Wednesday, August 24, 2016

मृगजळ

मुग्धा , मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी मुलगी  कॉलेजमध्ये आहे  . आई एका पतसंस्थेत नोकरी करते ,तिचे बाबा आधी कोणत्यातरी कारखान्यात होते पण त्यांनी अफरातफर केली म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकले आणी तिथेच मुग्धाच्या घराचे स्वास्थ्य हरवले , तिच्या वडिलांना दारू प्यायची सवय लागली  ,रात्री बेरात्री घरी येणे , आईने त्यांना काही बोलले कि तिला मारणे  हे सगळे ती पाहत होती पण काहीच करू शकत नव्हती .
सकाळी जेव्हा तिचे बाबा शुद्धीत यायचे तेव्हा सगळ्याशी अगदी गोड़ बोलायचे पण रात्री मात्र परत तेच !!
या सगळ्यालाच ती खूप वैतागली होती . 
कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण रोज नवीन नवीन ड्रेस घालून यायचे तेव्हा हिला खूप वाईट वाटायचे तिचे आपले ठरलेले तेच चार पाच ड्रेस आलटून पालटून वापरायचे . 
कुणाची बडे पार्टी असली कि ती काही ना काही कारण काढून टाळायची . 
 मनातून तिलाही खूप वाटायचे कि आपणही यांच्यासारखे फिरावे , सिनेमाला जावे , पार्टी कराव्या पण  घरची परिस्थिती अशी होती कि इच्छा असूनही काही करता येत नव्हते . तशी ती खूप समजूतदार पण आपल्या बाबांवर तिचा विशेष राग होता, जे काही होत आहे त्यांच्यामुळेच !!! हे तितकेच सत्य होते एकदा दोनदा  आईला ती बोलली पण त्यावेळी आईनेच  तिला सुनावले ,  " गळ्यात असणाऱ्या चार मण्यांची किंमत बाहेरच्या जगात किती आहे हे तुला तुझे लग्न झाल्याशिवाय नाही कळायचे !!! "
त्याच्यानंतर ती कधी आईला बोललीच नाही ...... 
नुकतेच कॉलेज सुरु झाले होते आज ती नेहमीसारखी तयार होऊन कॉलेजला जायला निघाली , तिथे गेल्यावर कळाले कि आज पहिले लेक्चर नाही आहे  त्यामुळे सगळे कॅन्टीन मध्ये जाऊ लागले तिला जायचे नव्हते पण तिची मैत्रीण सुषमा तिने जवळ जवळ तिला ओढतच नेले . 
कॅन्टीन मध्ये सगळ्यांची गप्पा गोष्टी चालू होत्या पण मुग्धाचे कशातच लक्ष लागत नव्हते , तिच्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली होती.. 
कशाची काय हे कळतच नव्हते . 
बाकीचे गप्पा मारत असताना अचानक तो आला अनिकेत !! तिच्या नकळत तिच्या ओठातून त्याचे नाव आले. 
त्याला बघून तिचा मूड एकदम फ्रेश झाला . यावर्षी तो त्यांच्या कॉलेज मध्ये नवीनच आला होता . आलेल्या दिवसापासून तो तिला बाकीच्या तिच्या मित्रांपेक्षा खूप वेगळा वाटायचा . 
अनिकेत तिथे आल्यावर मुग्धाही लगेच गप्पामध्ये  सामील झाली . 
हळूहळू त्या दोघांची ओळख वाढत होती , कधी नोट्स तर कधी कोणता तरी इव्हेंट ... 
अनिकेत आल्यापासून मुग्धाला एक वेगळाच रंग मिळाल्यासारखा वाटत होता , एकदा सुषमाने तिला विचारलेही पण तिने काहीतरी कारण सांगून टाळले . 
अनिकेतचा स्वभाव अगदीच मोकळा होता , घरची परिस्थिती उत्तम , तो सगळ्यांशीच खूप मिळून राहायचा . 
अनिकेत आणि मुग्धाची खूप छान गट्टी जमली होती , अनिकेतलाही सुषमाकडून मुग्धाच्या घरची परिस्थिती कळाली होती त्यामुळे तो मुग्धाच्या नकळत तिला मदत करायचा 
