Wednesday, December 21, 2016

झोप

झोप हा  माझ्या अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे , त्यातली त्यात जर ती दुपारची झोप असेल तर मग काय विचारूच नका इतकी प्रिय ...
आमच्या आईच्या भाषेत आम्ही तीन माकडे (  त्यांचे वंशज ना म्हणून म्हणत असेल !!) म्हणजे मी आणि माझे बहीण भाऊ कुंभकर्ण आहोत , हत्ती जरी आमच्या अंगावरून गेला तरी आम्ही ढिम्म हलणार नाही..  सकाळी नऊ वाजले तरी आमचा सुर्य अजून उगवायचाच असतो .. 
आमची परीक्षा असली कि आमच्या आईची सत्वपरीक्षा असणार !! ... यात आमचे बाबा मात्र झोपु दे ग अजून थोडवेळ या कॅटेगरीतील !
त्यामुळे आईचा आणखी जरा तिळपापड व्हायचा !! आणि  त्यांच्या या नेहमीच्या गोड  संवादात आमची अजून एक डुलकी काढून व्हायची... 
दुपारचे रामायण तर वेगळेच असायचे म्हणजे कसे ना दुपारची वामकुक्षी किती वेळ अर्धा तिथे पाऊण तास असावी  , यालाच काय ते मॉड भाषेत पॉवर नॅप म्हणतात !!! पण आम्ही एकदा वामकुक्षी चालू केली कि आमची कुशी कमीत कमी २-३ तास त्या जागेवरून हालत नाही ...
आता हि इतकी प्रिय गोष्ट मी कॉलेजला आले तरी माझ्या जवळ अगदी माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी राहिली ,इतकी कि माझी मैत्रीण मला कॉलेजला जाताना सोडून जाईल पण हि माझी सखी माझे जेवण झाले कि पुढच्या लेक्चरला माझ्या सोबतच .. तरी बरे पुढचे तीन मागचे दोन बेंच सोडून मी मधल्या बाकड्यावर आपली गादी टाकणार ,, एकदा दोनदा सापडता सापडत वाचलीय !!!! नाहीतर निद्रादेवीचा कोपच झाला असता !!
पण कुठेही गाडीतून किंवा बसमधून प्रवास करताना मात्र मी बाहेरच्या निसर्गाला भरभरून दाद देत असते , त्यावेळी हि माझी सखी मला बिलकुल त्रास द्यायला येत नाही .
एक वेळ रात्रीची झोप मोड झाली तरी चालेल पण दुपारची अहं !!!
आता माझ्या झोपेला नजर लावायला माझ्या आईनंतर आहे तो म्हणजे नवरा ,, याचे आणि माझ्या सोन्यासारख्या सखीचे काय वाकडे आहे तेच समजत नाही !! दुपारची तर नाहीच पण रात्रीचीही झोप इवलीशी पुरते त्याला ?? कधीही झोपला तरी सकाळी सातला आहेच उठलेला कि त्याच्या आधी मला माहिती नाही बा कारण त्यावेळी आपली मध्यान्ह कम पहाट असते ...
सकाळी उठला कि मुद्दाम काहीतरी किचन मध्ये जाऊन आवाज करायचे आणि माझी झोप मोड करायची यातून कुठला असुरी आंनद मिळवतो ते तो असुरच जाणे !!
आता थंडीत तर बाहेर बर्फ पाऊस आणि   आवडती लहानपणीची शॉल गुंडाळून मस्त झोपलेले असताना मुद्दाम ऑफिस मधून फोन करून विचारायचे ,, " काय ग , काय करत आहेस ? "
पहिले पहिले  मीही अगदी सोज्वळपणे सांगायचे कि झोपले आहे रे !! आणि आता म्हणते  बसलीय विमाने मोजत !!! तिकडून छद्मी हसत फोन ठेवला जातो कारण त्यांचे काम फत्ते झालेले असते !!!
अशी हि दुपारच्या झोपेबाबत असलेली अरसिक माणसे !!
दुपारची झोप झाली कि गरम गरम वाफाळता चहा आणि काहीतरी गरमगरम खायला म्हणजे स्वर्गसुखच .. पण इथेही आमच्या मातोश्रीना असे वाटते कि नुसते खायचे प्यायचे आणि झोपायचे... खायला तर भस्म्याच झालेला असतो नुसते बकासुर आहात तिघे !!!
आता खरे सांगायचे तर आमच्या तिघांनाही हा प्रश्न पडलेला असतो कि आम्ही नेमके वंशज कुणाचे  कुलकर्ण्याचे कि कुंभकर्णाचे कि बकासुराचे ???
पण आई म्हणत आहे ना मग असेलच काहीतरी !!!
आज सकाळीच आमच्या नवरोबांसोबत थोडेसे हलके फुलकेसे संभाषण काम सं "वाद " झाला , सगळेच कसे तुमच्या घरचे दुपारचे पण झोपतात असे काही बाही  ......... आणि ऑफिसला जाता जाता मला प्रेमळ  शब्दात सांगून गेले कि आज दुपारी अजिबात झोपायचे नाही !!!
मग काय माझ्यातील एक वळवळणारा किडा जागृत झाला मग मीही काहीही संवाद न करता दिवसभर  मस्त ताणून दिली !!!
संध्याकाळी अहोनी बेल वाजवल्यावरच झोपेत दार उघडले !!
ते पाहून आमचे लंबोदर मला म्हणाले कि ," सकाळी जरा ऑफिसच्या कामाचे टेन्शन होते ,, आणि तुला तर माहिती आहेच कि ग आता मला किती लोड होता !!! त्यामुळे सकाळी जरा थोडे जास्तच बोललो नाहीतर तसा काही माझा उद्देश नाहीच किंबहुना कधीच नसतो फक्त ते जरा वोर्कलोड मुळे .....
आता यात पण माझी आई म्हणते कि अति तेथे माती आणि जर गोडी गुलाबीने होत असेल तर जास्त ताणू नये आणि मलाही पटले कि हे सगळे तो मनापासून बोलत आहे मग काय दिले सोडून !!!
अहा असे तसे नाही हं ... गरमगरम चहा आणि आता काहीतरी चमचमीत खायला द्यायच्या बोलीवरच ..... !!!


