिच्या आजीला आणि बापाला काय बोलावे हे कळत नव्हते , सविताला मात्र आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता .  सगळे मार्गी लागल्यावर आनंदी आजीजवळ आली आणि म्हणाली , " आजी काही झाले तरी माझ्यामुळे मी अभिला काही होऊ देणार नाही , आजवर त्याने माझ्यासाठी खूप केले पण आता माझी वेळ आहे ." इतके सगळे आजीशी बोलण्याची आनंदीची पहिलीच वेळ होती ...

अभिला बरे होण्यासाठी दोन महिने लागले पण त्यासाठी आंनदीने तिचा जीव ओतला ... अभि बरा झाला त्यावेळी त्याने पहिला प्रश्न हाच विचारला , " ताई ?"
 त्यावेळी हसरी आनंदी तिच्या आजीसोबत त्याच्याजवळ आली ...
ते पाहून अभि चक्रावला इतके सगळे अचानक ?
आनंदीची वेगवेगळी रूपे तिच्या आजी आणि वडिलांना पाहायला मिळाली होती तीच कि जी एक मुलगीही करू शकते , आनंदीने त्यांना दिलेला आधार , अभिची काळजी ... आणि बरेच काही
अभिच्या आजरपणामुळे का होईना पण आनंदींच्या आयुष्यात आज खरेच आनंदी फुलली होती ..





Wednesday, September 28, 2016

पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास

२६- २७ सप्टेंबर आज अमेरिकेत पाउल टाकून २ वर्ष उलटून गेली .
अजूनही आठवतो तो पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास .... आणि त्याच्या आठवणी आणि तसेही सगळ्याच पहिल्या गोष्टी खूप खास असतात ना !

माझा नवरा ऑगस्ट मध्येच इकडे आला होता माझ्या व्हिसासाठी मी थांबले होते ,  गौरी गणपती होते मी आपले नवरोबाला टुक टुक करत मोदक खाणे , पुरणपोळी यावर ताव मारत  होते . आईपण एकदा लेक अमेरिकेला गेली कि लवकर येणार नाही म्हणून आपले रोज रोज वेगवेगळे पदार्थ करून घालत होती . माझी आपली मजा चालू होती आणि आमच्या नवरोबांनी बॉम्ब टाकला कि तुला २७ ला निघायचे आहे .... काय सांगू हातात थालीपीठाचा घास होता तसाच राहिला .... कधीतरी जायचे होते हे माहित होते पण अचानक असे दत्त म्हणून समोर उभे ठाकले आणि श्वासच अडकला माझा ....
एक तर फक्त चार दिवस आधी कळाले ती तयारी , पहिला इतका दूर  एकटीचा प्रवास ,,,काहीच माहिती नाही ... याचे टेन्शन  आणि खरे सांगू का सगळ्यात जास्त वाईट वाटतं होते आई बाबांपासून इतके दूर राहणे जे माझ्यासाठी निव्वळ अशक्य होते त्यासाठी मी माझ्या मनाची तयारी खूप आधीपासून करत होते पण तरीही ..... कॉलेज साठी सुद्धा बाहेर होते  पण प्रत्येक आठवड्याला घरी जात असे माझे घर म्हणजे माझा श्वास आहे .....
आणि आता इतके दूर पण काहीच पर्याय नाही लग्न संसार  आणि कायतर म्हणे   समाज !!!..... जास्त दिवस मुलगी माहेरी राहिली कि आई बापापेक्षा शेजारच्यांना जास्त काळजी असते तिची  हो ना !!!...
असो ,
मग काय माझ्या प्रवासाची  तयारी सुरु..... दुसऱ्याच दिवशी आई बाबांचा निरोप घेऊन कवठे महांकाळहून पुणे हा प्रवास केला ... या सहा तासाच्या प्रवासात मला फक्त आणि फक्त माझ्या बालपणीचा काळ आणि माझ्या लग्नाआधीचे सगळे डोळ्यासमोर दिसत होते सगळे अगदी भर भर सरकत होते .... याच आठवणीत पुणे कधी आले ते कळालेच नाही , पुण्यातही  घरी जाऊन बॅग भर , सामान घेणे  , वजन करणे एक ना अनेक गोष्टी होत्या हे सगळे करताना इतके जिवावर येत होते कि सगळे सोडून तिथेच थांबावे वाटत होते ....
या सगळ्यात कमी कि काय म्हणून डोक्याला त्रास देणाऱ्या गोष्टी होत्याच  .... वेळ असते एक बाकी काही नाही  .....
पुण्यात दीदींकडे गेले पण तिथे माझी ८ महिन्याची गोडुली भाची स्पृहा तिच्यापासूनपण दूर जाणे .. खूप रडू येत होते पण काय करणार .....
२७ सप्टेंबर ला मुंबईहून पहाटे ४ ला विमान होते ... मुंबई ते दुबई , दुबई ते बोस्टन ...
माझा भाऊ मला सोडायला एअरपोर्टला येणार होता , काही म्हणा बाकी कितीही भांडलो , कसेही वागलो तरी  भावा बहिणेचे नाते  हे निराळेच  ... पुणे ते मुंबई कॅब प्रवास शुक्रवार असल्यामुळे रात्री ट्राफिकजॅमची भीती वेगळीच त्यामुळे पुण्यातून आम्ही लवकर निघायचे ठरवले आणि आमचा प्रवास सुरु झाला ...
खरे तर मला खूप खूप भीती वाटत होती इतका दूर प्रवास , मला जमेल का ? सगळे नीट होईल ना ... ??
तसा भाऊ होता सोबत म्हणून काळजी नाही पण कुणी कुणी काही तरी सांगितलेले असते त्याची  भीती मनात बसते ना तसे झाले होते ....
पण या कॅब प्रवासात मला एक मैत्रीण मिळाली आणि ती चक्क दुबई पर्यंत माझ्या सोबत असणार होती त्यावेळी हे ऐकून झालेला आनंद मी शब्दात नाही सांगू  शकत ...
म्हणजे वाळवंटात पाणी दिसावे आणि अगदी तसे  ,, माझे सगळे टेन्शन कुठल्या कुठे गाळून पडले माहित नाही... !!
आपली काळजी असते कुणालातरी योग्य वेळी तो अनुभव येतो आणि तसेच  झाले .अगदी ...
मी रिलॅक्स होऊन तिच्याशी बोलू लागले मग आमची ओळख अगदी आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत अशी झाली ... मनातल्या मनात म्हणत होते माझ्या बडबडीचा फायदा कधीतरी कुठेतरी होतोच होतो ... उगीच आई आपली मला म्हणत असते कि किती बडबड करते म्हणून !!!!
गप्पा चालूच होत्या तितक्यात आमचे एअरपोर्ट आले आमचे म्हणजे मुंबईचे .... !!!
तिथे बाहेरच्या टपरीवर (सॉरी सॉरी कार्टवर ) पावभाजी खाऊन झाली एका पावभाजीचे २०० रुपये !!!!!!!
थोडावेळ बाहेर फिरणे चालू होते आता निरोप घ्यायचा होता तो भाऊरायाचा !! किती कठीण ना ?? त्याला करमणार नाही का तर मी भांडायला नसेल ना !!!! कोणत्या वेळी कशाचीही काळजी मला नाही का !!! तो मला बाय बाय करून गेला ...  आणि
मी आणि माझ्या मैत्रिणीने एअरपोर्टच्या आत पाऊल टाकले माझी पहिलीच वेळ ... मला कोणत्याही दृष्टीने वाटत नव्हते कि मी भारतात आहे इतके टकाटक ... काहीतरी पहिल्यांदाच पाहत होते !!! ...
पण मस्त आहे  हा एअरपोर्ट चकाचक ...
अजून आमचे काउंटर ओपन झाले नव्हते , तिला पुढे जर्मनीला जायचे होते तिने याआधी खूपवेळा प्रवास केलेला त्यामुळे ती निवांत बसली होती ....
मीच आपली बावरले होते वेड्यासारखी कशाला घाबरत होते तेच लक्षात येत नव्हते आणि आजही कळत नाहीय ... कदाचित अपनोसे दूर त्यामुळे त्यावेळचे  बावरणे , घाबरणे असेलही ....
पण माझ्या मैत्रिणींमुळे माझा बराच ताण हलका झाला होता ,, आम्ही बोर्डिंग पास घेतला , सिक्युरिटी चेक झाले गेट  जवळ जाऊन निवांत बसलो अजून दिड दोन तास वेळ होता ...
आजूबाजूला सगळेच पेंगुळलेले होते कुणी झोपले होते , कुणाचे मोबाईल , लॅपटॉप काही ना काही चालू होते  ... मी आपली सगळीकडे फिरत बसले होते !!!
इमिरेट्स माझी पहिली इंटरनॅशनल फ्लाईट .... मुंबईला जाऊन बसले विमानात पण विंडो सीट नाही त्यामुळे काहीच दिसेना कसे बसे पहाटेच्या वेळचे मुंबईचे दर्शन डोळ्यात साठवून घेतले आणि उड्डणांस सज्ज झाले ...
इतकी झोप येत होती आत गेल्यावर अर्ध्या तासाच्या आतच मी झोपले  जेवण आल्यावर माझ्या मैत्रिणीनेच उठवले ... पण ते काय जेवण ?? २ घास सुद्धा गेले नाहीत मला ...
पण मैत्रीण  होती ना तिने मेथीचे पराठे दिले ते पाहून दिल एकदम गार्डन गार्डन हो गया ....
मला आठवते तसे मी खोबऱ्याची बर्फीपण खाल्ली होती , पराठे इतके मस्त वाटले ना !!! ते खाऊन परत झोपी गेले ,,, दुबई काय आपल्या शेजारीच त्यामुळे  लगेच २-३ तासात पोहचलोपण  .... पण खाली उतरताना माझा कान इतका ठणकायला लागला कि मला काही सुचेना तिला सांगितले तर ती म्हणली होते असे कधी कधी लॅण्डिंगवेळेस म्हणून तिने मला चघळायला च्युगम दिले त्यानंतर लगेच कान दुखायचा थांबला ...
आता खरी मजा होती इथून आमच्या वाटा वेगळ्या होत्या .... मी बोस्टनला तर ती जर्मनीला जाणार होती .. तिचे विमान आधी होते माझे थोडे लेट होते ...
आम्ही थोडावेळ एकत्र बसलो , गप्पा मारल्या , तिच्या निघायच्या वेळी तिने मला पराठे दिले कारण मला विमानतले जेवण आवडत नाही म्हणून ... आणि च्युगमसुद्धा ... आता परत तिचा निरोप .. जाताना आमचे मेल आयडी आम्ही एकमेकींना दिले आणि आपआपल्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो ...
जास्त नाही फक्त काही तासांची ओळख आमची ... पण असे वाटत होते कि खूप वर्षांपासून आम्ही ओळखत आहे एकमेकीना .. किती निराळी असते ना हि दुनिया !! थोडे द्यायचे असते आणि थोडे घ्यायचे असते यातच खरी गंमत असते !!! पण काही लोकांना नाही कळत ती .....
कधीही मुंबईला एअरपोर्ट वर गेले कि ती आणि मी उभ्या आहे असेच मला जाणवते ,, माझी पहिली विमानप्रवास मैत्रीण स्नेहा....
आजच तिच्याशी खुपदिवसांनी बोलले आणि परत या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला
शेवटी काय आहे या मैत्रीच्या खास गाठी कधी कुठे जुळून येतील सांगता येत नाही ना !!!