अर्थात हे मुग्धाला समजत होते पण तीही त्याच्या अज्ञानात सुख मानत होती . 
थोडे दिवसानी अनिकेतची बड्डे  पार्टी  होती त्याने सगळ्यानांच बोलावले होते , यावेळीही मुग्धा काहीतरी कारण काढून नाही म्हणणार म्हणून त्याने तिला आधीच सांगून  ठेवले होते  कि यावेळी कोणतेही नाटक चालणार नाही . 
मुग्धा आली होती पार्टीमध्ये पण  हायक्लास पार्टी बघून ती गोंधळून गेली होती . 
  मजा मस्ती चालूच होती घशाला कोरड पडली म्हणून ती पाणी घेण्यासाठी जात होती , तर तिथंच बाजूला तिला वेगवेगळ्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या दिसल्या आणि अनिकेत अगदी मस्त मजेत ते पित मजा करत होता . 
मुग्धा तिथेच त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती , ज्यागोष्टीपासून ती  दूर राहण्याचा प्रयत्न करत होती  , विसरायचा प्रयत्न करत होती  तेच तिच्या समोर येत होते राहून राहून हाच विचार तिच्या डोक्यात चालू होता . 
इकडे तिच्या खांद्यावर कुणीतरी हात  ठेवल्याचा तिला भास झाला तर तो अनिकेत होता !!!
तिला विचारत होता कुठे आहे लक्ष ? कुठे पाहत आहेस ?
तिला काय बोलावे हेंच समजेना काहीतरी कारण सांगून ती पार्टीतून निघून गेली . 
अनिकेतलाही जाणवले काहीतरी गडबड आहे . 
त्यानंतर मुग्धा कॉलेजला आल्यावरही त्याच्यापासून दूर दूर राहायचा प्रयत्न करत होती अगदी कारणापुरते बोलत होती , अनिकेतला तिचे हे असे वागणे खटकत होते  त्याने बोलायचा प्रयत्न केला पण ती त्याला दाद लागू देत नव्हती . 
दोन दिवस असे होत आहे हे पाहिल्यावर कॉलेज संपल्यावर लगेच ती जाते त्या स्टॉपवर अनिकेत जाऊन थांबला , मुग्धाने ते पाहून न पाहिल्यासारखे केले , पण आज अनिकेतने तिच्याशी बोलायचे ठरवलेच होते . 
तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या जवळ जाऊ लागला तर मुग्धा तिथून चालत जाऊ लागली , अनिकेतने तिला थांबवले  आणि तिच्या मागे लागून जवळच असणाऱ्या एका छोट्या कॅफे मध्ये घेऊन गेला . 
" मुग्धा , माझे काही चुकले आहे का ? त्यादिवशी पार्टीतून निघून गेली अचानक आणि आता परत काही बोलत पण नाही आहे . काय झाले आहे ते तर सांग . काही बोलली नाहीस तर मला कळणार कसे ? " अनिकेत . 
"अनिकेत , नाही रे तुझे नाही , चुकले आहे माझे कदाचित माझ्याच अपेक्षा जास्त होत्या म्हणून.... !" मुग्धा 
" बोल ना मुग्धा का थांबलीस " ...  अनिकेत 
 " नाही नको आणि तसेही तुला काही बोलायचा अधिकार मला नाहीय " ...  मुग्धा  
 " असे का म्हणतेस मुग्धा आपण इतके दिवस झाले ओळखतो एकमेकांना आणि किती चांगले मित्र आहोत आणि तू आज अचानक असे का म्हणत आहेस ? ".... अनिकेत 
 " फक्त चांगले मित्र अनिकेत ? " मुग्धाने असे म्हणत अनिकेतकडे पहिले .... 
" नाही अग म्हणजे मला ... अग तुझ्याइतके चांगले मला कुणीच समजावून घेत नाही , तू खूप जवळची आहे मला आणि आवडते  पण ..   " अनिकेत 
पण काय अनिकेत ? 
 " पण तुझ्या मनात काय आहे हे मला खरेच माहिती नव्हते त्यामुळे मी गप्प होतो आणि म्हणूनच तुला काही सांगितले नाही माझ्या मनातले .... "  मुग्धा आता थोडी शांत झाल्यासारखी दिसत होती 