Thursday, December 15, 2016

वाड्यातील जत्रा

आज ना एक आगळ्या वेगळ्या गावाबद्दल सांगणार आहे , आमचे मूळगाव कवठे महांकाळ पासून अगदी जवळ फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरच आमचे हे गाव  " आगळगाव " . इथे एक खूप जुने शंकराचे म्हणजे आगळेश्वराचे मंदिर आहे त्यावरून हे नाव पडले असे म्हणतात , हा इतकाच याचा इतिहास मला माहिती आहे.

आमचा मोठा वाडा आहे इथे , लहान असताना आम्हा बच्चेकंपनीला या वाड्याचे आणि आमच्या मळ्याचे खूप आकर्षण .. अजूनही आहे !!! वाड्यात रमायला , मळ्यात हिंडायला फिरायला आंब्याच्या झाडाखाली बसून पत्ते खेळायला ,, पारावर भातुकलीचा डाव .....  सगळे डोळ्यासमोर आले फक्त गाव म्हणले  !!!!!
   आणि आज याची आठवण आली म्हणजे  खास कारण असे कि  आमच्या गावची जत्रा .... यात्रा !!
मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला असते , दोन दिवस यल्लमा देवीची यात्रा ....
 यात्रा म्हणले कि सगळे एकत्र येतात सख्खे  चुलत असे मिळून आम्ही घरचे ५० -७५ जण असतो कोणताही कार्यक्रम असू दे  , आणि हा आमचा वाडा सगळ्याना संभाळून घेत असतो !!!
लग्न झाल्यावर गावाकडे जायला जमलेच नाही  ,, पण यात्रा आली कि जाम आठवण येते ,, लहानपणी केलेल्या धमाल मस्तीची ...
लहानपणी गावी जात असताना  आगळगाव फाटा आला कि आम्ही गाडीतच दंगा करायचो "आगळ वेगळ गाव आले"  आणि असे म्हणतच आमची गाडी वाड्यापर्यंत पोहचायची  ..  सगळ्यांच्या दंग्याने त्या वाड्यालाही जाग  यायची ,, माजघरातील ती चूल त्यात झालेला धूर , आणि आमच्या आई , काकूंचे त्यामुळे पाण्याने भरलेले डोळे !!!  आम्ही आत गेलो कि काय असते रे तुमचे माजघरात जा सोप्यात खेळा इति आमची आजी ,,
पहिले पहिले  माजघर , सोपा हे शब्द ऐकून इतकी मजा वाटायची पण परत त्याची सवय झाली,, आता आम्हीपण वाड्यात गेलो हे  असेच म्हणतो !!
पहिल्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक आणि तोही चुलीवर सगळ्या वाड्यात त्या पुरणावरणाचा वास दरवळत असे ,, पण मला खरी मजा यायची ती भल्या मोठ्या पातेल्यातील बटाटे पोहे खायला ,, काय तो वास त्याचा आहा !!! सगळे त्यादिवशी वेगळ्या चवीचे लागायचे , पोट भरत होते पण मन नाही ...
आमच्या वाडयापासून ३० -३५ पावले चालत गेले कि आमची जत्रा भरलेलीच ,, सुरुवात ती चिरमुरे , शेव , भजीच्या स्टॉलने !! जरा पुढे गेले कि मग चालू झाले फुगे , गाड्या , दुर्बीण , बांगड्या , गळ्यातली, कानातली .... आणि खूप काही !!! इतक्या जवळ असल्यामुळे आम्ही दर अर्ध्या तासाने बघून यायचो काय बदल झाला आहे का ?? .. आणि किती ते भांडण नाही पैसे कमी करण्यासाठी !!!
मला लहानपानपासून वेड आहे ते फुग्याचे , त्यात  भरलेली रेती आणि तो वाजवायचा जोरात  किती भारी वाटते ना !! आम्ही सगळे मिळून किती फुगे आणायचो याला काही मापच नाही फुटला फुगा कि आण !! दोन दिवस हेच फक्त ...
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळ्याच्या आंघोळी आवराव्या लागत कारण पालखी येणार असायची घरी ,, पालखीची मानाची काही घरे असतात त्या घरात पालखी त्या क्रमाने जात असते , आमच्या वाड्यात ती दुसऱ्या कि तिसऱ्या नंबरला येते ..
कुणीतरी वाडयाच्या दारातच उभे असणार लांबून पालखीचा आवाज म्हणजे वाजत गाजत येते पालखी .. आवाज आला कि सगळे सोप्यात येऊन उभे ,, पालखी ठेवली कि तिथे ओटी , पूजा , नमस्कार सगळे होते ..
जे पालखी घेऊन आलेले असतात ते देवीची गाणी म्हणतात जोगती असतात ते नाच करतात   थोडावेळ कार्यक्रम असतो शेवटी आरती होते आणि पालखी जाते ... मग तिथून आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी देवळात जातो ,, त्याच्या समोरच ओढा आहे त्यात पाय धुवून मगच पुढे मंदिरात , खूप जुने मंदिर आहे जास्तीत जास्त एकावेळी आत ४-५ लोक थांबू शकतात ,, आणि आत जाण्यासाठी तर वाकूनच जावे लागते इतके छोटे दार आहे , खूप मस्त आहे परिसर तो !! एकदम शांत पण यात्रेवेळी गडबड गोंधळ असतोच ...
तसे इथे  पाळणे ते असतात पण जास्त मोठे नाही छोटे छोटे , आमचा मोर्चा देवळातूनच स्टॉल कडे जातो ..
दिवसभर काही ना काही चालूच असते !! यात्रा जवळ असलेला फायदा हा !!
अरे हो तमाशा देखील असतो !! पण तो आमचा प्रांत नाही !!
संध्याकाळी पालखी किचात जाते त्यावेळी यात्रा संपते ,, किचात म्हणजे  निखारा असतो  ,, जे लोक पालखी घेऊन फिरत असतात ते आणि देवळातील पुजारी त्यावरून पालखी घेऊन चालतात तेव्हा यात्रा संपली असे म्हणतात ... आमच्यकडे शक्यतो पालखी किचात गेल्याशिवाय कुणी गावाबाहेर जात नाही !!
मजा असते यात्रा म्हणजे , मुळात आमचे सगळे घर एकत्र आलेले असते तो आनंद वेगळाच !!!
वाडा असो कि पूर्वीच्या काही रिती ,परंपरा यांच्या आठवणीनेही एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते नाही का !!!