Thursday, September 22, 2016

Autumn ..... पानगळ





आज फॉलचा पहिला दिवस , autumn किंवा fall  सुरु झाला म्हणजे आता झाडाची पानगळ सुरु होईल . पण त्याआधी  झाडाची हिरवी पाने लाल , पिवळा . नारिंगी आणि जांभळा असे वेगवेगळे रंग स्वतःवर ओढून घेतील आणि सरतेशेवटी गळताना तपकिरी रंग पांघरून झोपीच जाईल .
निसर्गाचे ऋतुचक्रही किती मजेशीर ना !!!
आताच उन्हाळा चालू झाला म्हणून इथल्या लोकांनी वेग वेगळी झाडे लावली , त्यांची अगदी छोट्या मुलांप्रमाणे काळजी घेणे चालूच होते ,त्यात मध्येच कधीतरी एखादे गुलाबाचे फुल खुदकन हसताना दिसायचे तर कधीतरी एखादा भोपळा टुणूक टुणूक उड्या मारत असणार . जास्त नाही अगदी जेमतेम तीन ते साडेतीन महिने उन्हाळा पण त्यातही हे आपले झाडे लावयची हौस पुरेपूर भावून घेतात . त्यांच्या शेतात पिकलेल्या भोपळ्याचे , भाज्यांचे फार अप्रूप असते हं त्यांना ..... आणि तोपर्यंतच  ......
हळूहळू फॉलमध्ये  भाज्या , फळे   येऊन झाडे नवीन रूपे धारण करतील एखाद्या नकलाकारासारखी वेगवेगळी रूपे घेतील , ते पाहून आपण मात्र नक्कीच हरकून जाऊ.
हा एक निसर्गाचा चमत्कारच ,  एकाच माणसाची जशी वेगवेगळी रूपे तसेच हे झाडाचे वेगळे रुपडे ... वेगवेगळे सोंग साकारताना कधी निष्प्राण होऊन गळतील हे कळणारदेखील नाही ..... मग राहील तो फक्त त्याचा सांगाडा पण त्यात सुद्धा परत नवीन रंग भरलेच जातील ते खुलेल हसेल अगदी एका तान्ह्या बाळासारखे फक्त त्याला वेळ द्यायला हवा असेच असते ना ऋतुचक्र  ...
यावेळी बघूया नवरोबा कुठे घेऊन जातात फॉलचे दर्शन घेण्यासाठी तिकडे गेले कि येतीलच नवनवीन फोटोसोबत माझे तत्वज्ञान ....
 तोपर्यत हे मागच्यावर्षीचे फोटो बघून घ्या ...