"  मुग्धा,  प्लिज आता तरी मला सांग ना काय झाले आहे ते ? का तू नाराज आहेस माझ्यावर ? " अनिकेत
" अनिकेत , लहानपणी आई बाबा नोकरी करत होते तेव्हा आम्ही खूप सुखी होतो पण अचानक माझ्या बाबांना खूप पैसे कमवण्याचे वेड काय लागले आणि त्यात त्याच्या मित्राने त्यांना फसवले तेव्हापासून ते दारूच्या नशेत राहू लागले . खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते काही ऐकूनच घेत नाहीत उगीच आईला मारतात . कंटाळा आला आहे मला त्यांच्या या वागण्याचा पण मी काहीच करू शकत नाही . " मुग्धाचे डोळे पाण्याने भरले. 
हलकेच अनिकेत तिच्या हातांना थोपटत होता . 
मुग्धाचे मन बरेच हलके झाले होते खूप दिवसांनी ती आपल्या मनातले कुणाशी तरी बोलत होती . 
अनिकेतने तिला विचारले , हो पण तू माझ्यावर का नाराज आहे ? ते तर सांग !! 
त्यादिवशी तुझ्या घरी आले होते पार्टीसाठी आणि तु ड्रिंक्स घेताना दिसला त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती तुझे हे रूप मला माहितीच नाही , मला त्यावेळी फक्त राहून राहून माझ्या घरातील परिस्थिती आठवत होती .
यावर काय बोलावे हे अनिकेतला समजेना ..
अग मी कधीतरी मजा म्हणून घेतो ड्रिंक्स रोज काही अगदी अट्टल दारुड्यासारखा पित नाही .  
अनिकेत सगळेच पहिला मजा म्हणून घेत असतात त्याची परत चटक लागून आपण आपल्याच आयुष्याला कशी सजा देतो हे स्वतःच्या सुद्धा लक्षात येत नाही ...
असे मुग्धा म्हणाल्यावर अनिकेतला बोलयला काही राहिलेच नव्हते . 
मुग्धा त्याच्या उत्तराची वाट बघत होती.
 ठीक आहे मुग्धा तुला जर आवडत नसेल माझे ड्रिंक्स घेणे तर,  मी नाही घेत पण तू अशी नाराज नको होऊ मी पूर्णपणे प्रयत्न करेन.....
तो हे सगळे इतके मनापासून बोलत आहे हे पाहून मुग्धा खुश झाली तिला कुठेतरी वाटत होते कि हा आपल्यासाठी इतके तरी करेल . 
त्या दिवसापासून अनिकेत खरेच बदलायचा प्रयत्न करत होता ,  मुग्धाला हि खूप समाधान वाटत होते कि आपली निवड चुकणार नाही ..
ज्यावेळी मुग्धा आणि अनिकेत जवळ येत होते तेव्हाच सुषमाने मुग्धाला सावध करायचा प्रयत्न केला होता , मुग्धा , अनिकेत हा खूप मोठ्या कुटुंबातून आलेला आहे , तो आता जरी तुला गोड़ वाटेल असे वागत असला तरी पुढे जाऊन तो  त्याच्या पहिल्या मार्गावर येणार नाही याची काय खात्री आहे ? त्यादिवशी तू पार्टीतून गेल्यावर अनिकेतचे मित्र त्यांची पार्टी हे सगळे मी पहिले आहे ...... सुषमा मुग्धाला समजावयचा खूप प्रयत्न करत होती ...
पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते ..
मुग्धाला आताच अनिकेतचा चांगुलपणा फक्त दिसत होता , अर्थात अनिकेत हा खूप चांगला मुलगा होता फक्त त्याचे काही मित्र आणि त्याची ड्रिंक्स घेण्याची सवय सोडली तर सगळेच आलबेल होते .
जरी अनिकेत आणि मुग्धा हे एकत्र असले तरी अनिकेत अधूनमधून पार्टीला जात असे ,अगदी थोडे थोडे करत त्याचे मित्र त्याला ड्रिंक्स घ्यायला भाग पाडत .
मुग्धा त्याच्यावर नाराज होई परत  तो तिला मनवायचा .....