Wednesday, December 14, 2016

प्रारब्ध

अंकिताचे लग्न होऊन ती सासरी आली ,, सासर आणि माहेर तसे काही जास्त दूर नाही काही तासाच्या अंतरावरच .. तिच्या माहेरी सगळे शिकलेले थोडयाशा नवीन विचारसरणीचे पण रिती परंपरा धरून असणारे .. सासरी एक नणंद , दीर , सासू  सासरे ... नणंदेचे लग्न झाले होते पण ती जवळच राहत होती त्यामुळे माहेरीच जास्त ...  सासरे घरीच आणि दीर काहीतरी कामे करत असायचा .. तिचा नवरा अजय हाच काय तो घरातील एकमेव कमावता ....
अंकितासाठी  अजयचे नाव तिच्या बाबांच्या मित्रांपैकी कुणीतरी सुचवले होते .  तिच्या बाबांनी सगळी माहिती घेतली त्यावेळी तरी त्यांना त्यात वावगे असे काहीच दिसले नाही .. एकत्र कुटुंब , राहायला घर आणि मुख्य म्हणजे मुलगा  अजय चांगला होता ,,, पण दिसते तसे नसते !!!!
लग्नावेळी अंकिताच्या  सासरच्यांनी खूप कोडकौतुक केले .. पण नव्याचे दिवस संपले तसे ..... !!!