स्वयंभु

आपल्या आयुष्यात अशी काही माणसे येतात कि त्यांना कधी आठवावे लागतच नाही ,अशी एखादी गोष्ट , घटना घडते तीच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासमोर येऊन ठाकते .
शामराव जोशी असेच एक छोट्या गावातील बडे प्रस्थ , सगळेच त्यांना काका म्हणून ओळखत कधी कुणी जोशी बुवाही म्हणत . शेतीवाडी  , दोन भरपूर पाणी देणाऱ्या विहरी , शांत सालस बायको . एक मुलगा आणि मुलगी . 
पांढरे शुभ्र धोतर , सदरा  डोक्यावर शुभ्र टोपी हा नेहमीच पेहेराव यात कधीच बदल झाला नाही , रस्त्यावरून जातानासुद्धा त्यांचा दरारा दिसून येत असे . कुठेही जायचे यायचे म्हणले कि सायकल आणि ते हेच समीकरण. कुणी म्हणाले , " चला सोडतो काका "  तरी यांचे आपले एकच उत्तर,  "नको बाबा !अजून हातापायात जीव आहे तर त्यांना हालचाल नको का द्यायला ? परत बंद पडले कि आहेच तुम्ही उचलायला "  आणि स्वतःच हसणार . पुढचा माणूस काही न बोलता निघून जायचा . 
आयुष्यात कधीच कुणावर अवलंबून ठेवू नको रे गणराया !!! हि प्रार्थना मात्र गजाननाने अगदी मनोमन ऐकली. का नाही ऐकणार तो ? लहानपणापासून गणपतीवर अगदी मनापासून श्रद्धा , भाद्रपदात एखादी जरी पत्री कमी मिळाली तर यांच्या जिवाला घोर .. आणि तोच घोर  परत यांच्या बायकोच्या मागे जमदग्नीच्या कोपासारखा  ... पण तिने वळलेले सुरेख मोदक पाहून त्या कोपावर अलगद शांतीची धार पडायची . 
सहस्रआवर्तने , गणपतीची आरती , उच्चार अगदी स्पष्ट आणि सुरेख , ऐकताना आपलीच तंद्री लागावी आणि डोळे उघडता क्षणी साक्षात त्याचे ते दिव्य रूप समोर यावे .....  असा एक निराळाच माणूस . 
शेतात राबणाऱ्या गडी माणसापासून ते अगदी गावातील प्रतिष्ठित लोकांची  नेहमीच काकांच्या घरी उठबस असायची . जरी शीघ्रकोपी असले तरी कधीच त्यांनी कुणाला दुखावले नाही . विशेषतः त्यांची मुलगी खूपच लाडकी त्यांची ... 
 सकाळी उठून नारळाच्या झावळ्या गोळा करून त्याच्या खराट्याने सगळे अंगण , गोठा स्वच्छ करणे हे त्यांचे पहिले काम , त्याच अंगणात काकू त्यांच्या नाजूक बोटानी रेखीव रांगोळी रेखाटत . सायकल वरून देव दर्शन करून येताना मुलांसाठी गोळ्या बिस्किटे याची नेहमीच सोबत . 
स्वतःच्या गोठ्यातील जनावरांवर आपल्या पोटच्या पोरांसारखे प्रेम करणारा माणूस किती वेगळाच ना ! त्यांच्या आजारपणात राञभर तिथेच बसून त्यांची काळजी घेणार अशा या माणसावर परमेश्वराने खरेच दया दाखवली . त्याची अन त्याच्या बायकोची आम्हाला उठता बसता मरण दे रे भगवंता !!! हि मनापासून दिलेली साद बरे झाले त्याने  ऐकली ....
आणि .... 
म्हातारपणी त्यांच्या रिकाम्या होत जाणाऱ्या मनात  आणखी एक जखम होता होता राहिली ... 

Wednesday, September 21, 2016

आज कुठे हरवला आहेस ?


असेच सुचलेले ....

का ते माहित नाही पण आज अचानक तुझी खूप आठवण आली  ,  माझ्या लग्नानंतर मी तुझ्याशी बोलणार नाही  असे म्हणणारा तू  आज कुठे हरवला आहेस ? 
मित्र मैत्रिणीच्या गोतावळ्यातील आपली निखळ मैत्री , एकमेकांशी न बोलताही मनातले जाणणारे ...... 
तुझी न माझी मैत्री किंबहुना त्या पलीकडचे नाते पण तो धागाही निखळच ... 
लग्न झाले तुझे पण हरवला मित्र माझा 
त्यानंतर कधी तो मला गवसलाच नाही ,
कधी काही लागले , कुणी बोलले तर मी काही न सांगता माझ्या मनातले जाणणारा तू ... पण खरेच कुठे हरवला आहेस तू ?
नेहमी छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्यासोबत वाद घालायला तयार असणार आणि आज बोलावत आहे तरी ........ !!!!
माहित आहे कि तू नाही येणार पण तरीही थोडेसे भातुकलीच्या खेळासारखे भांडण तरी करायचे .... 
घातली असती मी माझ्या मनाची समजूत पण तेवढ्यासाठी तरी यायचे ... 
तुझ्यातला गवसलेला तू मला मिळाला आहे पण परत तू मात्र स्वतः साठीच हरवला आहेस .... 





