Thursday, August 18, 2016

रक्षाबंधन

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट हि , म्हणजे साधारणपणे नव्वदच्या दशकातली  एका  राज्यात दोन बहिणी आणि एक भाऊ राहत असे , त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम .... मोठी बहीण थोडी हट्टी , तर मधली बहीण तशी थोडी हट्टी आणि  समजूतदारपण, लहान भाऊ थोडा आगाऊ , मस्तीखोर , कधी कधी शहाण्यासारखा वागणारा  ... तर असे बहीण भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असत . 
त्यांचे प्रेम म्हणजे तर काय विचारू नका इतके कि एकमेकांच्या झिंज्या धरणे , लाथा मारणे , wwf खेळणे ,  कधी चुकून लहर आली तर रिमोट , बॅट , यांचा खुळखुळा करणे  अशा एक ना अनेक बऱ्याच गोष्टीतुन  दिसून  येत असे (अजूनही दिसते ) .  पण शेजारीपाजारी , पाहुण्याच्या घरात ते हे असे प्रेम कधीच दाखवत  नसत , अजूनही त्यांचे शेजारीपाजारी त्यांना नावजतात , हे फक्त केवळ शक्य होते ते त्यांच्या आईच्या डोळयांच्या धाकामुळे .... 
तिघे बहीण भाऊ मोठे होत होते तसेच त्यांचे प्रेमही वाढत होते , वाढत्या वयानुसार लहान भाऊ खूपच समजूतदार होत चालला होता पण  मस्तीखोर आणि अकडूपणा तसाच ठेवत , शाळा चालू होत्या तोवर सगळे एकाच राज्यात राहत होते आपल्या माता पित्याच्या छायेत . पुढील शिक्षण घेण्यासाठी एकेक करून त्यांना राज्य सोडावे लागले आणि दुसऱ्या राज्यात काही काळाकरिता वास्तव्य करावे लागले पण सुट्टी , सणवार , अशा दिवशी एकत्र येऊन ते त्यांचे खरे प्रेम आणि बरेच काही सांगणारे प्रेम एकमेकांवर दाखवत असत ... 
   एकेदिवशी त्यांच्या मोठ्या ताईचा विवाह होणार असल्याची वार्ता त्या बंधू आणि भगिनींच्या कानावर पडली, तर सगळे तसे खुश झाले पण मोठी ताई आपल्यापासून दुरावणार हे ऐकून त्या दोघाना खूप वाईट वाटले , पण लहान भाऊ वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता .  
पुढे दोन वर्षांनी त्याच्या दुसऱ्या ताईचा विवाह संपन्न झाला , मी तुमच्या लग्नात तुम्हाला हसत हसत जा म्हणेन , मी काही रडणार नाही उलट तुम्ही घरी नसेल तर मला बरेच आहे असे म्हणणारा हा छोटा भाऊ दोन्ही बहिणींच्या लग्नात ढसाढसा रडला ... हे तो अजूनही मान्य करत नाहीय ... 
पण मजेशीर गोष्ट अशी झाली कि या दोन बहिणी लग्न होऊन पुणे या राज्यात रहावयाला  आल्या तर त्यांचा भाऊ उद्योगधंद्याच्या निम्मिताने तिथेच आला . 
खरेतर आता या दोन बहिणी थोड्या दिवसासाठी परदेशी निवासी आहेत , पण तरीही त्यांचे अधूनमधून  भ्रमणध्वनीवरून बोलणे होत असते तिथेही हे त्यांचे बरेच काही सांगणारे प्रेम ते दाखवत असतात . 
लहानपणी हा भाऊ रक्षाबंधनादिवशी त्यांच्या पिताश्रीकडून ओवाळणी म्हणून दोन बहिणींसाठी प्रत्येकी शंभर मुद्रा घेत असे पण प्रत्यक्षात तो त्या बहिणींना फक्त प्रत्येकी ५० मुद्रा देत असे तोच भाऊराया आज यावेळी त्याच्या बहिणींना त्याच्या स्वकमाईतून पहिली ओवाळणी यावर्षी देणार आहे . त्याला व त्याच्या दोन बहिणींना जसे सर्वांचे आशीर्वाद मिळाले आहेत तसेच तुम्हा आम्हा मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना तर अशी हि रक्षाबंधन निम्मित साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी चालू आहे आणि चालूच राहणार .... 
 

No comments:

Post a Comment