अंकिता नोकरी करत होती लग्नानंतर ती कामावर जाऊ लागली ,, पहिले थोडे दिवस सगळे फक्त बघत होते पण नंतर नंतर तिच्या सासूने अजयला सांगायला सुरुवात केली ," तुझी बायको बघ कसले कसले ड्रेस घालते ,, साडी नेस म्हणले तरी ऐकत नाही,,  कारणे देत असते नुसती प्रवासात हेच बरे आहे ... घरातील कामे नको असतात ,सकाळी लवकर निघायचे आणि उशिरा यायचे  !!! "
अजयची आई रोजच त्याच्यासमोर असा पाढा वाचू लागली ... 
अंकिता खरे तर रोज सकाळी लवकर उठून घरातील कामे आवरून मग जात असे .... संध्याकाळी जेव्हा ती घरी येईल त्यावेळीच चहा होणार तोही तिनेच करायचा बाकी कुणी कशाला हात लावत नसे ...  सासरे तर दिवस रात्र पिऊन बसत कधी कधी त्यांना सोबत द्यायला नणंदेचा नवरा , आणि दीर सुद्धा असे ... 
अंकिताला त्यावेळी इतके अवघडल्यासारखे वाटायचे ,,, त्यांना चढली कि अगदी शिव्या सुद्धा द्यायला कमी करायचे नाहीत ... तिची सासू आणि नणंद फक्त हसत आणि टि व्ही लावून त्यावरच्या मालिका बघत त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नसे .... 
अंकिताने अजयला सांगून पहिले ... त्याला तर सगळेच माहित होते पण तो काहीच बोलायचा नाही ... महिना झाला कि सगळा पगार आईच्या हातात आणून देणे कि आपली जबाबदारी संपली असे त्याच वागणे ... 
अंकिता खूप मागे लागली होती कि त्यांना सांग, समजावं काहीतरी .... ,,, 
 त्यावेळी अजयने तिला सांगितले कि , "हे आहे असेच राहणार !! तुला याची सवय करून घ्यावी लागेल मी कुणाला काही बोलणार नाही .... आणि तुझा पगार आईच्या हातात द्यायचा स्वतःच्या चैनीसाठी जरा कमी वापर !! तुझ्या  ऑफिस मध्ये तू काय करते , कुठे असते सगळे माहीत आहे मला ... !!!!!" 
हे ऐकून अंकिता त्याच्याकडे पाहतच राहिली !!! सगळेच नवीन होते तिच्यासाठी !!!! 
अंकिता स्वतःला कसेतरी सावरत  म्हणाली कि " हे पैसे माझे आहेत ते कसे कुठे वापरायचे ते माझे मी पाहीन !!"
पण अजय काही न ऐकता बाहेर निघून गेला आणि त्याच्या बाबांच्या सोबतीला जाऊन बसला ... 
अंकिता आतमध्ये एकटीच बसून होती ... ती आहे कि नाही याची पर्वा कुणालाच नाही !!!!
दुसऱ्या दिवशी अंकिताने नेहमीप्रमाणे आपली कामे आवरली आणि ऑफिसला न जाता  आईकडे गेली ... खूप दिवसांनी तिने आपले मन मोकळे केले .. आईने तिचे ऐकून तिला रडून दिले ती थोडी शांत झाल्यावर आईने  तिलाच विचारले " आता तुला काय करायचे आहे ? राहणार आहे का तिथे तू ? "
 " आता मला काय करायचे आहे ते मलाही नक्की माहित नाही , पण काहीतरी मार्ग काढायला हवा ,, एकदा अजयसोबत बोलून बघते , पण कुठेही बाहेर जायचे म्हणले कि त्याच्या आईची परवानगी लागते तिने हो म्हणले तरच आमचे घोड पुढे जाते नाहीतर तिथेच अडकते ... "  अंकिता .
तसे आई तिला म्हणाली बघ एखादे देव दर्शन असे निम्मित करून बाहेर पड , त्याच्या मनातले तुला कळाले कि पुढचे निर्णय खूप सोपे होतील ...
आईचे बोलणे अंकिताला पटले ,, काहीतरी विचार करून घरी पोहचली .. तर घरी आधीच समजले होते कि अंकिता ऑफिसला न  जात तिच्या माहेरी गेली होती .