Wednesday, August 24, 2016

मृगजळ

मुग्धा , मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी मुलगी  कॉलेजमध्ये आहे  . आई एका पतसंस्थेत नोकरी करते ,तिचे बाबा आधी कोणत्यातरी कारखान्यात होते पण त्यांनी अफरातफर केली म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकले आणी तिथेच मुग्धाच्या घराचे स्वास्थ्य हरवले , तिच्या वडिलांना दारू प्यायची सवय लागली  ,रात्री बेरात्री घरी येणे , आईने त्यांना काही बोलले कि तिला मारणे  हे सगळे ती पाहत होती पण काहीच करू शकत नव्हती .
सकाळी जेव्हा तिचे बाबा शुद्धीत यायचे तेव्हा सगळ्याशी अगदी गोड़ बोलायचे पण रात्री मात्र परत तेच !!
या सगळ्यालाच ती खूप वैतागली होती . 
कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण रोज नवीन नवीन ड्रेस घालून यायचे तेव्हा हिला खूप वाईट वाटायचे तिचे आपले ठरलेले तेच चार पाच ड्रेस आलटून पालटून वापरायचे . 
कुणाची बडे पार्टी असली कि ती काही ना काही कारण काढून टाळायची . 
 मनातून तिलाही खूप वाटायचे कि आपणही यांच्यासारखे फिरावे , सिनेमाला जावे , पार्टी कराव्या पण  घरची परिस्थिती अशी होती कि इच्छा असूनही काही करता येत नव्हते . तशी ती खूप समजूतदार पण आपल्या बाबांवर तिचा विशेष राग होता, जे काही होत आहे त्यांच्यामुळेच !!! हे तितकेच सत्य होते एकदा दोनदा  आईला ती बोलली पण त्यावेळी आईनेच  तिला सुनावले ,  " गळ्यात असणाऱ्या चार मण्यांची किंमत बाहेरच्या जगात किती आहे हे तुला तुझे लग्न झाल्याशिवाय नाही कळायचे !!! "
त्याच्यानंतर ती कधी आईला बोललीच नाही ...... 
नुकतेच कॉलेज सुरु झाले होते आज ती नेहमीसारखी तयार होऊन कॉलेजला जायला निघाली , तिथे गेल्यावर कळाले कि आज पहिले लेक्चर नाही आहे  त्यामुळे सगळे कॅन्टीन मध्ये जाऊ लागले तिला जायचे नव्हते पण तिची मैत्रीण सुषमा तिने जवळ जवळ तिला ओढतच नेले . 
कॅन्टीन मध्ये सगळ्यांची गप्पा गोष्टी चालू होत्या पण मुग्धाचे कशातच लक्ष लागत नव्हते , तिच्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली होती.. 
कशाची काय हे कळतच नव्हते . 
बाकीचे गप्पा मारत असताना अचानक तो आला अनिकेत !! तिच्या नकळत तिच्या ओठातून त्याचे नाव आले. 
त्याला बघून तिचा मूड एकदम फ्रेश झाला . यावर्षी तो त्यांच्या कॉलेज मध्ये नवीनच आला होता . आलेल्या दिवसापासून तो तिला बाकीच्या तिच्या मित्रांपेक्षा खूप वेगळा वाटायचा . 
अनिकेत तिथे आल्यावर मुग्धाही लगेच गप्पामध्ये  सामील झाली . 
हळूहळू त्या दोघांची ओळख वाढत होती , कधी नोट्स तर कधी कोणता तरी इव्हेंट ... 
अनिकेत आल्यापासून मुग्धाला एक वेगळाच रंग मिळाल्यासारखा वाटत होता , एकदा सुषमाने तिला विचारलेही पण तिने काहीतरी कारण सांगून टाळले . 
अनिकेतचा स्वभाव अगदीच मोकळा होता , घरची परिस्थिती उत्तम , तो सगळ्यांशीच खूप मिळून राहायचा . 
अनिकेत आणि मुग्धाची खूप छान गट्टी जमली होती , अनिकेतलाही सुषमाकडून मुग्धाच्या घरची परिस्थिती कळाली होती त्यामुळे तो मुग्धाच्या नकळत तिला मदत करायचा 
अर्थात हे मुग्धाला समजत होते पण तीही त्याच्या अज्ञानात सुख मानत होती . 
थोडे दिवसानी अनिकेतची बड्डे  पार्टी  होती त्याने सगळ्यानांच बोलावले होते , यावेळीही मुग्धा काहीतरी कारण काढून नाही म्हणणार म्हणून त्याने तिला आधीच सांगून  ठेवले होते  कि यावेळी कोणतेही नाटक चालणार नाही . 
मुग्धा आली होती पार्टीमध्ये पण  हायक्लास पार्टी बघून ती गोंधळून गेली होती . 
  मजा मस्ती चालूच होती घशाला कोरड पडली म्हणून ती पाणी घेण्यासाठी जात होती , तर तिथंच बाजूला तिला वेगवेगळ्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या दिसल्या आणि अनिकेत अगदी मस्त मजेत ते पित मजा करत होता . 
मुग्धा तिथेच त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती , ज्यागोष्टीपासून ती  दूर राहण्याचा प्रयत्न करत होती  , विसरायचा प्रयत्न करत होती  तेच तिच्या समोर येत होते राहून राहून हाच विचार तिच्या डोक्यात चालू होता . 
इकडे तिच्या खांद्यावर कुणीतरी हात  ठेवल्याचा तिला भास झाला तर तो अनिकेत होता !!!
तिला विचारत होता कुठे आहे लक्ष ? कुठे पाहत आहेस ?
तिला काय बोलावे हेंच समजेना काहीतरी कारण सांगून ती पार्टीतून निघून गेली . 
अनिकेतलाही जाणवले काहीतरी गडबड आहे . 
त्यानंतर मुग्धा कॉलेजला आल्यावरही त्याच्यापासून दूर दूर राहायचा प्रयत्न करत होती अगदी कारणापुरते बोलत होती , अनिकेतला तिचे हे असे वागणे खटकत होते  त्याने बोलायचा प्रयत्न केला पण ती त्याला दाद लागू देत नव्हती . 
दोन दिवस असे होत आहे हे पाहिल्यावर कॉलेज संपल्यावर लगेच ती जाते त्या स्टॉपवर अनिकेत जाऊन थांबला , मुग्धाने ते पाहून न पाहिल्यासारखे केले , पण आज अनिकेतने तिच्याशी बोलायचे ठरवलेच होते . 
तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या जवळ जाऊ लागला तर मुग्धा तिथून चालत जाऊ लागली , अनिकेतने तिला थांबवले  आणि तिच्या मागे लागून जवळच असणाऱ्या एका छोट्या कॅफे मध्ये घेऊन गेला . 
" मुग्धा , माझे काही चुकले आहे का ? त्यादिवशी पार्टीतून निघून गेली अचानक आणि आता परत काही बोलत पण नाही आहे . काय झाले आहे ते तर सांग . काही बोलली नाहीस तर मला कळणार कसे ? " अनिकेत . 
"अनिकेत , नाही रे तुझे नाही , चुकले आहे माझे कदाचित माझ्याच अपेक्षा जास्त होत्या म्हणून.... !" मुग्धा 
" बोल ना मुग्धा का थांबलीस " ...  अनिकेत 
 " नाही नको आणि तसेही तुला काही बोलायचा अधिकार मला नाहीय " ...  मुग्धा  
 " असे का म्हणतेस मुग्धा आपण इतके दिवस झाले ओळखतो एकमेकांना आणि किती चांगले मित्र आहोत आणि तू आज अचानक असे का म्हणत आहेस ? ".... अनिकेत 
 " फक्त चांगले मित्र अनिकेत ? " मुग्धाने असे म्हणत अनिकेतकडे पहिले .... 
" नाही अग म्हणजे मला ... अग तुझ्याइतके चांगले मला कुणीच समजावून घेत नाही , तू खूप जवळची आहे मला आणि आवडते  पण ..   " अनिकेत 
पण काय अनिकेत ? 
 " पण तुझ्या मनात काय आहे हे मला खरेच माहिती नव्हते त्यामुळे मी गप्प होतो आणि म्हणूनच तुला काही सांगितले नाही माझ्या मनातले .... "  मुग्धा आता थोडी शांत झाल्यासारखी दिसत होती 
"  मुग्धा,  प्लिज आता तरी मला सांग ना काय झाले आहे ते ? का तू नाराज आहेस माझ्यावर ? " अनिकेत
" अनिकेत , लहानपणी आई बाबा नोकरी करत होते तेव्हा आम्ही खूप सुखी होतो पण अचानक माझ्या बाबांना खूप पैसे कमवण्याचे वेड काय लागले आणि त्यात त्याच्या मित्राने त्यांना फसवले तेव्हापासून ते दारूच्या नशेत राहू लागले . खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते काही ऐकूनच घेत नाहीत उगीच आईला मारतात . कंटाळा आला आहे मला त्यांच्या या वागण्याचा पण मी काहीच करू शकत नाही . " मुग्धाचे डोळे पाण्याने भरले. 
हलकेच अनिकेत तिच्या हातांना थोपटत होता . 
मुग्धाचे मन बरेच हलके झाले होते खूप दिवसांनी ती आपल्या मनातले कुणाशी तरी बोलत होती . 
अनिकेतने तिला विचारले , हो पण तू माझ्यावर का नाराज आहे ? ते तर सांग !! 
त्यादिवशी तुझ्या घरी आले होते पार्टीसाठी आणि तु ड्रिंक्स घेताना दिसला त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती तुझे हे रूप मला माहितीच नाही , मला त्यावेळी फक्त राहून राहून माझ्या घरातील परिस्थिती आठवत होती .
यावर काय बोलावे हे अनिकेतला समजेना ..
अग मी कधीतरी मजा म्हणून घेतो ड्रिंक्स रोज काही अगदी अट्टल दारुड्यासारखा पित नाही .  
अनिकेत सगळेच पहिला मजा म्हणून घेत असतात त्याची परत चटक लागून आपण आपल्याच आयुष्याला कशी सजा देतो हे स्वतःच्या सुद्धा लक्षात येत नाही ...
असे मुग्धा म्हणाल्यावर अनिकेतला बोलयला काही राहिलेच नव्हते . 
मुग्धा त्याच्या उत्तराची वाट बघत होती.
 ठीक आहे मुग्धा तुला जर आवडत नसेल माझे ड्रिंक्स घेणे तर,  मी नाही घेत पण तू अशी नाराज नको होऊ मी पूर्णपणे प्रयत्न करेन.....
तो हे सगळे इतके मनापासून बोलत आहे हे पाहून मुग्धा खुश झाली तिला कुठेतरी वाटत होते कि हा आपल्यासाठी इतके तरी करेल . 
त्या दिवसापासून अनिकेत खरेच बदलायचा प्रयत्न करत होता ,  मुग्धाला हि खूप समाधान वाटत होते कि आपली निवड चुकणार नाही ..
ज्यावेळी मुग्धा आणि अनिकेत जवळ येत होते तेव्हाच सुषमाने मुग्धाला सावध करायचा प्रयत्न केला होता , मुग्धा , अनिकेत हा खूप मोठ्या कुटुंबातून आलेला आहे , तो आता जरी तुला गोड़ वाटेल असे वागत असला तरी पुढे जाऊन तो  त्याच्या पहिल्या मार्गावर येणार नाही याची काय खात्री आहे ? त्यादिवशी तू पार्टीतून गेल्यावर अनिकेतचे मित्र त्यांची पार्टी हे सगळे मी पहिले आहे ...... सुषमा मुग्धाला समजावयचा खूप प्रयत्न करत होती ...
पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते ..
मुग्धाला आताच अनिकेतचा चांगुलपणा फक्त दिसत होता , अर्थात अनिकेत हा खूप चांगला मुलगा होता फक्त त्याचे काही मित्र आणि त्याची ड्रिंक्स घेण्याची सवय सोडली तर सगळेच आलबेल होते .
जरी अनिकेत आणि मुग्धा हे एकत्र असले तरी अनिकेत अधूनमधून पार्टीला जात असे ,अगदी थोडे थोडे करत त्याचे मित्र त्याला ड्रिंक्स घ्यायला भाग पाडत .
मुग्धा त्याच्यावर नाराज होई परत  तो तिला मनवायचा .....