पण हे सारखे सारखे होऊ लागल्यावर मुग्धाची बुद्धी आणि मन यात अंतर तयार झाले , तिची बुद्धी तिच्या मनाला साथ देईना ... कारण तिच्या बुद्धीला हे पटत होते कि हे चुकीचे आहे , अनिकेतच्या प्रेमात आपण वाहवत जात आहोत कि तो फसवत आहे कि नाही याचा सुद्धा तिला निर्णय घेता येईना ...
त्याच्यामुळे बदलेली तिची लाईफस्टाईल , महागड्या गिफ्ट्स याने मन सुखावत होते , पण बुद्धी मात्र तिला वेगळाच विचार करायला भाग पाडे ,पण प्रत्येक वेळी तिच्या मनाचे पारडे जड  होई आणि बुद्धी कमकुवत पडे ...
 शिक्षण पूर्ण झाल्यावर मुग्धाच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली , त्यावेळी मुग्धाने तिच्या आईला अनिकेत बद्दल सांगितले तिच्या आईला तशी काहीच अडचण नव्हती मुलीला इतके सुंदर सासर मिळणार आहे हे पाहून ...
प्रश्न होता तो अनिकेतच्या आई वडिलांचा , अनिकेतची आई खूप साधी फक्त वडील  कडक होते पण ते आपल्या मुलासाठी तयार झाले ...
अनिकेतच्या घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न थाटामाटात झाले , मुग्धाकडची मंडळी तर  पाहत होती  सगळा झगमगाट .... आईला वाटले आपल्या पोरीने तरी  नशीब काढले ...
मुग्धा आणि अनिकेत हनिमूनसाठी जाऊन आले , अनिकेतच्या बाबांच्या इच्छेनुसार त्याने त्यांची छोटी फर्म जॉईन केली .
दोघांचा सुखी संसार चालू होता , अनिकेतचे मित्र आणि त्याच्या पार्टी चालूच होत्या , कधी कधी मुग्धा त्यावरून त्याला बोले पण तो तिची  तेवढ्यापुरती समजूत घालत असे , आणि परत त्याचे चालूच ...
मुग्धा आता त्याच्या या गोड गोड बोलण्याला कंटाळली होती ....
एक दिवस असाच अनिकेत खूप उशिरा घरी आला मुग्धा त्याची वाट पाहत बसली होती दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस होता म्हणून ती खुशीत होती ....
दारावरची बेल वाजली , तिने दार उघडले तर अनिकेत तोल जाऊन तिच्या अंगावर कोसळला ..
तो इतका पिऊन आला होता कि त्याला कशाचीच शुद्ध नव्हती ..
मुग्धाने कसेबसे त्याला सावरत बेडरूममध्ये  झोपवले ..
ती रात्र तिने तशीच जागून काढली रडून रडून तिचे डोळे सुजले होते . अनिकेत दुसऱ्या दिवशी डोके धरूनच उठला , तिने त्याला लिंबूपाणी आणून दिले  आणि तिथून निघून गेली .
अनिकेतला रात्री काय झाले त्यातले काही आठवत नव्हते , मुग्धाशी बोलायला गेल्यावर ती त्याच्या एकदम  ओरडत अंगावरच आली ,...
अनिकेत का विश्वास ठेवला मी तुझ्यावर ? त्यावेळीच जर स्वतःला सावरले असते तर आज हि वेळ आली नसती मझ्यावर का असा वागत आहेस ? तुझी माफी ,मनवणे हे सगळे खोटे का ? काही अर्थ आहे का तुझ्या वागण्याला मुग्धा बडबडतच होती ...
अनिकेतचे डोके आधीच दुखत होते तिच्या या बोलण्याने तो जास्तच चिडला  तिला ओरडू लागला , तुला माझ्याशी लग्न करायची घाई झालेली , पैसा पाहून तू प्रेम केलेस माझ्यावर !! मी हा आधीपासूनच असा आहे....  माहिती होते ना मग ? तरीही केलेस लग्न मग आता हि खोटी नाटके कशाला ??  अनिकेतचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता ...
हो त्यावेळी केला मूर्खपणा , पण आता करेन त्याची भरपाई मला नाही राहायचे तुझ्यासोबत , आणि तू म्हणतो आहेस ना या पैशासाठी लग्न केले त्यातले एक पैसाही नको मला ... मुग्धाही काही वाटेल ते बोलत होती ...
अनिकेतकडे पैसा आहे हे कारण होतेच पण   मुग्धाचे त्याच्यावर खूप प्रेम होते म्हणूनच ती त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होती , मुग्धाला वाटले होते आपण अनिकेतला बदलू शकू पण ते आता शक्यच दिसत नव्हते .
मुग्धाचा वाढदिवस अनिकेत पूर्णपणे विसरला होता पण तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्यासाठी एक पार्टी ठेवली होती .
संध्याकाळी घरी पार्टी पाहून त्याला आठवले कि आज मुग्धाचा वाढदिवस आणि आपण तिला काही बाही बोलून गेलो , अनिकेत तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ येत होता .....
सगळयांच्या गराड्यामध्ये मुग्धा बाहुलीसारखी खोटे खोटे हसत होती , सोन्याच्या पिंजऱ्यातल्या  पोपटासारखी  तिची अवस्था झाली होती , आजूबाजूच्या लोकांच्या गराड्यात तिचा जीव घुसमटत होता ...
आणि तिला तिच्या आईचे शब्द आठवत होते ..."  या चार काळ्या मण्यांची किंमत  ....... ..."