तिच्या सासूला आधीच निम्मित हवे असते  बोलायला आता आयतेच सापडले होते  ,, माहेरी जाऊन आमच्याविषयी त्यांचे  कान भरून आली का ? कि नेहमीच जाते असे आम्हाला न सांगता .. ? तरीच माझ्या हातात पगार दे म्हणले कि द्यायचा नसतो आणि तिकडे जाऊन माहेरचे घर भरायचे असते असे एक ना अनेक बोलणे चालू होते .. तुला नोकरी होती म्हणून या घरात आणली नाही तर तुला विचारले सुद्धा नसते आम्ही .... " हे ऐकून मात्र अंकिताला धक्का बसला म्हणजे फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केले ...!!!!
आता अजयला विचारायलाच हवे , त्याचेही मत असे असले कि मग संपलेच ना !!
अजय घरी आला पण त्याआधीच त्याला घरी काय झाले आहे ते माहित होते ,, त्यामुळे तो येताना बाहेरूनच पिऊन आला होता .
अंकिता त्याला काही बोलणार तोच त्याने तिला शिव्याची लाखोली वाहायला सुरुवात केली .. तो काही ऐकून घेण्याच्या शुद्धीत नाही . अंकिता त्याला समजावत होती , पण तो फक्त वेड्यासारखे करत होता  एकदा तर त्याचा स्वतःचा तोल ढळला त्याने अंकिताला मारण्यासाठी तिच्यावर हात टाकला अंकिता बाजूला झाली आणि अजयचे डोके बेडच्या कठड्याला बडवले त्याला जोरात मार बसला .
त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले अंकिता सासू सासऱ्यांना बोलावू लागली पण सासऱ्यांना उठता येईना इतकी जास्त झाली होती .सासूला काय करावे ते समजेना !! अंकिताने तिच्या भावला फोन करून गाडी घेऊन यायला सांगितले .
तिचा भाऊ आला , अजयला घेऊन ते डॉक्टरकडे गेले ,, अजयकडे पाहून त्यांनी सांगितले कि आता लगेच याच्यासाठी रक्ताची व्यवस्था करावी लागेल , अजयचा आणि त्याच्या बाबांचा ब्लडग्रुप एकच होता पण आता यावेळी त्यांचा काही उपयोग नव्हता ... अंकिताच्या भावाने त्याच्या मित्रांना बोलावून सगळी तयारी केली ..
पण अजयने खूप दारू घेतली होती त्यामुळे डॉक्टर जास्त काही बोलत नव्हते ..
अंकिताचे आई बाबा तिथे आले ..
दुसऱ्यादिवशी डॉक्टरांनी सांगितले कि याची जखम खूप खोल आहे ती भरून येण्यासाठी वेळ लागेल ..
४-५ दिवसानी अजय घरी आला पण डोक्यावर पट्टी होतीच ,, डॉक्टरांनी त्याला सांगितले होते तुझे ड्रिंक्स घेणे असेच चालू राहिले तर तू यातुन नाही बाहेर पडू शकणार वेळीच सावर स्वतःला ...
अंकिताने अजयसाठी  म्हणून २ महिन्याची सुट्टी घेतली होती .  तो पूर्ण बरा होईपर्यँत ती त्याच्या सोबत होती , पण ती सगळे करताना कर्तव्य म्हणून करत होती त्यात आपलेपणा असा कुठेच नव्हता ....
अजयला हे सगळे कळत होते त्याने एक दिवस अंकिताला विचारले , " रागावली आहेस का  ग ?
जास्त काही बोलत नाही , फक्त काम करत राहते .... "
अंकिताने त्याच्याकडे पाहिले आता तो पूर्णपणे बरा होत आला होता ,, ती काही न बोलता त्याच्याकडे पाहून हसली फक्त आणि म्हणाली आपण बोलू लवकरच तू आता आराम कर ,, उद्यापासून माझी सुट्टी संपणार आहे ..
अंकिता आता नेहमीप्रमाणे सगळे आवरून ऑफिसला जात होती , घरचे वातावरण सगळे पूर्वीसारखेच होते .. पण अंकिता आता तिकडे लक्ष देत नव्हती ..
पंधरा दिवसांनी ती घरी जरा लवकरच आली खुशीत होती ,,, त्यावेळी घरी अजय एकटाच सोफ्यावर पडला होता .. अंकिताला असे खुशीत पाहून तोही जरा गोंधळला ... अंकिताला त्याने विचारले आज काही खास आहे का ?