पण हे सारखे सारखे होऊ लागल्यावर मुग्धाची बुद्धी आणि मन यात अंतर तयार झाले , तिची बुद्धी तिच्या मनाला साथ देईना ... कारण तिच्या बुद्धीला हे पटत होते कि हे चुकीचे आहे , अनिकेतच्या प्रेमात आपण वाहवत जात आहोत कि तो फसवत आहे कि नाही याचा सुद्धा तिला निर्णय घेता येईना ...
त्याच्यामुळे बदलेली तिची लाईफस्टाईल , महागड्या गिफ्ट्स याने मन सुखावत होते , पण बुद्धी मात्र तिला वेगळाच विचार करायला भाग पाडे ,पण प्रत्येक वेळी तिच्या मनाचे पारडे जड  होई आणि बुद्धी कमकुवत पडे ...
 शिक्षण पूर्ण झाल्यावर मुग्धाच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली , त्यावेळी मुग्धाने तिच्या आईला अनिकेत बद्दल सांगितले तिच्या आईला तशी काहीच अडचण नव्हती मुलीला इतके सुंदर सासर मिळणार आहे हे पाहून ...
प्रश्न होता तो अनिकेतच्या आई वडिलांचा , अनिकेतची आई खूप साधी फक्त वडील  कडक होते पण ते आपल्या मुलासाठी तयार झाले ...
अनिकेतच्या घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न थाटामाटात झाले , मुग्धाकडची मंडळी तर  पाहत होती  सगळा झगमगाट .... आईला वाटले आपल्या पोरीने तरी  नशीब काढले ...
मुग्धा आणि अनिकेत हनिमूनसाठी जाऊन आले , अनिकेतच्या बाबांच्या इच्छेनुसार त्याने त्यांची छोटी फर्म जॉईन केली .
दोघांचा सुखी संसार चालू होता , अनिकेतचे मित्र आणि त्याच्या पार्टी चालूच होत्या , कधी कधी मुग्धा त्यावरून त्याला बोले पण तो तिची  तेवढ्यापुरती समजूत घालत असे , आणि परत त्याचे चालूच ...
मुग्धा आता त्याच्या या गोड गोड बोलण्याला कंटाळली होती ....
एक दिवस असाच अनिकेत खूप उशिरा घरी आला मुग्धा त्याची वाट पाहत बसली होती दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता म्हणून ती खुशीत होती ....
दारावरची बेल वाजली , तिने दार उघडले तर अनिकेत तोल जाऊन तिच्या अंगावर कोसळला ..
तो इतका पिऊन आला होता कि त्याला कशाचीच शुद्ध नव्हती ..
मुग्धाने कसेबसे त्याला सावरत बेडरूममध्ये  झोपवले ..
ती रात्र तिने तशीच जागून काढली रडून रडून तिचे डोळे सुजले होते . अनिकेत दुसऱ्या दिवशी डोके धरूनच उठला , तिने त्याला लिंबूपाणी आणून दिले  आणि तिथून निघून गेली .
अनिकेतला रात्री काय झाले त्यातले काही आठवत नव्हते , मुग्धाशी बोलायला गेल्यावर ती त्याच्या एकदम  ओरडत अंगावरच आली ,...
अनिकेत का विश्वास ठेवला मी तुझ्यावर ? त्यावेळीच जर स्वतःला सावरले असते तर आज हि वेळ आली नसती मझ्यावर का असा वागत आहेस ? तुझी माफी ,मनवणे हे सगळे खोटे का ? काही अर्थ आहे का तुझ्या वागण्याला मुग्धा बडबडतच होती ...
अनिकेतचे डोके आधीच दुखत होते तिच्या या बोलण्याने तो जास्तच चिडला  तिला ओरडू लागला , तुला माझ्याशी लग्न करायची घाई झालेली , पैसा पाहून तू प्रेम केलेस माझ्यावर !! मी हा आधीपासूनच असा आहे....  माहिती होते ना मग ? तरीही केलेस लग्न मग आता हि खोटी नाटके कशाला ??  अनिकेतचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता ...
हो त्यावेळी केला मूर्खपणा , पण आता करेन त्याची भरपाई मला नाही राहायचे तुझ्यासोबत , आणि तू म्हणतो आहेस ना या पैशासाठी लग्न केले त्यातले एक पैसाही नको मला ... मुग्धाही काही वाटेल ते बोलत होती ...
अनिकेतकडे पैसा आहे हे कारण होतेच पण   मुग्धाचे त्याच्यावर खूप प्रेम होते म्हणूनच ती त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होती , मुग्धाला वाटले होते आपण अनिकेतला बदलू शकू पण ते आता शक्यच दिसत नव्हते .
मुग्धाचा वाढदिवस अनिकेत पूर्णपणे विसरला होता पण तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्यासाठी एक पार्टी ठेवली होती .
संध्याकाळी घरी पार्टी पाहून त्याला आठवले कि आज मुग्धाचा वाढदिवस आणि आपण तिला काही बाही बोलून गेलो , अनिकेत तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ येत होता .....
सगळयांच्या गराड्यामध्ये मुग्धा बाहुलीसारखी खोटे खोटे हसत होती , सोन्याच्या पिंजऱ्यातल्या  पोपटासारखी  तिची अवस्था झाली होती , आजूबाजूच्या लोकांच्या गराड्यात तिचा जीव घुसमटत होता ...
आणि तिला तिच्या आईचे शब्द आठवत होते ..."  या चार काळ्या मण्यांची किंमत  ....... ..."