  


Monday, August 22, 2016

स्वातंत्र्य दिन

शाळेत होते त्यावेळी भूगोलमध्ये नेहमी एक प्रश्न विचारला जायचा कि , " भारतात विविधतेत एकता आहे " याची कारणे द्या . त्याचे उत्तर नेहमीच ज्यावेळी मी भारतामध्ये होते त्यावेळी मिळाले आहेच पण आज इथे न्यू यॉर्क मध्ये   भारताचा  स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तेव्हा त्याची जास्त जाणीव झाली कि खरेच भारतात खूप एकता  आहे कितीही वेगळे असलो , आपल्या मायभूमीपासून , जन्मभूमीपासून दूर असलो तरी आम्ही भारतीय आहोत . 
             आज इथे परेडसाठी   मराठी, बंगाली , गुजराथी  , तेलगू तामिळ सगळेच लोक होते  आपापल्या प्रांताची वेशभूषा करून त्या सगळ्यात एक आपलेपणा होता  . खासकरून आपला नाशिक ढोल . लेझीम आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष एक वेगळीच ऊर्जा देत होता . 
भारत माता कि जय , वंदे मातरम यांच्या आरोळ्यांनी तर क्षणभर विसरायला होत होते कि आपण भारतात आहोत कि परदेशात !!!!! 
वेग वेगळ्या प्रांताचे डान्स आणि त्यांना प्रोत्सहान देण्यासाठी जमलेले हजारो भारतीय हा एक नजारा वेगळाच होता , पण आज खरेच खूप भारी वाटतंय नेमके काही ते माहिती नाही पण खूप आनंद आहे , एका फिरंगी जमिनीवर राष्ट्रगीत म्हणताना ...... 
आज योगगुरू बाबा रामदेव आणि अभिषेक बच्चन आले होते , रामदेव बाबांनी शुद्ध हिंदीत छोटेसे खूप छान भाषण केले ,  बिचारा अभिषेक बोलायला सुरुवात इंग्लिश मध्ये केली पण आपण भारतीय ना तिथे सुद्धा त्याला अरे हिंदी हिंदी हिंदी  ओरडून हिंदीत बोलायला  भाग पाडले . 
 काहीही म्हणा आपण जिथे जातो तिथे आपला ठसा उमटवतो याचे आज झकास दर्शन झाले 
शेवटी 
 हम लोगोंको समज सको तो 
समझो दिलबर जानी 
जितना भी तुम समझोगे 
उतनी होगी हैराणी 
अपनी छत्री तुमको देदे 
कभी जो बरसे पाणी 
कभी नये पॅकेट में बेचे 
तुमको चीझ पुराणी 
फिर भी दिल है हिंदुस्तानी ..... 

Thursday, August 18, 2016

रक्षाबंधन

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट हि , म्हणजे साधारणपणे नव्वदच्या दशकातली  एका  राज्यात दोन बहिणी आणि एक भाऊ राहत असे , त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम .... मोठी बहीण थोडी हट्टी , तर मधली बहीण तशी थोडी हट्टी आणि  समजूतदारपण, लहान भाऊ थोडा आगाऊ , मस्तीखोर , कधी कधी शहाण्यासारखा वागणारा  ... तर असे बहीण भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असत . 
त्यांचे प्रेम म्हणजे तर काय विचारू नका इतके कि एकमेकांच्या झिंज्या धरणे , लाथा मारणे , wwf खेळणे ,  कधी चुकून लहर आली तर रिमोट , बॅट , यांचा खुळखुळा करणे  अशा एक ना अनेक बऱ्याच गोष्टीतुन  दिसून  येत असे (अजूनही दिसते ) .  पण शेजारीपाजारी , पाहुण्याच्या घरात ते हे असे प्रेम कधीच दाखवत  नसत , अजूनही त्यांचे शेजारीपाजारी त्यांना नावजतात , हे फक्त केवळ शक्य होते ते त्यांच्या आईच्या डोळयांच्या धाकामुळे .... 
तिघे बहीण भाऊ मोठे होत होते तसेच त्यांचे प्रेमही वाढत होते , वाढत्या वयानुसार लहान भाऊ खूपच समजूतदार होत चालला होता पण  मस्तीखोर आणि अकडूपणा तसाच ठेवत , शाळा चालू होत्या तोवर सगळे एकाच राज्यात राहत होते आपल्या माता पित्याच्या छायेत . पुढील शिक्षण घेण्यासाठी एकेक करून त्यांना राज्य सोडावे लागले आणि दुसऱ्या राज्यात काही काळाकरिता वास्तव्य करावे लागले पण सुट्टी , सणवार , अशा दिवशी एकत्र येऊन ते त्यांचे खरे प्रेम आणि बरेच काही सांगणारे प्रेम एकमेकांवर दाखवत असत ... 
   एकेदिवशी त्यांच्या मोठ्या ताईचा विवाह होणार असल्याची वार्ता त्या बंधू आणि भगिनींच्या कानावर पडली, तर सगळे तसे खुश झाले पण मोठी ताई आपल्यापासून दुरावणार हे ऐकून त्या दोघाना खूप वाईट वाटले , पण लहान भाऊ वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता .  
पुढे दोन वर्षांनी त्याच्या दुसऱ्या ताईचा विवाह संपन्न झाला , मी तुमच्या लग्नात तुम्हाला हसत हसत जा म्हणेन , मी काही रडणार नाही उलट तुम्ही घरी नसेल तर मला बरेच आहे असे म्हणणारा हा छोटा भाऊ दोन्ही बहिणींच्या लग्नात ढसाढसा रडला ... हे तो अजूनही मान्य करत नाहीय ... 
पण मजेशीर गोष्ट अशी झाली कि या दोन बहिणी लग्न होऊन पुणे या राज्यात रहावयाला  आल्या तर त्यांचा भाऊ उद्योगधंद्याच्या निम्मिताने तिथेच आला . 
खरेतर आता या दोन बहिणी थोड्या दिवसासाठी परदेशी निवासी आहेत , पण तरीही त्यांचे अधूनमधून  भ्रमणध्वनीवरून बोलणे होत असते तिथेही हे त्यांचे बरेच काही सांगणारे प्रेम ते दाखवत असतात . 
लहानपणी हा भाऊ रक्षाबंधनादिवशी त्यांच्या पिताश्रीकडून ओवाळणी म्हणून दोन बहिणींसाठी प्रत्येकी शंभर मुद्रा घेत असे पण प्रत्यक्षात तो त्या बहिणींना फक्त प्रत्येकी ५० मुद्रा देत असे तोच भाऊराया आज यावेळी त्याच्या बहिणींना त्याच्या स्वकमाईतून पहिली ओवाळणी यावर्षी देणार आहे . त्याला व त्याच्या दोन बहिणींना जसे सर्वांचे आशीर्वाद मिळाले आहेत तसेच तुम्हा आम्हा मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना तर अशी हि रक्षाबंधन निम्मित साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी चालू आहे आणि चालूच राहणार .... 
 