अंकिताने दोघांसाठी चहा करून आणला , ती म्हणाली अजय तू मला विचारले होते मी रागावले आहे का ? तर त्यावेळी मी स्वतःला शोधात होते .. २ महिन्यात घरी बसून खूप विचार केला कि पुढे आपल्याला काय करायचे आहे ? कसे जगायचे आहे ? त्यावेळी  बरेच पर्याय समोर आले , बरीच उत्तरे माझी मला सापडली ,, हरवलेली मी मला गवसले ....
अजय मी इथून आता बाहेर पडायचे ठरवले आहे काहीतरी नवीन करायचे आहे ,, माझी स्वतःची मला नवीन ओळख निर्माण करायची आहे , खरे हेच माझे स्वप्न होते लग्नाआधी ,, तुझ्यासाथीने ते पूर्ण करेन असे वाटले होते पण ते काही शक्य नाही ..... त्यामुळे आता माझी वाट मीच शोधेन ... !!!
अजय फक्त पाहत होता तो तिला म्हणाला मग इतके दिवस माझी सेवा करण्याचे फक्त नाटक का ?
तसे अंकिता म्हणाली नाही नाटक नाही ,,, माझे कर्तव्य करत होते .. तू आता धडधाकट आहेस तुझ्या पायावर उभा ,, त्यावेळी तुझ्या आईला वाटले होते कि तुला माझ्यामुळे लागले,,,  हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे झाला  ..   पण खरे काय आहे ते तुला माहित आहेच ना !!!!
आणि खरे तर मी आपल्या विषयी बोलणार होते तुझ्यासोबत त्यादिवशी ,,, पण तू काही बोलायच्या पलीकडे होतास  ... मी काही सांगत होते पण तू ऐकून घेण्याआधीच हात उचलला माझ्यावर !!!
 अंकिता बोलतच होती आणि अजय फक्त ऐकत होता ....
अजय तिला म्हणाला जर असेच करायचे होते तर मग इतके दिवस नाटक कशासाठी केले ... त्यावेळीच गेली असतीस तर ....
अजय , हा प्रश्न मी तुला विचारते , जर त्यावेळी तू मला मारल्यामुळे जर मला काही झाले असते तर तू काय केले असते का ?
अंकिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती ... पण अजयला  तिच्या डोळ्यात पाहायची हिम्मत होत नव्हती ...

दारात अंकिताचा भाऊ तिला घेण्यासाठी आला होता ,, ती आपली बॅग घेऊन आली आणि अजयकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली ...
अजय एकटक तिच्या पाठमोऱ्या लुप्त होणाऱ्या आकृतीकडे पाहत होता ....
अंकिता उद्यापासून एका नवीन जगात नवी प्रारब्धाची वाट शोधणार होती ...