  


Monday, August 22, 2016

स्वातंत्र्य दिन

शाळेत होते त्यावेळी भूगोलमध्ये नेहमी एक प्रश्न विचारला जायचा कि , " भारतात विविधतेत एकता आहे " याची कारणे द्या . त्याचे उत्तर नेहमीच ज्यावेळी मी भारतामध्ये होते त्यावेळी मिळाले आहेच पण आज इथे न्यू यॉर्क मध्ये   भारताचा  स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तेव्हा त्याची जास्त जाणीव झाली कि खरेच भारतात खूप एकता  आहे कितीही वेगळे असलो , आपल्या मायभूमीपासून , जन्मभूमीपासून दूर असलो तरी आम्ही भारतीय आहोत . 
             आज इथे परेडसाठी   मराठी, बंगाली , गुजराथी  , तेलगू तामिळ सगळेच लोक होते  आपापल्या प्रांताची वेशभूषा करून त्या सगळ्यात एक आपलेपणा होता  . खासकरून आपला नाशिक ढोल . लेझीम आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष एक वेगळीच ऊर्जा देत होता . 
भारत माता कि जय , वंदे मातरम यांच्या आरोळ्यांनी तर क्षणभर विसरायला होत होते कि आपण भारतात आहोत कि परदेशात !!!!! 
वेग वेगळ्या प्रांताचे डान्स आणि त्यांना प्रोत्सहान देण्यासाठी जमलेले हजारो भारतीय हा एक नजारा वेगळाच होता , पण आज खरेच खूप भारी वाटतंय नेमके काही ते माहिती नाही पण खूप आनंद आहे , एका फिरंगी जमिनीवर राष्ट्रगीत म्हणताना ...... 
आज योगगुरू बाबा रामदेव आणि अभिषेक बच्चन आले होते , रामदेव बाबांनी शुद्ध हिंदीत छोटेसे खूप छान भाषण केले ,  बिचारा अभिषेक बोलायला सुरुवात इंग्लिश मध्ये केली पण आपण भारतीय ना तिथे सुद्धा त्याला अरे हिंदी हिंदी हिंदी  ओरडून हिंदीत बोलायला  भाग पाडले . 
 काहीही म्हणा आपण जिथे जातो तिथे आपला ठसा उमटवतो याचे आज झकास दर्शन झाले 
शेवटी 
 हम लोगोंको समज सको तो 
समझो दिलबर जानी 
जितना भी तुम समझोगे 
उतनी होगी हैराणी 
अपनी छत्री तुमको देदे 
कभी जो बरसे पाणी 
कभी नये पॅकेट में बेचे 
तुमको चीझ पुराणी 
फिर भी दिल है हिंदुस्तानी ..... 

Thursday, August 18, 2016

रक्षाबंधन

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट हि , म्हणजे साधारणपणे नव्वदच्या दशकातली  एका  राज्यात दोन बहिणी आणि एक भाऊ राहत असे , त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम .... मोठी बहीण थोडी हट्टी , तर मधली बहीण तशी थोडी हट्टी आणि  समजूतदारपण, लहान भाऊ थोडा आगाऊ , मस्तीखोर , कधी कधी शहाण्यासारखा वागणारा  ... तर असे बहीण भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असत . 
त्यांचे प्रेम म्हणजे तर काय विचारू नका इतके कि एकमेकांच्या झिंज्या धरणे , लाथा मारणे , wwf खेळणे ,  कधी चुकून लहर आली तर रिमोट , बॅट , यांचा खुळखुळा करणे  अशा एक ना अनेक बऱ्याच गोष्टीतुन  दिसून  येत असे (अजूनही दिसते ) .  पण शेजारीपाजारी , पाहुण्याच्या घरात ते हे असे प्रेम कधीच दाखवत  नसत , अजूनही त्यांचे शेजारीपाजारी त्यांना नावजतात , हे फक्त केवळ शक्य होते ते त्यांच्या आईच्या डोळयांच्या धाकामुळे .... 
तिघे बहीण भाऊ मोठे होत होते तसेच त्यांचे प्रेमही वाढत होते , वाढत्या वयानुसार लहान भाऊ खूपच समजूतदार होत चालला होता पण  मस्तीखोर आणि अकडूपणा तसाच ठेवत , शाळा चालू होत्या तोवर सगळे एकाच राज्यात राहत होते आपल्या माता पित्याच्या छायेत . पुढील शिक्षण घेण्यासाठी एकेक करून त्यांना राज्य सोडावे लागले आणि दुसऱ्या राज्यात काही काळाकरिता वास्तव्य करावे लागले पण सुट्टी , सणवार , अशा दिवशी एकत्र येऊन ते त्यांचे खरे प्रेम आणि बरेच काही सांगणारे प्रेम एकमेकांवर दाखवत असत ... 
   एकेदिवशी त्यांच्या मोठ्या ताईचा विवाह होणार असल्याची वार्ता त्या बंधू आणि भगिनींच्या कानावर पडली, तर सगळे तसे खुश झाले पण मोठी ताई आपल्यापासून दुरावणार हे ऐकून त्या दोघाना खूप वाईट वाटले , पण लहान भाऊ वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता .  
पुढे दोन वर्षांनी त्याच्या दुसऱ्या ताईचा विवाह संपन्न झाला , मी तुमच्या लग्नात तुम्हाला हसत हसत जा म्हणेन , मी काही रडणार नाही उलट तुम्ही घरी नसेल तर मला बरेच आहे असे म्हणणारा हा छोटा भाऊ दोन्ही बहिणींच्या लग्नात ढसाढसा रडला ... हे तो अजूनही मान्य करत नाहीय ... 
पण मजेशीर गोष्ट अशी झाली कि या दोन बहिणी लग्न होऊन पुणे या राज्यात रहावयाला  आल्या तर त्यांचा भाऊ उद्योगधंद्याच्या निम्मिताने तिथेच आला . 
खरेतर आता या दोन बहिणी थोड्या दिवसासाठी परदेशी निवासी आहेत , पण तरीही त्यांचे अधूनमधून  भ्रमणध्वनीवरून बोलणे होत असते तिथेही हे त्यांचे बरेच काही सांगणारे प्रेम ते दाखवत असतात . 
लहानपणी हा भाऊ रक्षाबंधनादिवशी त्यांच्या पिताश्रीकडून ओवाळणी म्हणून दोन बहिणींसाठी प्रत्येकी शंभर मुद्रा घेत असे पण प्रत्यक्षात तो त्या बहिणींना फक्त प्रत्येकी ५० मुद्रा देत असे तोच भाऊराया आज यावेळी त्याच्या बहिणींना त्याच्या स्वकमाईतून पहिली ओवाळणी यावर्षी देणार आहे . त्याला व त्याच्या दोन बहिणींना जसे सर्वांचे आशीर्वाद मिळाले आहेत तसेच तुम्हा आम्हा मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना तर अशी हि रक्षाबंधन निम्मित साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी चालू आहे आणि चालूच राहणार .... 
 