Friday, August 12, 2016

एक गंध....

एक गंध पहाटे पडलेल्या दवबिंदूच्या गारव्याचा ...
एक गंध लाल केसरी गोळ्यासमवेत उमलणाऱ्या फुलांचा ....
एक गंध देवघरातून मंद सुवास येणाऱ्या धुपाचा ....
एक गंध रटरटणाऱ्या  सकाळच्या पहिल्या चहाचा ....
एक गंध बाळाच्या दुधासोबत त्याच्या मखमली स्पर्शाचा ....
एक गंध आईच्या कुशीतील मायेचा ....
एक गंध  तव्यावरच्या गरम पोळीचा ....
एक गंध दुपारच्या झोपेचा ....
एक गंध दुपारी रंगलेल्या भातुकलीचा ...
एक गंध पहिल्या पावसाचा .....
एक गंध सायंकाळच्या किलीबिलाटाचा ...
एक गंध थकलेल्या बाबांच्या घामाचा ...
एक गंध आगळ्या वेगळ्या  तिन्हीसांजेचा ...
एक गंध पतिपत्नीच्या प्रेमाचा ...
एक गंध आपलेपणासोबत प्रेमाचा ...

Wednesday, August 10, 2016

थोडेसे मनातले

प्रथम पाहिले तुला अन मनात कुठेतरी नाजुकशी कळ उमटली ...
तेव्हाच खात्री पटली ईश्वराने तुज माझ्यासाठीच घडवली ...
तुझं न माझं प्रेम  कधी कधी   हव्याहव्याशा रिमझिम सरींसारखे तर
कधी  धो धो पावसात येणाऱ्या टपोऱ्या अळवावरच्या मोत्यासारखे ...
या चंचल फुलपाखराला सोबत घेऊन डुलणाऱ्या रंगबेरंगी फुलासारखी तू ..
सागरच्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट अन मला किनारा देणारी तू

Saturday, August 6, 2016

श्रावणसरी

रिमझिम सरीत श्रावणाची सुरुवात झाली , 
दिव्याच्या अवसमुळे तेजोमय प्रकाशात एक प्रसन्नतेची हलकीशी लकेर उमटून गेली.....
श्रावणातल्या कालच्या पहिल्या शुक्रवारी गौराई येऊन बसली... जिवतीच्या गोष्टीसंगे मुलाबाळांना उदंड आयुष्य देऊ केली  ....

  आज भावाचा उपवास  भाजणीचे थालीपीठ त्यासोबत वाटलेल्या डाळीची उसळ ,  नागोबाची पूजा दूध ,लाह्या आमच्या आईसाहेब अगदी यथासांग पूजा करून घेत आम्हा दोघी बहिणींकडुन , म्हणजे कोणतीही पूजा असो किंवा आणि काही प्रत्येक गोष्टीत perfection हवेच त्याचा आता खूप उपयोग होतोय म्हणा कुठे अडत नाहीय ,, पण खरेच हे करताना  खूप मज्जा असायची आणि यायची पण ,
   दुपारच्या वेळेला कुणी झोपाळा बांधला का हे बघायला जायचे ,हा माझा सगळ्यात आवडीचा छंद तासनतास झोपाळ्यावर डुलत तर कधी एखादे पुस्तक घेऊन  बसायचे ,  एका मोठ्या झाडाला बांधलेला झोपाळा , खूप मोठी जाड रस्सी त्याला खाली लाकडाची फळी लावून तयार केला असायचा ( त्याला काहीतरी नाव आहे मला आता नाही आठवत )  पण तो इतका उंच जायचा ना खुप भारी वाटायचे तेव्हा , आमच्या पेक्षा मोठ्या ताया ,काकू तर दोघी दोघी उभा राहून मोठे झोके घ्यायच्या , आम्ही आपले खाली उभे कधी आमचा नंबर येतो हे बघत  ...