Friday, August 12, 2016

एक गंध....

एक गंध पहाटे पडलेल्या दवबिंदूच्या गारव्याचा ...
एक गंध लाल केसरी गोळ्यासमवेत उमलणाऱ्या फुलांचा ....
एक गंध देवघरातून मंद सुवास येणाऱ्या धुपाचा ....
एक गंध रटरटणाऱ्या  सकाळच्या पहिल्या चहाचा ....
एक गंध बाळाच्या दुधासोबत त्याच्या मखमली स्पर्शाचा ....
एक गंध आईच्या कुशीतील मायेचा ....
एक गंध  तव्यावरच्या गरम पोळीचा ....
एक गंध दुपारच्या झोपेचा ....
एक गंध दुपारी रंगलेल्या भातुकलीचा ...
एक गंध पहिल्या पावसाचा .....
एक गंध सायंकाळच्या किलीबिलाटाचा ...
एक गंध थकलेल्या बाबांच्या घामाचा ...
एक गंध आगळ्या वेगळ्या  तिन्हीसांजेचा ...
एक गंध पतिपत्नीच्या प्रेमाचा ...
एक गंध आपलेपणासोबत प्रेमाचा ...

Wednesday, August 10, 2016

थोडेसे मनातले

प्रथम पाहिले तुला अन मनात कुठेतरी नाजुकशी कळ उमटली ...
तेव्हाच खात्री पटली ईश्वराने तुज माझ्यासाठीच घडवली ...
तुझं न माझं प्रेम  कधी कधी   हव्याहव्याशा रिमझिम सरींसारखे तर
कधी  धो धो पावसात येणाऱ्या टपोऱ्या अळवावरच्या मोत्यासारखे ...
या चंचल फुलपाखराला सोबत घेऊन डुलणाऱ्या रंगबेरंगी फुलासारखी तू ..
सागरच्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट अन मला किनारा देणारी तू

Saturday, August 6, 2016

श्रावणसरी

रिमझिम सरीत श्रावणाची सुरुवात झाली , 
दिव्याच्या अवसमुळे तेजोमय प्रकाशात एक प्रसन्नतेची हलकीशी लकेर उमटून गेली.....
श्रावणातल्या कालच्या पहिल्या शुक्रवारी गौराई येऊन बसली... जिवतीच्या गोष्टीसंगे मुलाबाळांना उदंड आयुष्य देऊ केली  ....

  आज भावाचा उपवास  भाजणीचे थालीपीठ त्यासोबत वाटलेल्या डाळीची उसळ ,  नागोबाची पूजा दूध ,लाह्या आमच्या आईसाहेब अगदी यथासांग पूजा करून घेत आम्हा दोघी बहिणींकडुन , म्हणजे कोणतीही पूजा असो किंवा आणि काही प्रत्येक गोष्टीत perfection हवेच त्याचा आता खूप उपयोग होतोय म्हणा कुठे अडत नाहीय ,, पण खरेच हे करताना  खूप मज्जा असायची आणि यायची पण ,
   दुपारच्या वेळेला कुणी झोपाळा बांधला का हे बघायला जायचे ,हा माझा सगळ्यात आवडीचा छंद तासनतास झोपाळ्यावर डुलत तर कधी एखादे पुस्तक घेऊन  बसायचे ,  एका मोठ्या झाडाला बांधलेला झोपाळा , खूप मोठी जाड रस्सी त्याला खाली लाकडाची फळी लावून तयार केला असायचा ( त्याला काहीतरी नाव आहे मला आता नाही आठवत )  पण तो इतका उंच जायचा ना खुप भारी वाटायचे तेव्हा , आमच्या पेक्षा मोठ्या ताया ,काकू तर दोघी दोघी उभा राहून मोठे झोके घ्यायच्या , आम्ही आपले खाली उभे कधी आमचा नंबर येतो हे बघत  ...

             संध्याकाळी अंबाबाईच्या मंदिरात सगळेजण जमायचे फुगड्या ,झिम्मा यांच्या गर्दीत मंदिराचा आवार गजबजून जायचा ,  माहेरी आलेल्या ताया दीदीच्या  भेटीही मंदिरातच रंगायच्या , एखादी पावसाची सर यायची पण त्यातहि सगळे खेळातच गुंग असायचे पाऊसही अगदी हलकेच यायचा सोबत करायला , कदाचित सासुरवाशिणीचे अश्रू पुसायला ,,
     पण सगळ्यालाच एक वेगळा रंग होता कदचित तोच या श्रावणाचा संग असावा

Tuesday, August 2, 2016

ओळख

आमच्या घराशेजारी एक काका राहायला होते , स्वभावाने खूप छान आणि मनमोकळे काकूही तशाच अगदी ... त्यांना दोन मुले जवळपास दोन अडीच वर्षाचा फरक असेल दोघांच्यात दोघेही खूप हुशार . दोन्ही मुले शिकायला परदेशात एकूणच काय सगळे उत्तम चालू होते . 
नुकतेच काका त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले होते , त्यामुळे घरी बसून गाणी ऐकणे , फिरणे , मित्र यात त्यांचा खुपसा वेळ जात असे , आणि घरी काकूंना मदत करत  त्यामुळे काकूही  खुश . काकांचा मित्रपरिवार खूप मोठा त्यामुळे नाटक , कुठेतरी छोटीशी ट्रिप हे सारखे काही न काही चालूच असे . 
नोकरीच्या काळात फिरायला  वेळ मिळत नसे आणि आता पैसाही आहे आणि तब्येतपण साथ देत आहे तोवर फिरून घ्यायचे हा एकच बाणा काकांनी रिटायरमेंट नंतर अवलंबला होता . 
काकांची कंपनी मिळणे म्हणजे त्यांच्या मित्रांना मेजवानीच काकांकडे त्यांच्या नोकरीतले किस्से , बाकी बारीकसारीक अनुभव यांचा खजिनाच होता ,कधी कधी हे सगळे आपल्या बायकांना सोबत घेऊन जात तेव्हा काकूही जात असत . 
यावेळी काकांनी पावसाळी ट्रिप काढायची असे ठरवले पण फक्त मित्र मित्र त्यामुळे काकू घरीच , तसाही काकूंना त्यांच्या व्यापातून दिवस कमीच पडत असे .  
यावेळी त्यांच्या ग्रुपने गड  किल्ले असा कार्यक्रम आखला होता . सगळी तयारी झाल्यावर एक दिवशी भल्यापहाटे सगळी मित्रमंडळी किल्लेचढाई साठी रवाना झाली . एकेक किल्ले पाहून त्यांची माहिती घेऊन तिथल्या शौर्यगाथा मनात साठवत त्यांची मोहीम चालू होती . 
आज शेवटचा दिवस रात्री घरासाठी प्रयाण.... 
जेवण झाल्यावर परतीची तयारी चालू केली , सगळ्यांचे सामान गाडीत स्थिरावल्यावर मोठ्याने हर हर  महादेवचा जयघोष करत गाडी चालू झाली , पावसाळ्याचे दिवस होते तसाही ड्राईव्हर  गाडी हळू हळू चालवत होता , घाटात गाडी आली तशी ड्राईव्हरने   गाडीचा वेग आणखी कमी केला , सगळेच थकल्यामुळे झोपेत होते , हळू हळू गाडी पुढे जात होती , अचानक एका वळणावर पुढून एक ट्रक जोरात आला ड्राइव्हरने गाडी सांभाळायचा प्रयत्न करत होता अचानक गाडीचा वेग वाढलेला पाहून सगळेच जागे झाले ,काही कळण्याआधीच गाडी एका मोठ्या दगडावर जाऊन आदळली . कुणाला काहीच कळत नव्हते कुणी माझा पाय तर कुणी हात , गुढगा म्हणत कह्णत होते ,पण काकाचा तर काहीच आवाज नाही डोक्याला मार  लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते . 
मागून येणाऱ्या गाड्यानी हे पाहून पोलिसांना फोन केला आणि सगळ्यांना घेऊन जवळच्याच हॉस्पिटल मध्ये गेले , ड्राइव्हरच्या हुशारीमुळे जीव जाताजाता वाचला होता जर का  गाडी दरीत कोसळली असती तर ??? 
पण नशीबवान सगळेच होते . 
फक्त काकांच्या डोक्याला जोरात मार  लागला होता बाकीचे  हातपाय फ्रॅक्चरवर निभावले होते . 
पण काका अजूनही शुद्धीत आले नव्हते , काकूही तिथे येऊन पोहचल्या  काकांची अवस्था पाहून त्याही कोसळणारच होत्या पण काकांना आधार देण्यासाठी आता फक्त त्याच तर तिथे होत्या . 
चोवीस तासानंतर काका शुद्धीवर आले , तेव्हा काकू त्यांच्या समोरच होत्या , काकूंनी डॉक्टरांना बोलावले काकांना चेक करून , डॉक्टर त्यांना काही प्रश्न विचारू लागले पण काकांना त्यांचे नावही आठवेना  आणि काकूही ..... 
आता काकू फक्त पाहत होत्या त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता . 
तसे काकांना लागलेला मार पाहून डॉक्टरांनी हि शक्यता वर्तवली होतीच पण त्यावेळी ती फक्त शक्यता होती आणि  आता ती वास्तविकता होती . 
त्यांच्या मुलांना बोलावून घेतले , काकांच्या ऑपरेशनसाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हलवण्यात आले , तसेही ऑपरेशन रीस्कीचं होते कारण यात काका कोमात जाण्याचीही शक्यता होती . 
काकूंना तर वेड लागायचे बाकी होते . सगळे देव पाण्यात आले होते . 
मुलांनाही आईला आधार द्यावा कि स्वतःला सांभाळावे समजत नव्हते 
 काकांचे ऑपरेशन झाले , त्यांच्या शुद्धीत येण्याची सगळेजण वाट पाहू लागले , काका शुद्धीत आले आणि त्यांनी काकूंचे नाव घेतले तेव्हा काकूंना झालेला आंनद अवर्णनीयच होता तो तर त्यांच्या डोळ्यात देखील दिसू लागला . पण  खूप थोडा वेळ टिकला . 
काकांना परत आठवेना आपण कोण , आपली मुले ? सगळे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर !!!!!
थोडे दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली राहून , काका घरी आले पण त्या घराची ओळख त्यांना पटेना ... पण त्या तिथे त्यांना एक वेगळीच आंतरिक ओढ नक्कीच जाणवत होती ... 
शेवटी काका काकूंनी काडी काडी गोळा करून आपले ते घरटे बनवले होते , त्याची ओळख थोड्यावेळासाठी हरवली असेल पण काकांना त्याचे विस्मरण नक्कीच होणार नव्हते . 
कधी कधी त्यांच्याकडून काकूंना त्यांच्या नावाने हाक येई त्यावेळी त्यांच्या आशा खूप पल्लवीत होत पण खूप थोड्यावेळासाठी .... 
काकाचे हे विस्मरण काकूंच्या खूप जिव्हारी लागले होते पण काकांसाठी त्या स्वतःला सावरत होत्या , पण त्याही खूप खचून गेल्या होत्या . 
काकांचे मित्र घरी येत पण त्यांच्या डोळ्यातील अनोखळी पण पाहून गलबलून येत असे त्यांना .
थोडावेळ जरी स्वतःची ओळख नाही पटली , छोट्या छोट्या गोष्टी नाही आठवल्या तर किती अस्वस्थ व्हायला होते .... 
काकांची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिड चिड होऊ लागली ,  सगळ्याच्या डोळ्यात त्यांना फक्त सहानभूती दिसत होती आणि त्याचा त्यांना त्रास होत होता , काकूही त्यांना समजावून थकल्या पण एकतर आजारपण आणि हट्टी स्वभाव त्यामुळे यात काहीच फरक पडत नव्हता , त्यांच्या अशा वागण्यामुळे काकू खूपच खचत गेल्या . 
काकांना आधार देता देता स्वतःचा आधार हरवत होता हेच त्यांना नाही कळाले  काकांना सोडून गेल्या त्या कायमच्याच ....... 
यानंतर काकांनी आपल्या घराला ओळखले पण आता त्या घराला मात्र काकांची ओळख पटत नव्हती.....