             संध्याकाळी अंबाबाईच्या मंदिरात सगळेजण जमायचे फुगड्या ,झिम्मा यांच्या गर्दीत मंदिराचा आवार गजबजून जायचा ,  माहेरी आलेल्या ताया दीदीच्या  भेटीही मंदिरातच रंगायच्या , एखादी पावसाची सर यायची पण त्यातहि सगळे खेळातच गुंग असायचे पाऊसही अगदी हलकेच यायचा सोबत करायला , कदाचित सासुरवाशिणीचे अश्रू पुसायला ,,
     पण सगळ्यालाच एक वेगळा रंग होता कदचित तोच या श्रावणाचा संग असावा

Tuesday, August 2, 2016

ओळख

आमच्या घराशेजारी एक काका राहायला होते , स्वभावाने खूप छान आणि मनमोकळे काकूही तशाच अगदी ... त्यांना दोन मुले जवळपास दोन अडीच वर्षाचा फरक असेल दोघांच्यात दोघेही खूप हुशार . दोन्ही मुले शिकायला परदेशात एकूणच काय सगळे उत्तम चालू होते . 
नुकतेच काका त्यांच्या नोकरीतून रिटायर झाले होते , त्यामुळे घरी बसून गाणी ऐकणे , फिरणे , मित्र यात त्यांचा खुपसा वेळ जात असे , आणि घरी काकूंना मदत करत  त्यामुळे काकूही  खुश . काकांचा मित्रपरिवार खूप मोठा त्यामुळे नाटक , कुठेतरी छोटीशी ट्रिप हे सारखे काही न काही चालूच असे . 
नोकरीच्या काळात फिरायला  वेळ मिळत नसे आणि आता पैसाही आहे आणि तब्येतपण साथ देत आहे तोवर फिरून घ्यायचे हा एकच बाणा काकांनी रिटायरमेंट नंतर अवलंबला होता . 
काकांची कंपनी मिळणे म्हणजे त्यांच्या मित्रांना मेजवानीच काकांकडे त्यांच्या नोकरीतले किस्से , बाकी बारीकसारीक अनुभव यांचा खजिनाच होता ,कधी कधी हे सगळे आपल्या बायकांना सोबत घेऊन जात तेव्हा काकूही जात असत . 
यावेळी काकांनी पावसाळी ट्रिप काढायची असे ठरवले पण फक्त मित्र मित्र त्यामुळे काकू घरीच , तसाही काकूंना त्यांच्या व्यापातून दिवस कमीच पडत असे .  
यावेळी त्यांच्या ग्रुपने गड  किल्ले असा कार्यक्रम आखला होता . सगळी तयारी झाल्यावर एक दिवशी भल्यापहाटे सगळी मित्रमंडळी किल्लेचढाई साठी रवाना झाली . एकेक किल्ले पाहून त्यांची माहिती घेऊन तिथल्या शौर्यगाथा मनात साठवत त्यांची मोहीम चालू होती . 
आज शेवटचा दिवस रात्री घरासाठी प्रयाण.... 
जेवण झाल्यावर परतीची तयारी चालू केली , सगळ्यांचे सामान गाडीत स्थिरावल्यावर मोठ्याने हर हर  महादेवचा जयघोष करत गाडी चालू झाली , पावसाळ्याचे दिवस होते तसाही ड्राईव्हर  गाडी हळू हळू चालवत होता , घाटात गाडी आली तशी ड्राईव्हरने   गाडीचा वेग आणखी कमी केला , सगळेच थकल्यामुळे झोपेत होते , हळू हळू गाडी पुढे जात होती , अचानक एका वळणावर पुढून एक ट्रक जोरात आला ड्राइव्हरने गाडी सांभाळायचा प्रयत्न करत होता अचानक गाडीचा वेग वाढलेला पाहून सगळेच जागे झाले ,काही कळण्याआधीच गाडी एका मोठ्या दगडावर जाऊन आदळली . कुणाला काहीच कळत नव्हते कुणी माझा पाय तर कुणी हात , गुढगा म्हणत कह्णत होते ,पण काकाचा तर काहीच आवाज नाही डोक्याला मार  लागल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते . 
मागून येणाऱ्या गाड्यानी हे पाहून पोलिसांना फोन केला आणि सगळ्यांना घेऊन जवळच्याच हॉस्पिटल मध्ये गेले , ड्राइव्हरच्या हुशारीमुळे जीव जाताजाता वाचला होता जर का  गाडी दरीत कोसळली असती तर ??? 
पण नशीबवान सगळेच होते . 
फक्त काकांच्या डोक्याला जोरात मार  लागला होता बाकीचे  हातपाय फ्रॅक्चरवर निभावले होते . 
पण काका अजूनही शुद्धीत आले नव्हते , काकूही तिथे येऊन पोहचल्या  काकांची अवस्था पाहून त्याही कोसळणारच होत्या पण काकांना आधार देण्यासाठी आता फक्त त्याच तर तिथे होत्या . 
चोवीस तासानंतर काका शुद्धीवर आले , तेव्हा काकू त्यांच्या समोरच होत्या , काकूंनी डॉक्टरांना बोलावले काकांना चेक करून , डॉक्टर त्यांना काही प्रश्न विचारू लागले पण काकांना त्यांचे नावही आठवेना  आणि काकूही ..... 
आता काकू फक्त पाहत होत्या त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता . 
तसे काकांना लागलेला मार पाहून डॉक्टरांनी हि शक्यता वर्तवली होतीच पण त्यावेळी ती फक्त शक्यता होती आणि  आता ती वास्तविकता होती . 
त्यांच्या मुलांना बोलावून घेतले , काकांच्या ऑपरेशनसाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हलवण्यात आले , तसेही ऑपरेशन रीस्कीचं होते कारण यात काका कोमात जाण्याचीही शक्यता होती . 
काकूंना तर वेड लागायचे बाकी होते . सगळे देव पाण्यात आले होते . 
मुलांनाही आईला आधार द्यावा कि स्वतःला सांभाळावे समजत नव्हते 
 काकांचे ऑपरेशन झाले , त्यांच्या शुद्धीत येण्याची सगळेजण वाट पाहू लागले , काका शुद्धीत आले आणि त्यांनी काकूंचे नाव घेतले तेव्हा काकूंना झालेला आंनद अवर्णनीयच होता तो तर त्यांच्या डोळ्यात देखील दिसू लागला . पण  खूप थोडा वेळ टिकला . 
काकांना परत आठवेना आपण कोण , आपली मुले ? सगळे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर !!!!!
थोडे दिवस डॉक्टरांच्या निगराणी खाली राहून , काका घरी आले पण त्या घराची ओळख त्यांना पटेना ... पण त्या तिथे त्यांना एक वेगळीच आंतरिक ओढ नक्कीच जाणवत होती ... 
शेवटी काका काकूंनी काडी काडी गोळा करून आपले ते घरटे बनवले होते , त्याची ओळख थोड्यावेळासाठी हरवली असेल पण काकांना त्याचे विस्मरण नक्कीच होणार नव्हते . 
कधी कधी त्यांच्याकडून काकूंना त्यांच्या नावाने हाक येई त्यावेळी त्यांच्या आशा खूप पल्लवीत होत पण खूप थोड्यावेळासाठी .... 
काकाचे हे विस्मरण काकूंच्या खूप जिव्हारी लागले होते पण काकांसाठी त्या स्वतःला सावरत होत्या , पण त्याही खूप खचून गेल्या होत्या . 
काकांचे मित्र घरी येत पण त्यांच्या डोळ्यातील अनोखळी पण पाहून गलबलून येत असे त्यांना .
थोडावेळ जरी स्वतःची ओळख नाही पटली , छोट्या छोट्या गोष्टी नाही आठवल्या तर किती अस्वस्थ व्हायला होते .... 
काकांची छोट्या छोट्या गोष्टीवरून चिड चिड होऊ लागली ,  सगळ्याच्या डोळ्यात त्यांना फक्त सहानभूती दिसत होती आणि त्याचा त्यांना त्रास होत होता , काकूही त्यांना समजावून थकल्या पण एकतर आजारपण आणि हट्टी स्वभाव त्यामुळे यात काहीच फरक पडत नव्हता , त्यांच्या अशा वागण्यामुळे काकू खूपच खचत गेल्या . 
काकांना आधार देता देता स्वतःचा आधार हरवत होता हेच त्यांना नाही कळाले  काकांना सोडून गेल्या त्या कायमच्याच ....... 
यानंतर काकांनी आपल्या घराला ओळखले पण आता त्या घराला मात्र काकांची ओळख पटत नव्हती.....